Thursday, February 5, 2026

अधल्यामधल्या भटक्यानोंदी : मुक्काम बगरु


बगरु गावात शिरताना 

जयपूरपासून साधारणतः चाळीसेक किमी अंतरावर असलेल्या बगरु गावात होस्टेलमधल्या एका मुलाला घेऊन गेलो. तो बाईक घेऊन राजस्थान फिरतोय मागच्या पंधरा दिवसांपास्नं. कॉन्टेन्ट वगैरे तयार करतो. रुबल त्याचं नाव. म्हटलं असं असं गाव आहे येतोस का ? तर हो म्हणाला. जयपूर लिट फेस्टमध्ये मराठी भाषा विभागाच्या स्टॉलवर माझी मुलाखत होती. म्हटलं ती उरकून येतो तोपर्यंत तू गाडी वगैरे आवर. मुलाखत आटपून गाडीवरनं सुस्साट निघालो. नॅशनल हायवेला लागून गाव होतं तरी गुगल मॅपने गंडवलं. वीसेक मिनिटं मागे-पुढे करण्यात गेली. दुकानदारांना विचारत पोचलो गावात. सिमेंटचे ढिगारे असतात तशी घरं. गाव असंही धड म्हणता येईल अशी चिन्ह नाहीत. गाव म्हटल्यानंतर आपली आपली डोक्यात रचना किंवा एक सर्वसाधारण चित्र असतं त्याहून हे गाव अगदीच निराळं. बहुतांश राजस्थानात हेच चित्र. कबीर यात्रेच्या दरम्यान एक मुक्काम पुगल या गावी होता. अर्थात तिथं पोहोचेपर्यंत मावळलं होतं. पण गाव ज्याला म्हणून अशा काहीच खाणाखुणा नाहीत. गवताच्या झुलपांनी झाकलेली छतं आणि लाल-राखड्या मातीची घर हे फक्त महागड्या रिसॉर्ट्समध्ये परावर्तित झालेलं आढळलं काही ठिकाणी. त्यामुळं बगरु गाव हे असं नव्या आधुनिक आक्रमणात उभं राहिलेलं दिसलं. माणसं तीच पण जगण्यात एकप्रकारचा निमशहरीपणा आलेली. अर्थात हे काही वाईट नाही. माणसं जगण्याचे पर्याय आपापल्या परीनं निवडत असली, तरीही काळ स्वतःच्याच गतीनं पुढं सरकतो. अपरिहार्यपणे माणसंही त्यापाठोपाठ चालू लागतात. त्यामुळं इथं दोष देणं किंवा हळहळणं उपयोगाचं नाही. 

दृष्टान्तपाठ मध्ये 'रोवंतलेया पशूचा दृष्टांत' आहे. तो असा : 


पशु असे : ते आडीदरडी चरे : पोट भरे : मग एकी ठाइं बैसोनि रोवंती ।

तेणे तयाचीया सप्तधातु निवती : तुष्टि होए पुष्टि होए बळ होए ।।


गावाचा एक फोटो 

बगरुत उतरल्यावर हा दृष्टांत आठवला. गावखेड्यात अगदी आत्ताआत्तापर्यंत रानातून चरून आलेली गुरंवासरं कुणाच्याही अंगणात किंवा झाडांच्या सावलीत रवंथ करताना मी पाहिलेली आहेत. वरील दृष्टांतातील अर्थ सांगण्यात पॉईंट नाही. त्यातली भाषा आणि तिची लय इतकी मोहवून टाकणारी आहे कि कुणालाही तिच्या ठायी असलेला अर्थ उमगेल. प्रत्येक गावात हे अस्सचं चित्र असेल हे काही मनात साठवून मी बगरुकडे निघालो नव्हतो. पण कायापालट किती झपाट्यानं होतो आणि तो आपल्याला किती टोचतो हे मात्र आवर्जून उमगलं. बगरु गावात ते उमगणं जास्त अंगावर आलं.


बगरु गाव हे ब्लॉक प्रिंटसाठी ओळखलं जातं. पारंपरिक पद्धतीने नैसर्गिक रंग वापरून बगरु छपाई करणारे हजारेक कारखाने इथं आहेत. त्यामुळं गावाचंही नाव बगरु असं आहे. 

एकदोन दुकानदारांना कारखाने कुठं बघता येतील व्यवस्थित विचारलं तर, इथे खूप कारखाने आहेत. कुठेही जा असं उत्तर मिळालं. थोडं शोधल्यावर बगरु छपाईसाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री मिळालेल्या राम किशोर डेरेवाला यांचा कारखाना सापडला. पण फोटो आणि छपाई कौशल्य समजून घेण्यासाठी तुम्ही वर्कशॉपला या असं त्यांचा मुलगा म्हणाला. मुंबई वरनं आलोय आणि मी लिहितो वगैरे रुबलने सांगितल्यावर थोडीबहुत माहिती दिली. पण हे काही पुरेसं नव्हतं. पुन्हा कधीतरी वर्कशॉपला येऊ म्हणत आम्ही बाहेर पडलो. आता कुठे जायचं म्हणत गाडी सुरु झाली आणि गावाच्या गल्लीबोळात वळणं घेऊ लागली. इतक्यात गच्चीवरनं नुकतीच छपाई पूर्ण होऊन उन्हात सुकण्यासाठी खाली सोडलेल्या साड्या दिसल्या. थांब बोलल्यावर रुबलने कचकन ब्रेक मारला. नईवाल भवन नावाचं घर दिसलं. काहीतरी सापडेल म्हणून थेट दारात गाडी उभी केली. उन्हात सुकलेल्या साड्या गोळा करणाऱ्यांना बोललो, मुंबईवरनं आलोय. थोडी या छपाईच्या कामाविषयी माहिती हवीय. तुमची परवानगी असेल तर आम्ही वर जाऊन पाहू शकतो का ? तर हातातल्या साड्यांचा गोळा खाली ठेवत त्यांनी मुलाला हाक मारली. म्हणाले यांना घेऊन वर जा. मुलाचं नाव सागर. 


सागर. मोकळेपणानं हसतोय. 

तो अगदी आनंदानं वरच्या मजल्यावर घेऊन गेला. खाली घर आणि वर कारखाना. बिन्धास्त विचारा फोटो काढा म्हणाला. वरच्या मजल्यावर काही बायका, मुली अगदी बारीक नजरेनं कपड्यावर ब्लॉक उमटवत होत्या. आम्ही आलोय वगैरे त्यात त्यांना काही रुची नव्हती. नजर एकाग्र. विवीध रंगांचे डबे, त्यात बुडालेले ब्लॉक आणि त्यांच्या हातांची लक्षणीय लय. ब्लॉक कपड्यावर उमटताना एक विशिष्ट आवाज आणि रंग भरल्यावर कपड्याचा येणारा किंचित कुबट वास. तो बहुतेक नैसर्गिकपणे रंग तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्यामुळे येत असावा. सागरने कपड्यापासून रंग कसे तयार होतात, त्यात कोणकोणते घटक असतात, रंग तयार होण्याचा कालावधी, ब्लॉकच्या निरनिराळ्या डिझाइन्स, छपाईची प्रक्रिया, धुलाई, त्यात समाविष्ट करायची इमलीची फुलं, आल नावाचा दगडाचा प्रकार अशा बऱ्याच गोष्टी सविस्तर सांगितल्या. मला त्याच्याकडे कामाला असणाऱ्या बायकांच्या बाबतीतला एक प्रश्न होता. यांना प्रशिक्षण दिलं जातं का आणि ब्लॉकच्या डिजाइन्सनुसार कोणकोणते रंग वापरायचे हे त्यांना कोण सांगत ? कि त्या स्वतःच निर्णय घेतात? कारण मी दोनेकतास जे पाहत होतो त्यात त्या स्वतःच ब्लॉक निवडायच्या त्यात स्वतःच रंग भरायच्या आऊटलाईन द्यायच्या. सागर म्हणाला, आम्ही एक महिना त्यांना प्रशिक्षण देतो. त्यानंतर दिवसभराचं जे काम असेल त्याप्रमाणं साडी, ओढणी किंवा कटपीस वगैरेचं ब्लॉक डिजाईन आणि त्यामध्ये भरायचे रंग याचा नकाशा त्यांना दिला जातो. त्याप्रमाणे त्या त्या-त्या ब्लॉकमध्ये रंग भरतात. सागर साड्यांचं डिजाईन स्वतः किंवा ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करतो. 


सागरकडे काम करणाऱ्या महिला कारागीर 

आता थोडं संपूर्ण प्रक्रिया कशीकाय असते हे जाणून घेऊया.

बगरु प्रिंटसाठी वापरण्यात येणाऱ्या पांढऱ्या कपड्यावर हरड डाय केली जाते. त्यामुळं पांढऱ्या कपड्याचा रंग हलकासा पिवळसर होतो. हे करण्याचं एक कारण म्हणजे बगरु प्रिंट ही केवळ पिवळ्या रंगाच्या कापडावरच केली जाते. कारण नैसर्गिक प्रक्रियेद्वारे तयार केलेले रंग पिवळसर कपड्यावरच उठून दिसतात असं सागरचं म्हणणं. या कपड्यावर वेगवेगळ्या ब्लॉकद्वारे मागणीनुसार डिजाईन छापली जाते. दिवसभर सुकवून दुसऱ्या दिवशी एका मोट्ठ्या तांब्याच्या भगून्यात आदल्या दिवशी प्रिंट केलेली सगळी डिझाइन्स उकळण्यासाठी ठेवली जाते. या पाण्यात 'आल' ( पिवळसर रंगाचा धातू, जो बगरु गावात चायनाकडून आयात केला जातो.) रंग आणि इमलीची फुलं मिसळली जातात. आणि मग हे मिश्रण गरम पाण्यात साधारणतः दोन तास उकळलं जात. मग पुन्हा प्रिंट सुकवून त्यावर हरड डाय केली जाते. ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यावर एक हात इस्त्रीचा मारला कि माल मार्केटमध्ये जाण्यासाठी तयार! 


प्रिंट उकळण्याचं तांब्याचं भांडं 

सागर कॉटन व्यतिरिक्त महेश्वरी, चंदेरी, मोडाल असे फॅब्रिकचे वेगवेगळे पर्याय प्रिंटसाठी वापरतो. सिल्क पर्याय तो वापरत नाही. पारदर्शक कपड्यात रंग डिजाइन्सच्या बाहेर पडतात आणि ते काम फार किचकट होतं किंवा रंग जरी सिल्क कापडात भरले तर धुवताना ते रंग पुसले जातात असं तो म्हणाला. सागरकडे तयार होणारी बगरु प्रिंट कॉटन साडी ८००-१००० रुपयांना विकली जाते. बाजारात त्याच साडीची किंमत साधारणतः १५०० रुपयांपर्यंत जाते. सागर स्वतः त्याच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम ( bagru Fab Printers ) पेजद्वारे विक्री करतो. शिवाय जयपूरमधील अनेक विक्रेते त्याचा माल उचलतात. 




आल रंग, रंग कुजवत ठेवण्याचं भांडं आणि इमलीची फुलं. 


गध आणि रेख 

ब्लॉक डिझाईनचा जो साचा असतो त्याचे दोन प्रकार असतात. एक गध आणि दुसरा रेख. गध म्हणजे बाह्यरेखा. सोप्प्या शब्दात सांगायचं तर आऊटलाईन ! आणि रेख म्हणजे ज्यात रंग भरायचे आहेत ती पोकळी. रिकामी जागा.

घराच्या मागच्या आवारात रंग तयार करण्यासाठी ठेवले होते. एका भांड्यात गूळ आणि लोखंड कुजत ठेवलेलं. पंधराएक दिवसांनी त्याचा काळा रंग तयार होणार होता. दुसऱ्या भांड्यात इमलीच्या फुलांपासून तयार केलेलं पीठ होतं. ते रंगात मिसळलं कि रंग घट्ट होतो. अशी चारपाच मोट्ठी भांडी आणि त्यात कुजत ठेवलेले रंग. सागरने हे मोकळेपणानं सगळं दाखवलंच पण इत्यंभूत माहितीही दिली. 


रंग आणि कपड्यावर उमटलेली आकृती 

सागरचे आजोबा, वडील आणि सागर अशी तिसरी पिढी हा व्यवसाय करतेय. मी शेती वगैरे आहे का विचारलं वडिलांना. तर नाही म्हणाले. याच कामात सगळा परिवार गुंतलाय. सागर हे काम मनापासून करतोय. कामावर येणाऱ्या बायकांना सन्मानानं वागवतो. साडेपाच झालेले. बायका आवरून निघत होत्या. कोपऱ्यात एका मुलीचं काम सुरूच होतं. सागर म्हणाला, क्या गुडिया घर नहीं जाना क्या ? 


सागरचं कुटुंब

खाली उतरल्यावर सागरने कुटुंबातील सगळ्यांशी ओळख करून दिली. निघताना सागरचे आजोबा म्हणाले, येत राहा. आम्ही पायाच पडलो दोघंही. किंचित गारठा वाढताना हॉस्टेल गाठलं. कमाल दिवस. सगळं सांगायचं म्हटलं तर खूप सारं लपलेलं उरतं सांगायचं. बस थांब्यावर गालाला हात लावून वाट पाहणारी माणसं, घरी वडील आजारी आहेत म्हणून शिक्षण सुटलेला एक छोटूही सापडतो कचोरीच्या ठेल्यावर. त्याचं हसणं विसरता येत नाही. शाळेत का जात नाहीस असं मला अजिबातच विचारता आलं नाही. 


घरातला एक कोपरा.


इथे जोडलेले सर्व फोटो सागर यांच्या परवानगीने काढलेले आहेत. राजस्थानात गेलात आणि ही सगळी प्रक्रिया समजावून घ्यावी वाटली किंवा सागर यांना भेटावं किंवा त्यांच्याकडून घरबसल्या ब्लॉक प्रिंटमधल्या वस्तू मागवायच्या झालं तर खाली सागर चिपा यांचा नंबर जोडतो. वर जिथं त्यांच्या इंस्टाग्राम पेजचा उल्लेख आलाय तिथं क्लिक केल्यास थेट त्यांच्या पेजवर जाऊन, त्यांचे प्रोडक्ट्स पाहून खरेदीही करण्याचा पर्याय आहे.

सागर चिपा : +91 95710 64659.



***



Monday, October 27, 2025

नारायण सुर्वे : लढाऊपणाचं संयमी स्वगत


आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात अढळ स्थान असणाऱ्या कवी नारायण गंगाराम सुर्वे ( १५ ऑक्टोबर १९२६ - १६ ऑगस्ट २०१०) यांचं जन्मशताब्दी वर्ष १५ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु झालं. पॉप्युलर प्रकाशनाच्या ‘प्रिय रसिक’ या मासिकासाठी सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने लिहिलेलं हे टिपण : 

*** 

ऐसा गा मी ब्रह्म (१९६२), माझे विद्यापीठ (१९६६), जाहीरनामा (१९७५) आणि नव्या माणसाचे आगमन (१९९५) असे केवळ चार छोटेखानी काव्यसंग्रह. साधारणतः चाळीस-पंचेचाळीस वर्षांची वाङ्मयीन कारकीर्द. आणि १४५ च्या आसपास एकूण कविता. एवढ्या ऐवजावर आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात अढळ स्थान असणाऱ्या कवी नारायण गंगाराम सुर्वे ( १५ ऑक्टोबर १९२६ - १६ ऑगस्ट २०१०) यांचं जन्मशताब्दी वर्ष १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. 'मी जन्मलो तेव्हा काही नाम धारण करून जन्मलो नाही. मात्र मी नसेन तेव्हा ह्या पृथ्वीच्या पाठीवर एक नाव ठेवून जाईन.' स्वतःच्या जडणघडणीसंदर्भात सुर्वे यांचे वरील उदगार आहेत. सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आरंभ होत असताना या उद्गाराची प्रस्तुतता महत्त्वाची वाटते. भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अशा दोन्ही निर्णायक चळवळींच्या सानिध्यात सुर्वे यांची जडणघडण झालेली आहे. अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमरशेख यांच्या बुलंद आवाजाचा आणि परिवर्तनशील लेखणीचा आधार त्यांच्या पाठीशी होता. बालमजूर म्हणून गिरणीत केलेलं काम आणि त्यातून कामगार चळवळीशी जुळलेली नाळ ही पार्श्र्वभूमी  लक्षात घेतली तर नारायण सुर्वे यांचा जीवनसंघर्ष आणि त्यातून प्रसवलेली अनुभवनिष्ठ कविता हे आधुनिक मराठी कवितेचं निर्णायक पाऊल ठरते. 

नारायण सुर्वे यांचे कवितासंग्रह. प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन, मुंबई. 


थोडे साहिलेले, पाहिलेले, जोखिलेले आहे 
जसा जगत आहे मी तसाच शब्दात आहे 

असा अत्यंत प्रामाणिक आणि अनुभवलक्ष्यी सूर सुर्वे यांच्या कवितेचा आहे. जीवन आणि कविता यात अधीकचे अंतर नाही. जे जगण्यात आहे अगदी तसेच कुठल्याही आडपडद्यांशिवायचे मोकळे जग या कवितेत आहे. सर्वसामान्य माणसांच्या रोजच्या जगण्यातले कितीतरी संदर्भ, घटना, भाषेचा खळाळता नाद या कवितेत अवतरतो. हर तऱ्हेची माणसं, त्यांच्या बहुविध मिती, बेवारस मुले, कणखर स्त्रियांच्या स्वभावखुणा, जातीधर्माच्या पल्याडचे करुणेने भरलेले जग आणि कामगार आणि कामगारवर्गाच्या अधःपतनाचे कैक संदर्भ नारायण सुर्वे यांच्या कवितेत यांत्रिकपणा टाळून अवतरतात. 

'मजूर हा शब्द मी कटाक्षाने टाळतो. असे शब्द टाळताना माझी राजकीय व सामाजिक भूमिकाही असते. त्याऐवजी मी माझ्याच लोकांच्या बोलीभाषेतले शब्द उचलतो. ते अधिक सामर्थ्यवान वाटतात. सामान्य लोकांची भाषा हीच खरी कवितेची भाषा.' 

जाहीरनामा या संग्रहासाठी लिहिलेल्या 'कविता आणि मी' या लेखातील वरील ओळी सुर्वे कविता या घटकावर किती बारकाईने आणि गांभीर्याने विचार करीत होते याची प्रचिती येते. केवळ लोकभाषेतले शब्दच नाहीत तर लोकभाषेत नांदणाऱ्या माणसांना कवितेचा विषय करणे हेही सुर्वे यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक कविता पाहिल्यावर लक्षात येते. 

भूमिनिष्ठ लेखकाच्या जाणिवा तळागाळातील लोकव्यवहाराशी किती एकरूप आणि घनिष्ट असतात याचे निखळ उदाहरण सुर्वे यांच्या काव्यसंग्रहांत सापडते. या सहसंबंधांची घट्ट वीण आणि त्या जीवनव्यवहारांकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती यांची अजोड अशी बांधणी या कवितांमधून आविष्कृत होते. केवळ गिरणी कामगार वर्ग किंवा श्रमिकांच्या जगण्यातल्या व्याकुळतेचाच नव्हे तर सर्वहारा वर्गाच्या स्थित्यंतराचा चिंतनशील आढावाही ही कविता घेते. सुर्वे यांच्या जगण्या-लिहिण्यात असलेली साम्यवादी जाणीव कवितेच्या निर्मितीचे कारण आहे. कवी आणि मार्क्सवादी चळवळीचा कार्यकर्ता ही सुर्वे यांची ओळख त्या अनुषंगाने पूरक आणि तत्वनिष्ठ अशी आहे. सुखदुःखांची अनेक करूण आणि शाश्वत अशी रेखाचित्रे सुर्वे यांच्या कवितेत उमटतात. म्हणूनच या समूहचित्रांचे बहुपदरी कोलाज सुर्वे यांच्या कवितेत एखाद्या अढळपदासारखे उपस्थित असतात.

आफ्रिकी चाचा चिडे, थुंके, म्हणे; "काम नही करेगा."

चिलमीवर काडी पेटवीत मी विचारी, "चाचा, पेट कैसा भरेगा ?"

किंवा 

आलं आलं वरीस जमीन नांगरून 

उभं पीक नाचे फुलून 

पर एक मेला सावकार ठोला 

हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा 

असं उपाशी राहून ग आम्ही मरावं किती 

डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती 

आलं वरीस राबून मी मरावं किती 

अशाप्रकारची संवादी आणि लोकव्यवहारातील भाषा सुर्वे यांच्या कवितेत मुक्तपणे बागडते. ती मुक्त आहेच, परंतु तुकारामाच्या अभंगांसारखी जनमाणसांत मुखोद्गतही आहे. कष्टकरी वर्गाचे शोषण, त्यामागची भांडवली मानसिकता, जगण्याचा अविरत चिवटपणा आणि त्यामागील साम्यवादी विचारदृष्टी सुर्वे यांच्या दर संग्रहागणिक चिकित्सेचे टप्पे गाठताना दिसते. मार्क्सवाद-लेनिनवाद ह्या विचारदृष्टीसोबतच सर्वहारा, कामगारवर्गाच्या जगण्याचे अनेक चिरंतन संदर्भ अधिक गडद होत गेलेले या कवितेत दिसतात. माणसांसोबतच त्याच्या भवंतालातल्या असंख्य दुर्लक्षित घटकांचा समावेश या कवितेत स्वाभाविकरीत्या असतो. शोषित-वंचित समूहातले अव्यक्त आवाज या कवितेत लक्षणीयरीत्या मुखर होतात. उदा. म्हणून 'शिगवाला' या कवितेतल्या खालील ओळी पाहता येतील. एका साध्या अनुभवाला कवितेचा रचनाबंध देऊन सुर्वे इथे विलक्षण संवादी लय जुळवून आणतात. अशीच संवादी लय 'मुंबई' आणि 'गिरणीची लावणी' या कवितांमध्ये आढळते. सुर्वे यांची लोककलाप्रकारावर असलेली नितांत श्रद्धा आणि आत्मीयता या रचनांमधून आविष्कृत झालेली दिसते. 

नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता 
प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन

देख ये मेरा पाय 

साक्षीको तेरी आई काशीबाय 

'मी खाटीक आहे बेटा - मगर 

गाभणवाली गाय कभी नही काटते''

आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात सर्वसामान्य लोकांच्या जगण्यात इतक्या बेमालूमपणे मिसळलेली कविता इतरत्र क्वचित दिसते. सुर्वे यांच्या अत्यल्प कवितेने हे साधले आहे. 

सुर्वे याच्या कवितेचे मूल्यभान हे इथल्या कष्टकरी जनतेच्या जगण्याशी एकरूप झालेले दिसते. समूहभावना आणि तिच्याशी असलेली बांधिलकी या कवितेच्या रचनेशी दिसते. शहराचे, कामगारांचे आणि पर्यायाने कामगारवर्गाचे जे चित्र ही कविता रेखाटते त्याच्याशी सुर्वे यांची मानवतावादी दृष्टी एकरूप झालेली दिसते. 



कधी विचार असे येतात 

जसे थकून यावेत तिसऱ्या पाळीचे कामगार घरात 

अशाप्रकारचा करुणाभाव या निर्मितीशी असलेला जाणवतो. 

आणि 

स्वतःलाच शोधण्यात अर्धी उमर हरवून गेलो 

स्वतःकडून लाखदा वळलो; तरीही आढळलो नाही  

याप्रकारची एक अगम्य तटस्थताही दिसते. सुर्वे यांच्या कवितेत ही दोन्ही टोकं एकप्रकारे स्वतःची समजूत घालावी अशाप्रकारचा विचारवाद बाळगतात. कदाचित म्हणूनच 'एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे.' असा निर्मळ कबुलीजबाबही या कवितेत दिसतो. सुर्वे यांच्या बहुतांश कवितांमध्ये आढळणारा आत्मकथनात्मक आशय हा या कवितेत एकप्रकारची सर्वव्यापी जाणीव विस्तारत नेतो. एक व्यापक आत्मकथनात्मक अवकाश या निर्मितीने व्यापलेला आहे. 'पुढच्या युगांची सर्वच दुःखे मीही भोगीन म्हणतो' असा स्पष्ट जाहीरनामाच घेऊन ती उभी आहे. 

सुर्वे यांच्या कवितेत आढळणारी समन्वयवादी मानवी दृष्टी शोषणमुक्त समाजाचे पसायदान मागते. खंगलेल्या, पिचलेल्या आणि जगणं विसरलेल्या अनेक माणसांचा ती आवाज बनते. मात्र ती आवाजी बनत नाही. 

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले 

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे 

असा संयम आणि समंजसपणा या कवितेत आहे. या संयमातून आणि समंजसपणातून एक निष्णात लढाऊपणाचा स्वर या कवितेत मिसळलेला आहे. 

कामगार आहे मी तळपती तलवार आहे 

सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा घडणार आहे.

ही स्पष्टता या लढाऊपणाच्या स्वरात आहे. आणि हा स्वर श्रमिकांच्या लढ्याचे प्रतीक आहे. नारायण सुर्वे यांची कविता केवळ तो मार्ग चोखाळत नाही तर त्या मार्गाशी एकनिष्ठही राहते. कलात्मकता आणि कला व जीवन यांच्या गुंत्यातून सुटून आशय आणि भाषाभान जपत ती प्रवाही होते. हे अत्यंत महत्त्वाचं कार्य नारायण सुर्वे यांच्या अत्यल्प कवितेने केलेलं आहे. नारायण सुर्वे ह्या पृथ्वीच्या पाठीवर खरोखरंच एक खणखणीत नाव ठेवून गेलेले आहेत. 

***


Monday, March 17, 2025

सोलो प्रवासाविषयीच्या नोंदी

होस्टेलच्या खिडकीतून पहिल्यांदा बर्फ पडताना पाहिला ती जागा !











 

माझ्या इन्स्टा हॅण्डलवर ( @Khada_Khod ) आणि इनबॉक्स, वॉट्सऍपवर माझ्या सोलो प्रवासाविषयी काही मित्र मैत्रिणींचे प्रश्न असतात. त्या सगळ्यांना एकत्रित उत्तर देण्यासाठीची ही नोंद : 

भटकत फिरलो भणंग आणिक
मिळेल तेथे पाणी प्यालो;
जुळेल तेथे खूण जुळविली
तरि होतो हा तसाच उरलो !

मी एकल प्रवासी म्हणजेच सोलो ट्रॅव्हलर आहे. ठरवून एकट्यानं प्रवास करतो. अर्थात माझा प्रवास हा बजेट बॅगपॅक असतो. माझ्याकडे जास्त पैसे आहेत म्हणून मी प्रवास करत नाही. प्रवास करणं म्हणजे पैसेवाल्यांची थेरं वगैरे समज अनेकांचा असतो. आमच्या घरीही मी प्रवासात पैसे वगैरे उडवतो असा आक्षेप असतोच. प्रवासात पैसे लागत नाहीत का मग ? तर अर्थात लागतात. पण ते तुमच्या व्यवस्थित प्लॅनवर अवलंबून असतात. मी प्रवासाची पूर्वतयारी करताना दोन महिने आधी ट्रेनची जाण्यायेण्याची तिकिटं काढून ठेवतो. शक्यतो स्लीपर किंवा थ्री टायर. हल्ली हल्ली प्राधान्य थ्री टायरला. साईड लोअर ही माझी आवडती जागा आहे. ती मिळवण्याकरता दोन महिने आधी बुकिंग. कारण सांगतो. मला लांबचा प्रवास कटकटीचा नको असतो. जास्त बोलणं, मोट्ठ्यानं फोनवर गाणी लावणं एका मर्यादेबाहेर मला झेपत नाही. अर्थात वेड्यावाकड्या अनुभवांना मी मुकत नाही. मी त्यांच्या शोधात असतोच. बोलणाऱ्या माणसांच्या भाषेवर उच्चारावर माझं बारीक लक्ष असतं. मला निरीक्षण आवडतं. फिक्शन रचण्यात मला या गोष्टी कामी येतात. आयपॅडमध्ये किंवा डायरीत तिथल्यातिथं नोंदवून ठेवतो. तर हे झालं तिकीट बुकिंगचं.

ट्रेनमधील आवडती सीट. साईड लोअर !


ज्या प्रदेशात मी प्रवास करतो त्याविषयी आधी मॅपिंग करतो. हवामान, प्रवासाची लोकल साधनं, खानपान, भाषा, ऑफबीट स्थळं, टाळायचं काय आणि मुख्य म्हणजे गेल्यानंतर काय काय करायचं ते नोट्समध्ये नोंदवून ठेवतो. Vlog पाहून मी फिरायला जात नाही. हे जेवढं टाळाल तेवढा तिथं गेल्यानंतर भ्रमनिरास होत नाही. स्वतःला कोसत बसता येणार नाही. मग मला याची माहिती कशी मिळते ? तर प्रत्येक राज्याच्या टुरिझम खात्याकडून आणि काही अतरंगी भटक्या लोकांकडून जे फक्त फोटो आणि रिल्ससाठी फिरायला जात नाहीत. काही रेफरन्स पुस्तकं असतात, पॉडकास्ट आणि ब्लॉगही असतात. त्यावरून आपल्याला जे उपयोगी आहे आणि जे करायला आपल्याला झेपणार आहे तेवढंच मी माझ्यापुरतं स्वीकारतो. 

राहतोस कुठे ? 

झोस्टलची ( Zostel ) साखळी अक्ख्या भारतात प्रत्येक शहरात विखुरलेली आहे. कमाल क्राउड, वाईब आणि खाणंपिणं सगळं टापटीप. त्याचबरोबर होस्टेलर ( The hostellers ) मूसटॅच ( Moustache ) आणि गोस्टॉप ( goStops) यांच्या शाखाही बहुतांश शहरात आहेत. मी या सगळ्या साखळ्यांचा वापर केलेला आहे. काही जागांवर पुनःपुन्हा राहिलोय नव्या ट्रीपमध्ये. कोची बिएनालेला गेलेलो तेव्हा मध्येच वाट चुकवून अलेप्पीला गेलेलो तिथं goStops मध्ये राहिलेलो. काय कमाल जागा. माझ्या बालपणीच्या शाळेतल्या वर्गात घेऊन गेलेली ही जागा. या जागा प्रामुख्याने सोलो ट्रॅव्हलर्स साठी तयार झालेल्या आहेत. या व्यतिरिक्तही काही जागा मार्केटमध्ये आहेत जे यांच्यासारखी सेवा देतात. मी जयपूर लिट फेस्टला जातो तेव्हा 'No horn OK please' नावाच्या हॉस्टेलमध्ये राहतो. मला तिथली शांतता खुणावते. वाचणं, नुसतं पडून राहणं, नव्यानं ओळख झालेल्या भटक्यांशी बोलणं, कॉफी पिणं, गाणी ऐकणं. बस्स बाकी काही नाही.

गोस्टॉपच्या जागेबद्दल त्यावेळी एक नोंद केलेली. ती इथं देतोय :

शाळेतल्या वर्गासारखी जागा. goStops,केरळ. 

''अल्लेप्पी / आलपूळा / आलपुझाला जायचं एक कारण म्हणजे ते फोर्ट कोचीपासून एकदिड तासावर होतं. फोर्ट कोचीवरून एर्नाकुलम पर्यंत सहा रुपयात फेरी. नी तिथून पन्नास रुपयात अल्लेप्पी. तिथं राहण्याचा काही प्लॅन नव्हता. दुपारपर्यंत छोट्या कॅनलच्या कडेनं थोडं चालायचं नि लाईटहाऊस, थोडं समुद्रावर रेंगाळून पुन्हा संध्याकाळी कोचीला जायचं असं ठरलेलं. स्टेशनपासून समुद्रावर चालत जात थोडं पुढं गेलो तर कलन रोडला एक जुनी दुमजली इमारत दिसली. शाळेसारखी. ते गोस्टॉपचं झोस्टेल होतं. थोडं आत जाऊन पाहिलं तर आठवणी फार मागे शाळकरी वयात गेल्या. गावात फक्त चौथीपर्यंत शिक्षण झालेलं. गोस्टॉपचं झोस्टेल पाहिल्यावर पांढऱ्या निळ्या रंगातळी गावची शाळाच डोळ्यात उभी राह्यली. आठवणींना मागे टाकून पुढं सरकता येईना. लगेच एअरबीएनबी बुकिंग चेक केलं तर फक्त तीनशे रुपये रात्र दर होता. बुक करून टाकलं. माझा बेड वरच्या मजल्यावर होता. खूप मोकळी जागा असलेला. दार-खिडक्या निळ्या रंगातल्या. पांढऱ्या दगडी भिंतींवर उठून दिसणाऱ्या. सॅक टाकून पूर्ण खोल्या फिरलो. बाहेर व्हरांड्यातून समोर पाहिलं तर शाळेतल्या वर्गांच्या रचनेसारखी रचना. मधल्या सुट्टीतला टोल वाजल्यावर तुडुंब पोरं वर्गाबाहेर पडतानाची भराभ्भर हालचाल एकाएकी डोळ्यात तराळली. अशा वेळी फक्त उभं राहून जागेचं म्हणणं ऐकून घ्यावं. अनोळखी जागा खूप आपुलकीनं बोलतात. परिचित नसल्या नि स्वतःच्या अवकाशाबाहेर कुठंही त्या असल्या तरी स्वतःचा मूळ स्थायीभाव त्या विसरत नाहीत. त्यांचं नेचर कमालीचा जिव्हाळा रुजवतो आपल्यात. 

एका दिवसात परत कोचीला निघून जायचं असं ठरवून आलेलो मी. दोन दिवस या जागेत राहिलो. पहाटे लवकर उठून चाललो समुद्रावर जाऊन काप्पा खाल्ला. त्यासोबत सेल फिश. काप्पा आधी रताळ्यासारखा वाटला. पण नंतर जाणवलं यात रताळ्यासारखा गोडसरपणा नाहीय. याची चव कम्प्लिट वेगळीय. बटाटा आणि रताळं याहून निराळी. हाऊसबोट वगैरे प्रकार करायचा नव्हता. एकतर प्रचंड महाग आणि ती भरपूर पाणी पोल्यूट करते. छोट्या होड्या घेऊन खूप आत आत जायचा विचार केलेला पण नंतर पायीच फिरलो. मग या वास्तूच्या व्हरांड्यात भरपूर चाललो. शांत बसून राहिलो. दोनतीन पुस्तकं आणलीयत सोबत. कुठलंही पानं वाचलं जाईल तिथपर्यंत वाचत राहिलो. मुकुल ऐकला. सायंकाळी नऊला सगळं शांत पडतं. कुत्रे रस्त्यांमधोमध अंग टाकून झोपतात. तरी डेरिंग करून अकरा पर्यंत फिरत राहिलो. 

मुन्नारला निघताना उलट्या पावलांनी इमारतीकडं बघत स्टेशनपर्यंत आलो. जागा सुटली. आठवणी तेवढ्या बिलगल्या. 

आपण कधीही काही विसरायला नको च्यायला.''

***

अशीच एक आठवण फोर्ट कोचीत राहिलेल्या जागेची आहे. त्यावेळी नोंदवून ठेवली होती. ती अशी : 

'' या इतक्या गोड हसतायत ना त्या नितु आहेत. फोर्ट कोचीला त्यांचा नाद नावाचा कॅफे आहे एक्स हॉस्टेलमध्ये. दिल्लीत वाढल्या,शिकल्या. एमबीए केलंय. त्यानंतर रॉयल एन्फिल्डमध्ये काही महिने काम. डोकं बिझनेसचं असल्यानं फार टिकल्या नाहीत. म्हणतात, ‘मी इंटरव्ह्यू मध्ये खरं बोलायचे. कदाचित खरी उत्तरं मार्केटिंगमध्ये चालत नसावी. माणसांना फसवणं मला जमलं नाही.’

नितुचा कॅफे. हंस नाद. फोर्ट कोची. 
दिल्लीत कोचीतल्या अभिनय क्षेत्रात काहीबाही करणाऱ्या मुळाशी प्रेम जुळलं नि लग्न करून त्या कोचीत स्थायिक झाल्या. नवऱ्याचा  स्ट्रगल संपेना. मल्याळीत ऍडफिल्म्स नि अजून कायकाय तो करत होता. शेवटी जमेना म्हणून नितु लग्नानंतर बारा वर्षांनी वेगळी झाली. तो मुंबईला निघून गेला. जाताना नितुने त्याच्या मदतीने नाद कॅफे सुरु केला. त्याच्याशिवाय मी कॅफे उभा करू शकले नसते. आम्ही वेगळे झालो असलो तरी अजूनही आम्ही चांगले मित्र बनून आहोत. दोघेही एकमेकांच्या चांगल्या वाईट आठवणी जपून आहोत. असं नम्रपणे त्या सांगतात. 

नितुला एक मुलगी आहे. यंदा दहावीत आहे. तबला शिकते. नितु कबीराचे दोहे कंपोज करते. दर रविवारी मायलेकी गुरुद्वार किंवा मोकळ्या जागेत कबीर गातात. 

मी फोर्ट कोचीला उतरून पहिल्या दिवशी संध्याकाळी थोडं झोपून संध्याकाळी बाहेर आलो तर कॅफेत नितु गाणी गात होती. थोडावेळ बसून राहिलो. गाण्यातले शब्द उच्चारत तिची किचनमध्ये धावपळ सुरु होती. कॉफी घेतघेत भरपूर बोललो. 

आता मुन्नारहून परत आलोय फोर्ट कोचीला. दुपारी तिच्याकडे कॉफी टाकली. म्हणाली, शाम को आना, खाना बनाके रखूंगी. पुढ्यात तिने डाळभात वाढलाय. 

दीये जलते हैं फूल खिलते हैं
बड़ी मुश्क़िल से मगर
दुनिया में दोस्त मिलते हैं
दीये जलते हैं

मागे सुरूय नि तीही त्यात रमून गेलीय. किचनमधील तिची पळापळ अजूनही सुरूय.''

 ***

किती खर्च असतो या जागांचा ? 

होस्टेलरच्या खिडकीतून. मनाली.  

फक्त पाचशे- सहाशे. कोचीत तर मी चारशेच्या दराने राहिलोय. अर्थात विकेंडला किंमती वरखाली होतात. पण त्याचा फार लोड नसतो. एक टीप देतो. आयफोनवरून बुकिंग न केल्यास किंमत आणखी खाली जाते. 

ही डॉर्म्स नोंदणी मी कुठे करतो किंवा जागा शोधतो कशा ? 

Booking.com किंवा Airbnb हे दोन पर्याय मी वापरतो. आत्ता केवळ Booking.com वापरतो. कारण गेल्या चार वर्षांपासून सतत एकाच साईटवरून बुकिंग केल्यानं त्यांच्याकडून मला जिनिअस डिस्काउंट मिळतो. ( 15%) कधीकधी हॉस्टेलमध्ये त्या किंमतीत नाश्ताही समाविष्ट असतो. फक्त होमस्टे हवा असल्यास Airbnb वापरतो. या साईट्सवर आपण जिथं राहणार आहोत तिथल्या जागांचे फोटो असतात, तिथं राहिलेल्या लोकांचे रिव्ह्यू असतात. बुकिंग करण्याआधी ते थोडं पाहून-वाचून घ्यावं. 

प्रवासाची साधनं काय ? 

ज्या भागात आपण जातो शक्यतो तिथले लोकल पर्याय वापरावेत. रिक्षा, उबर, रॅपीडो. कोचीत मी MYBYK वरून सायकल वापरलेली. आठवड्यासाठी नोंद करून घेतली. फक्त 35/- दिवस या दराने. सगळं ऑनलाईन. सायकल लॉकअनलॉकही QR कोडद्वारे व्हायची. जिथे हे पर्याय नाहीत आणि कार वगैरे रेंट करायचीय अशा वेळी मी हॉस्टेलमधील पोरं शोधतो जी माझ्यासारखीच टूरिस्टीक स्पॉट टाळून वेगळं भटकतात. मग त्यांचा एक वॉट्सअप ग्रुप करायचा आणि प्रत्येकाने त्यात होईल तो खर्च नोंदवत राहायचा. संध्याकाळी कॅफेत लगेच खर्च समान भागामध्ये स्प्लिट करायचा. Splitwise नावाचं ऍपही आहे यासाठी. ( मला हे जयपूरमध्ये ओळख झालेल्या आणि माझ्याच तालुक्यातील असलेल्या मैत्रिणीमुळे समजलं )

प्रवासात असताना एक डायरी बाळगा. त्यात महत्त्वाच्या आणि जवळच्या लोकांचे नंबर असावेत. आपला पत्ता असावा. काही सूचना वगैरेही चालतील. माझ्या डायरीच्या पहिल्या पानावर अशी नोंद आहे : 

"ही डायरी हरवली नी कुणाला सापडली नी त्यातही परत करावी वाटली तर खालील नंबरवर संपर्क करावा.
आतला मजकूर वाचावा वाटला तर वाचावा. डायरी स्वतःशी ठेवावी वाटली तर ठेवायलाही हरकत नाही. 
माझ्या आठवणी कुणाकडेही कुठेही सुरक्षित राहिलेल्या मला चालतील."

बॅगपॅक कोणती वापरतोस ? 

केशुआ ( Quechua ) या कंपनीची 60 लिटरची बॅगपॅक वापरतो. कारण ती लाइटवेट आहे. किंचित पावसातही ( रेन कव्हर न वापरता ) फॅब्रिक कोटेड असल्यानं भिजत नाही. आणि मुख्य म्हणजे माझ्या 7 ते 15 दिवसांच्या प्रवासातलं सामान त्यात व्यवस्थित मावतं. आणि तिच्यावर 10 वर्षांची वॉरंटी आहे. किंमत मी घेतली तेव्हा साधारण 15 हजार होती. 

किती रुप्ये साधारण उडवतोस ? 

माझा खर्च तसा फार नाहीय. दारू सिगरेट आणि गर्लफ्रेंडच व्यसन नसल्यानं मला तसा फार खर्च नाही. काळी कॉफी काळी टीशर्ट महिन्यात दोनचार पुस्तकं बस्स. तरी प्रत्येक ट्रिप 12-15 हजार बजेट असतं. आत्ताची दिल्ली-आग्रा-मनाली-कसोल ट्रिप याच बजेटमध्ये बसली.

का फिरतोस ? 

मी मूळचा भटका आहे. आमचं बिऱ्हाड असंच कुठूनतरी निघून कुठंतरी उभं राहिलं कोकणात. पाण्याच्या आसऱ्याला त्यांनी आपला ठावठिकाणा थांबवला. नि मला नव्या जागांचा मोह आहे. शहरात सलग राहणं मला जमत नाही. दर तीनेक महिन्यांनी मी घराबाहेर पडतो. कधीकधी जिथं जायचंय ते ठिकाणही निश्चित नसतं. मला माणसांमध्ये सुरुवात करून देण्याएवढं बोलायला आवडतं. नंतर प्रदीर्घ ऐकायला आवडतं त्यांचं बोलणं कसंही आडवंतिडवं. माझ्या फिक्शनमध्ये यातलं काहीतरी येतं. मला ते जाणीवपूर्वक आणायला आवडतं त्यांच्याच भाषेत. मला ते सगळं माझं वाटतं. त्यांचे दुःखद हसरे चेहरे स्वप्नात येतात माझ्या. मी यासाठी तळमळत असतो. माझी माया आहे त्या सगळ्यावर.

तर मी असा भणंग उंडारतो. घरचे मला भैकू ( उनाड, घरादाराची काळजी नसलेला ) म्हणतात.

मला ते अगदीच मान्य आहे.

***

Monday, October 14, 2024

भटक्या दिवसांच्या दरम्यानच्या नोंदी

29 सप्टेंबरला जोधपूरला उतरलो तेव्हा घंटाघरची देखभाल करणाऱ्या मुहम्मद इकबाल चाचाला फुरसतीत भेटायचं निश्चित केलं होतं. पुढचे तीन दिवस इथं होतो पण भेट झाली नाही. सकाळ संध्याकाळ नुसत्या फेऱ्या मारायचो. निराश होऊन 2 ऑक्टोबरला जोधपूर सोडून बिकानेरला गेलो. पहिले दोन दिवस वगळता कबीर यात्रेत फार काही हाती लागलं नाही. मग कंटाळून यात्रेचा शेवटचा दिवस न करता मी अन्वर हुसेन सर आणि चित्रकार मित्र अनुपने पुन्हा जोधपूरला यायचं ठरवलं. उन्हाच्या लकाकत्या ओळींच्या हालचाली मागेमागे सांडत टप्प्याटप्प्याने बसमधून उतरणाऱ्या-चढणाऱ्या रंगबेरंगी माणसांच्या आकृत्या बघत जोधपूरला उतरलो. दुपारचं ऊन इतकं कडाक्याचं कि झोस्टेलमधून बाहेर पडवेना. संध्याकाळी सरदार मार्केट मधल्या गल्ल्या धुंडाळत पुन्हा इकबाल चाचाला भेटायला घंटाघर गाठलं तर हा गडी तेव्हाही नव्हता तिथं. दिव्यांची मंद रोषणाई आणि कोपऱ्यात रावणहाथावर राजस्थानी लोकगीतं न वाजवता भलतीच बॉलिवूड हिट गाणी वाजत होती. खाली पायऱ्या उतरताना लक्षात आलं हा चक्क रावणहाथावर सलमानच्या बॉडीगार्डमधलं तेरी मेरी प्रेम कहाणी वाजवत होता. लोकसंगीतातल्या वाद्याचा च्यामारी केवढा इन्सर्ट ! 

घंटाघर । जोधपूर । फोटो : शोधण्यातली खाडाखोड 

काल सकासकाळी पुन्हा घंटाघर गाठलं. दोन्ही ढोपरांना  पोटाशी धरून इकबाल चाचा खुर्चीत तंद्रीत बसला होता. सरदार मार्केटचा भरगच्च कोलाहल आणि कबुतरांची अफरातफरी वारंवार. ही एक वेगळीच मजा. आवाजाच्या गुंतागुंतीची. अचूक हेरता येईल अशी प्रत्येकाची सुसूत्रता. 

1910 मध्ये राजा सरदार सिंह यांच्या शासनकाळात सरदार मार्केटच्या परिसरात घंटाघर बांधलं गेलं. साधारणतः 100 फूट उंच असलेल्या या इमारतीत तिसऱ्या मजल्यावर लंडनमधील लुंड अँड ब्लोकली कंपनीने तयार केलेलं तीन लाखांचं घड्याळ बसवलं. घड्याळ फक्त लाखाचंच होतं. उर्वरित दोन लाख घड्याळ बसवण्यासाठी आणि या घड्याळाची दुसरी प्रतिकृती न बनवण्याच्या करारासाठी मोजले गेले. 

चावीवर चालणारं हे भारतातील एकमेव घड्याळ आहे बहुतेक. दर गुरुवारी घड्याळाला चावी दिली जाते. 1911 साली बनवलेल्या चावीचं वजन 10 किलो आहे. इकबाल चाचांचा चावी धरलेला फोटो काढलाय. ही बडबड यासाठी केली कारण या वास्तूच्या स्थापनेपासून इकबाल चाचांचा परिवार या घड्याळाची देखभाल करतो. अक्ख्या जोधपूरमध्ये हे घड्याळ दुरुस्त करणारे मुहंमद इकबाल एकमेव व्यक्ती आहेत. वडिलांच्या निधनानंतर 2009 पासून ते आणि त्यांचा मुलगा शकील हे काम पाहतो. 

लंडनमधील लुंड अँड ब्लोकली कंपनीने तयार केलेलं तीन लाखांचं घड्याळ । फोटो : शोधण्यातली खाडाखोड 

त्यांना शोधत पुन्हा आलो म्हणून त्यांनी विनातिकीट घंटाघर कसं चालतं हे समजावून सांगितलं. गुंतागुंतीचे पार्ट्स दाखवले. मी जे काम करतो याचं कौतुक तुम्हा बाहेरून आलेल्यांनाच जास्त वाटतं. इथं कुणाला त्याची फारशी कदर नाही. कामाचं महत्त्व आणि त्याला दिला जाणारा सन्मान इथं नाही. इथला नगर निगमचा चपराशी महिना पन्नास हजार घेतो आणि माझा पगार ऑगस्टपासून आलेला नाही. सरकार चेंज हो गयी हैं देखते है क्या होताय! 

दहा किलो वजनाची घड्याळाची चावी आणि
इक्बाल चाचा । फोटो : शोधण्यातली खाडाखोड

पायऱ्या उतरताना इकबाल चाचा सांगत सुटला. वय झालंय. धाप लागते. तरी बोलणं सुरु होतं. तक्रार वगैरे कसं म्हणावं या बोलण्याला. वेगळं काम करणाऱ्या आणि वेगळं काही करू पाहणाऱ्या लोकांची कुठल्याही काळात साधारणतः अशीच अवस्था असते बहुतेक. मग विदेशी लोकांबरोबरच किस्से, त्यांचं प्रत्येक गोष्ट बारकाईने जाणून घेण्याचं कुतूहल वगैरे सांगत सुटले. 

आठवणी काही विस्मरणात जात नाहीत तरी फोटो काढला त्यांच्यासोबत. 

च्याय प्यायची त्यांच्यासोबत हे एक राहिलंच!

***





कबीर यात्रेचा एक मुक्काम बिकानेर जिल्ह्यातल्या कक्कू या गावात होता. कक्कू हे गाव सूत कातणाऱ्या 'कटवारी' समुदायाच्या रहिवासासाठी ओळखलं जातं. मारवाडी भाषेत सूत कातणे याला कताई म्हणतात. साधारणतः पाचशेहून अधिक कटवारी विणकर महिलांचा समुदाय कक्कू गावात राहतो. असं तिथला फॅक्टरी इन्चार्ज म्हणाला. एन.के.चौधरी यांनी 1978 साली स्थापन केलेली 'जयपूर रग्ज' ही गालिचा तयार करणारी कंपनी बिकानेर जिल्ह्यातील जवळपास तीनहजारहून अधिक महिलांना रोजगार देते. कापसाच्या प्राथमिक अवस्थेपासून त्याला लोखंडी ब्रशने घासून धागायोग्य सूत बनवण्यात आणि पुढे त्याचे गालिचे तयार होण्यात या महिलांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. 

बिकानेर जिल्ल्यातल्या कक्कू गावातील 'कतवारी' महिला । फोटो : शोधण्यातली खाडाखोड

जयपूर रग्जद्वारे या महिलांना सर्व सामग्री पुरवली जातेच शिवाय त्यांना सूत काताईचं प्रशिक्षणही दिलं जातं. शेतीचा कालखंड वगळता या महिला घरात किंवा अंगणात धागा तयार करतात. एक किलो धाग्याच्या वजनावर त्यांना प्रतिदिन शंभर रुपये आणि कंपनीतर्फे अधिकचे तीस रुपये असे एकूण 130 रु. मिळतात. अंगमेहनतीच्या तुलनेत हे पैसे फारच कमी आहेत असं इन्चार्जला विचारलं तर तो म्हणाला, घरच्या कामातून वेळ काढून, शेती करून या महिला हे काम करतात. आपापल्या क्षमतेनुसार त्या धागा विणतात. त्यामुळं साधारणतः प्रतिदिन दोनअडीच किलो प्रत्येक महिला धागा तयार करते. घरी मुलगी असेल तर तीही त्यांना मदत करते. पुरुष हे काम करत नाहीत का ? असं विचारल्यावर तो म्हणाला हे काम खास महिलांसाठीच आहे. पुरुष मंडळींना शेजमजुरी, ट्रक ड्राइविंग, किंवा फॅक्टरीत धाग्याला रंग देण्याची कामं आहेत. ज्यात मोबदला अधिक आहे. त्यामुळं पुरुष कताईच्या कामात नाहीत. 

फोटो : शोधण्यातली खाडाखोड











हस्तकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या गालिचांचे आकर्षक डिझाइन्स आणि त्यांच्या लाखोंच्या घरातल्या किंमती पाहता यांना या कामाचे अधिक पैसे मिळायला हवेत असं वाटलं. कडाक्याच्या उन्हात झरझर या बायांचे हात चालतात. हातांची हालचाल पाहून असं वाटतं एका मध्यम लयीतला राग सुरूय नि त्यांचे डोळे एकाग्र आहेत चरख्यावर. त्यांच्या हातांची पळापळ पाहिली तेव्हा लक्षात आलं सूत काततानाही यांच्या चेहऱ्यावर घुंगट आहे. मला त्यांचे डोळे पाहायचे होते. त्यांची लवलव पाहायची होती. 

फोटो : शोधण्यातली खाडाखोड

त्यांना हसताना पाहिलं तेव्हा उन्हाचे प्रहर मंदावले होते. एकाएकी केवढा गारवा पसरला हवेत. 

किती किती भरगच्चं आठवणी सोबत घेऊन निघालो या फोटोंसोबत.

***





वेगवेगळ्या प्रहरांत शहरांच्या हालचालीत कमालीची विविधता दिसते. व्याकुळ क्षणांच्या पाठमोऱ्या सावल्या अस्पष्टशा धूसर होतात आणि तांबूस रंग ओतणाऱ्या संध्याकाळी दगडी कोरीव महिरपी खिडक्यांच्या चिंचोळ्या फटींतून डोकावतात. किती हालचाली किती रंगांचे आविष्कार क्षणात दिशाभूल करणारे, किती आवाज आणि आवाजांच्या खाणाखुणा तपासणारे नाकभरून वाहणारे विविध गंध. 

फोटो : शोधण्यातली खाडाखोड










एका कमानीतून बाहेर पडताना कोपऱ्यातल्या चाव्यांच्या अत्यंत मळकट दुकानापाशी रेंगाळलो. त्या काळ्या कुळकुळीत लगडलेल्या चाव्यांच्या दुकानात पांढऱ्या सदऱ्यात बसलेला म्हातारा उठून दिसला. दुकानाच्याच वयाचा असेल. फोटोसाठी पुढं सरसावलो तर इलेक्ट्रिक शॉक लागल्यासारखं हलला नि पेपराची घडी मोडून म्हणाला, काढू नकोस. त्याच्या चेहऱ्याचा रंग आणि चाव्यांचा जुडगा असाच एकस्थायी झाला. चिंचोळ्या गल्लीतून मान वर करत कोरीव कामाचं कुतूहल डोळ्यात साठवत पार पुढं नवचौकिया परिसरात आलो. कित्येक पिढ्यांच्या हालचाली साठवलेल्या या घरांच्या देखण्या खिडक्यांवर सांजवत आलेल्या उन्हाची एक रेखीव छाप पडलेली दिसते आणि लक्षात येतं या प्रहराचं ऊन वेगळं आहे. शांतता आणि भेदकता पूरक आहे एकमेकांत.

फोटो : शोधण्यातली खाडाखोड

निळ्या रंगाची कैक आवर्तनं उजळून निघतात त्यात. संध्याकाळ हळूहळू विरळ होत जाताना एका तंबाखूच्या दुकानात थांबलो. तंबाखूच्या पानांच्या जुड्या टांगलेल्या होत्या पण माजी नजर खिळली ती तराजूच्या सभोवती मांडलेल्या पितळेच्या जुनाट डब्यांवर. काय वय असेल डब्याचं विचारलं तर मालक उच्चारला शंभर! तंबाखूचा डब्बा शंभर वर्षांचा म्हणजे किती संध्याकाळींचं ऊन घेतलं असेल याने अंगावर. किती उघडझाप आणि किती पिढ्यांच्या हातांचा स्पर्श. इथला उजेड वेगळा आणि गंधही. अत्तर पारखताना कॉफीचा गंध ओढतो तसं इथं करून पाहायला हवं होतं. वेगळाच सुगंध आला असता. वासही असतोच चांगला. रंगगंध किती प्रहरांना हुलकावणी देतो नाही ! संध्याकाळ किती वेगळेपण कोरते. 

***


फोटो : शोधण्यातली खाडाखोड


















पुन्हा नवं शहर, माणसं, हालचाली, देवघेव, नुसतं पाहणं आणि संध्याकाळींचा पाठलाग होईस्तोवर हे इतकंच. किंवा याहून वेगळं असेल गवसलेलं !

***

अधल्यामधल्या भटक्यानोंदी : मुक्काम बगरु

बगरु गावात शिरताना  जयपूरपासून साधारणतः चाळीसेक किमी अंतरावर असलेल्या बगरु गावात होस्टेलमधल्या एका मुलाला घेऊन गेलो. तो बाईक घेऊन राजस्थान फ...