Showing posts with label इतर खाडाखोड. Show all posts
Showing posts with label इतर खाडाखोड. Show all posts

Thursday, February 5, 2026

अधल्यामधल्या भटक्यानोंदी : मुक्काम बगरु


बगरु गावात शिरताना 

जयपूरपासून साधारणतः चाळीसेक किमी अंतरावर असलेल्या बगरु गावात होस्टेलमधल्या एका मुलाला घेऊन गेलो. तो बाईक घेऊन राजस्थान फिरतोय मागच्या पंधरा दिवसांपास्नं. कॉन्टेन्ट वगैरे तयार करतो. रुबल त्याचं नाव. म्हटलं असं असं गाव आहे येतोस का ? तर हो म्हणाला. जयपूर लिट फेस्टमध्ये मराठी भाषा विभागाच्या स्टॉलवर माझी मुलाखत होती. म्हटलं ती उरकून येतो तोपर्यंत तू गाडी वगैरे आवर. मुलाखत आटपून गाडीवरनं सुस्साट निघालो. नॅशनल हायवेला लागून गाव होतं तरी गुगल मॅपने गंडवलं. वीसेक मिनिटं मागे-पुढे करण्यात गेली. दुकानदारांना विचारत पोचलो गावात. सिमेंटचे ढिगारे असतात तशी घरं. गाव असंही धड म्हणता येईल अशी चिन्ह नाहीत. गाव म्हटल्यानंतर आपली आपली डोक्यात रचना किंवा एक सर्वसाधारण चित्र असतं त्याहून हे गाव अगदीच निराळं. बहुतांश राजस्थानात हेच चित्र. कबीर यात्रेच्या दरम्यान एक मुक्काम पुगल या गावी होता. अर्थात तिथं पोहोचेपर्यंत मावळलं होतं. पण गाव ज्याला म्हणू अशा काहीच खाणाखुणा नाहीत. गवताच्या झुलपांनी झाकलेली छतं आणि लाल-राखड्या मातीची घर हे फक्त महागड्या रिसॉर्ट्समध्ये परावर्तित झालेलं आढळलं काही ठिकाणी. त्यामुळं बगरु गाव हे असं नव्या आधुनिक आक्रमणात उभं राहिलेलं दिसलं. माणसं तीच पण जगण्यात एकप्रकारचा निमशहरीपणा आलेली. अर्थात हे काही वाईट नाही. माणसं जगण्याचे पर्याय आपापल्या परीनं निवडत असली, तरीही काळ स्वतःच्याच गतीनं पुढं सरकतो. अपरिहार्यपणे माणसंही त्यापाठोपाठ चालू लागतात. त्यामुळं इथं दोष देणं किंवा हळहळणं उपयोगाचं नाही. 

दृष्टान्तपाठ मध्ये 'रोवंतलेया पशूचा दृष्टांत' आहे. तो असा : 


पशु असे : ते आडीदरडी चरे : पोट भरे : मग एकी ठाइं बैसोनि रोवंती ।

तेणे तयाचीया सप्तधातु निवती : तुष्टि होए पुष्टि होए बळ होए ।।


गावाचा एक फोटो 

बगरुत उतरल्यावर हा दृष्टांत आठवला. गावखेड्यात अगदी आत्ताआत्तापर्यंत रानातून चरून आलेली गुरंवासरं कुणाच्याही अंगणात किंवा झाडांच्या सावलीत रवंथ करताना मी पाहिलेली आहेत. वरील दृष्टांतातील अर्थ सांगण्यात पॉईंट नाही. त्यातली भाषा आणि तिची लय इतकी मोहवून टाकणारी आहे कि कुणालाही तिच्या ठायी असलेला अर्थ उमगेल. प्रत्येक गावात हे अस्सचं चित्र असेल हे काही मनात साठवून मी बगरुकडे निघालो नव्हतो. पण कायापालट किती झपाट्यानं होतो आणि तो आपल्याला किती टोचतो हे मात्र आवर्जून उमगलं. बगरु गावात ते उमगणं जास्त अंगावर आलं.


बगरु गाव हे ब्लॉक प्रिंटसाठी ओळखलं जातं. पारंपरिक पद्धतीने नैसर्गिक रंग वापरून बगरु छपाई करणारे हजारेक कारखाने इथं आहेत. त्यामुळं गावाचंही नाव बगरु असं आहे. 

एकदोन दुकानदारांना कारखाने कुठं बघता येतील व्यवस्थित विचारलं तर, इथे खूप कारखाने आहेत. कुठेही जा असं उत्तर मिळालं. थोडं शोधल्यावर बगरु छपाईसाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि पद्मश्री मिळालेल्या राम किशोर डेरेवाला यांचा कारखाना सापडला. पण फोटो आणि छपाई कौशल्य समजून घेण्यासाठी तुम्ही वर्कशॉपला या असं त्यांचा मुलगा म्हणाला. मुंबई वरनं आलोय आणि मी लिहितो वगैरे रुबलने सांगितल्यावर थोडीबहुत माहिती दिली. पण हे काही पुरेसं नव्हतं. पुन्हा कधीतरी वर्कशॉपला येऊ म्हणत आम्ही बाहेर पडलो. आता कुठे जायचं म्हणत गाडी सुरु झाली आणि गावाच्या गल्लीबोळात वळणं घेऊ लागली. इतक्यात गच्चीवरनं नुकतीच छपाई पूर्ण होऊन उन्हात सुकण्यासाठी खाली सोडलेल्या साड्या दिसल्या. थांब बोलल्यावर रुबलने कचकन ब्रेक मारला. नईवाल भवन नावाचं घर दिसलं. काहीतरी सापडेल म्हणून थेट दारात गाडी उभी केली. उन्हात सुकलेल्या साड्या गोळा करणाऱ्यांना बोललो, मुंबईवरनं आलोय. थोडी या छपाईच्या कामाविषयी माहिती हवीय. तुमची परवानगी असेल तर आम्ही वर जाऊन पाहू शकतो का ? तर हातातल्या साड्यांचा गोळा खाली ठेवत त्यांनी मुलाला हाक मारली. म्हणाले यांना घेऊन वर जा. मुलाचं नाव सागर. 


सागर. मोकळेपणानं हसतोय. 

तो अगदी आनंदानं वरच्या मजल्यावर घेऊन गेला. खाली घर आणि वर कारखाना. बिन्धास्त विचारा फोटो काढा म्हणाला. वरच्या मजल्यावर काही बायका, मुली अगदी बारीक नजरेनं कपड्यावर ब्लॉक उमटवत होत्या. आम्ही आलोय वगैरे त्यात त्यांना काही रुची नव्हती. नजर एकाग्र. विवीध रंगांचे डबे, त्यात बुडालेले ब्लॉक आणि त्यांच्या हातांची लक्षणीय लय. ब्लॉक कपड्यावर उमटताना एक विशिष्ट आवाज आणि रंग भरल्यावर कपड्याचा येणारा किंचित कुबट वास. तो बहुतेक नैसर्गिकपणे रंग तयार करण्याची जी प्रक्रिया आहे त्यामुळे येत असावा. सागरने कपड्यापासून रंग कसे तयार होतात, त्यात कोणकोणते घटक असतात, रंग तयार होण्याचा कालावधी, ब्लॉकच्या निरनिराळ्या डिझाइन्स, छपाईची प्रक्रिया, धुलाई, त्यात समाविष्ट करायची इमलीची फुलं, आल नावाचा दगडाचा प्रकार अशा बऱ्याच गोष्टी सविस्तर सांगितल्या. मला त्याच्याकडे कामाला असणाऱ्या बायकांच्या बाबतीतला एक प्रश्न होता. यांना प्रशिक्षण दिलं जातं का आणि ब्लॉकच्या डिजाइन्सनुसार कोणकोणते रंग वापरायचे हे त्यांना कोण सांगत ? कि त्या स्वतःच निर्णय घेतात? कारण मी दोनेकतास जे पाहत होतो त्यात त्या स्वतःच ब्लॉक निवडायच्या त्यात स्वतःच रंग भरायच्या आऊटलाईन द्यायच्या. सागर म्हणाला, आम्ही एक महिना त्यांना प्रशिक्षण देतो. त्यानंतर दिवसभराचं जे काम असेल त्याप्रमाणं साडी, ओढणी किंवा कटपीस वगैरेचं ब्लॉक डिजाईन आणि त्यामध्ये भरायचे रंग याचा नकाशा त्यांना दिला जातो. त्याप्रमाणे त्या त्या-त्या ब्लॉकमध्ये रंग भरतात. सागर साड्यांचं डिजाईन स्वतः किंवा ग्राहकांच्या मागणीनुसार तयार करतो. 


सागरकडे काम करणाऱ्या महिला कारागीर 

आता थोडं संपूर्ण प्रक्रिया कशीकाय असते हे जाणून घेऊया.

बगरु प्रिंटसाठी वापरण्यात येणाऱ्या पांढऱ्या कपड्यावर हरड डाय केली जाते. त्यामुळं पांढऱ्या कपड्याचा रंग हलकासा पिवळसर होतो. हे करण्याचं एक कारण म्हणजे बगरु प्रिंट ही केवळ पिवळ्या रंगाच्या कापडावरच केली जाते. कारण नैसर्गिक प्रक्रियेद्वारे तयार केलेले रंग पिवळसर कपड्यावरच उठून दिसतात असं सागरचं म्हणणं. या कपड्यावर वेगवेगळ्या ब्लॉकद्वारे मागणीनुसार डिजाईन छापली जाते. दिवसभर सुकवून दुसऱ्या दिवशी एका मोट्ठ्या तांब्याच्या भगून्यात आदल्या दिवशी प्रिंट केलेली सगळी डिझाइन्स उकळण्यासाठी ठेवली जाते. या पाण्यात 'आल' ( पिवळसर रंगाचा धातू, जो बगरु गावात चायनाकडून आयात केला जातो.) रंग आणि इमलीची फुलं मिसळली जातात. आणि मग हे मिश्रण गरम पाण्यात साधारणतः दोन तास उकळलं जात. मग पुन्हा प्रिंट सुकवून त्यावर हरड डाय केली जाते. ही सगळी प्रक्रिया पूर्ण केल्यावर एक हात इस्त्रीचा मारला कि माल मार्केटमध्ये जाण्यासाठी तयार! 


प्रिंट उकळण्याचं तांब्याचं भांडं 

सागर कॉटन व्यतिरिक्त महेश्वरी, चंदेरी, मोडाल असे फॅब्रिकचे वेगवेगळे पर्याय प्रिंटसाठी वापरतो. सिल्क पर्याय तो वापरत नाही. पारदर्शक कपड्यात रंग डिजाइन्सच्या बाहेर पडतात आणि ते काम फार किचकट होतं किंवा रंग जरी सिल्क कापडात भरले तर धुवताना ते रंग पुसले जातात असं तो म्हणाला. सागरकडे तयार होणारी बगरु प्रिंट कॉटन साडी ८००-१००० रुपयांना विकली जाते. बाजारात त्याच साडीची किंमत साधारणतः १५०० रुपयांपर्यंत जाते. सागर स्वतः त्याच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम ( bagru Fab Printers ) पेजद्वारे विक्री करतो. शिवाय जयपूरमधील अनेक विक्रेते त्याचा माल उचलतात. 




आल रंग, रंग कुजवत ठेवण्याचं भांडं आणि इमलीची फुलं. 


गध आणि रेख 

ब्लॉक डिझाईनचा जो साचा असतो त्याचे दोन प्रकार असतात. एक गध आणि दुसरा रेख. गध म्हणजे बाह्यरेखा. सोप्प्या शब्दात सांगायचं तर आऊटलाईन ! आणि रेख म्हणजे ज्यात रंग भरायचे आहेत ती पोकळी. रिकामी जागा.

घराच्या मागच्या आवारात रंग तयार करण्यासाठी ठेवले होते. एका भांड्यात गूळ आणि लोखंड कुजत ठेवलेलं. पंधराएक दिवसांनी त्याचा काळा रंग तयार होणार होता. दुसऱ्या भांड्यात इमलीच्या फुलांपासून तयार केलेलं पीठ होतं. ते रंगात मिसळलं कि रंग घट्ट होतो. अशी चारपाच मोट्ठी भांडी आणि त्यात कुजत ठेवलेले रंग. सागरने हे मोकळेपणानं सगळं दाखवलंच पण इत्यंभूत माहितीही दिली. 


रंग आणि कपड्यावर उमटलेली आकृती 

सागरचे आजोबा, वडील आणि सागर अशी तिसरी पिढी हा व्यवसाय करतेय. मी शेती वगैरे आहे का विचारलं वडिलांना. तर नाही म्हणाले. याच कामात सगळा परिवार गुंतलाय. सागर हे काम मनापासून करतोय. कामावर येणाऱ्या बायकांना सन्मानानं वागवतो. साडेपाच झालेले. बायका आवरून निघत होत्या. कोपऱ्यात एका मुलीचं काम सुरूच होतं. सागर म्हणाला, क्या गुडिया घर नहीं जाना क्या ? 


सागरचं कुटुंब

खाली उतरल्यावर सागरने कुटुंबातील सगळ्यांशी ओळख करून दिली. निघताना सागरचे आजोबा म्हणाले, येत राहा. आम्ही पायाच पडलो दोघंही. किंचित गारठा वाढताना हॉस्टेल गाठलं. कमाल दिवस. सगळं सांगायचं म्हटलं तर खूप सारं लपलेलं उरतं सांगायचं. बस थांब्यावर गालाला हात लावून वाट पाहणारी माणसं, घरी वडील आजारी आहेत म्हणून शिक्षण सुटलेला एक छोटूही सापडतो कचोरीच्या ठेल्यावर. त्याचं हसणं विसरता येत नाही. शाळेत का जात नाहीस असं मला अजिबातच विचारता आलं नाही. 


घरातला एक कोपरा.


इथे जोडलेले सर्व फोटो सागर यांच्या परवानगीने काढलेले आहेत. राजस्थानात गेलात आणि ही सगळी प्रक्रिया समजावून घ्यावी वाटली किंवा सागर यांना भेटावं किंवा त्यांच्याकडून घरबसल्या ब्लॉक प्रिंटमधल्या वस्तू मागवायच्या झालं तर खाली सागर चिपा यांचा नंबर जोडतो. वर जिथं त्यांच्या इंस्टाग्राम पेजचा उल्लेख आलाय तिथं क्लिक केल्यास थेट त्यांच्या पेजवर जाऊन, त्यांचे प्रोडक्ट्स पाहून खरेदीही करण्याचा पर्याय आहे.

सागर चिपा : +91 95710 64659.



***



Monday, October 27, 2025

नारायण सुर्वे : लढाऊपणाचं संयमी स्वगत


आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात अढळ स्थान असणाऱ्या कवी नारायण गंगाराम सुर्वे ( १५ ऑक्टोबर १९२६ - १६ ऑगस्ट २०१०) यांचं जन्मशताब्दी वर्ष १५ ऑक्टोबर २०२५ पासून सुरु झालं. पॉप्युलर प्रकाशनाच्या ‘प्रिय रसिक’ या मासिकासाठी सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने लिहिलेलं हे टिपण : 

*** 

ऐसा गा मी ब्रह्म (१९६२), माझे विद्यापीठ (१९६६), जाहीरनामा (१९७५) आणि नव्या माणसाचे आगमन (१९९५) असे केवळ चार छोटेखानी काव्यसंग्रह. साधारणतः चाळीस-पंचेचाळीस वर्षांची वाङ्मयीन कारकीर्द. आणि १४५ च्या आसपास एकूण कविता. एवढ्या ऐवजावर आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात अढळ स्थान असणाऱ्या कवी नारायण गंगाराम सुर्वे ( १५ ऑक्टोबर १९२६ - १६ ऑगस्ट २०१०) यांचं जन्मशताब्दी वर्ष १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. 'मी जन्मलो तेव्हा काही नाम धारण करून जन्मलो नाही. मात्र मी नसेन तेव्हा ह्या पृथ्वीच्या पाठीवर एक नाव ठेवून जाईन.' स्वतःच्या जडणघडणीसंदर्भात सुर्वे यांचे वरील उदगार आहेत. सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आरंभ होत असताना या उद्गाराची प्रस्तुतता महत्त्वाची वाटते. भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अशा दोन्ही निर्णायक चळवळींच्या सानिध्यात सुर्वे यांची जडणघडण झालेली आहे. अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमरशेख यांच्या बुलंद आवाजाचा आणि परिवर्तनशील लेखणीचा आधार त्यांच्या पाठीशी होता. बालमजूर म्हणून गिरणीत केलेलं काम आणि त्यातून कामगार चळवळीशी जुळलेली नाळ ही पार्श्र्वभूमी  लक्षात घेतली तर नारायण सुर्वे यांचा जीवनसंघर्ष आणि त्यातून प्रसवलेली अनुभवनिष्ठ कविता हे आधुनिक मराठी कवितेचं निर्णायक पाऊल ठरते. 

नारायण सुर्वे यांचे कवितासंग्रह. प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन, मुंबई. 


थोडे साहिलेले, पाहिलेले, जोखिलेले आहे 
जसा जगत आहे मी तसाच शब्दात आहे 

असा अत्यंत प्रामाणिक आणि अनुभवलक्ष्यी सूर सुर्वे यांच्या कवितेचा आहे. जीवन आणि कविता यात अधीकचे अंतर नाही. जे जगण्यात आहे अगदी तसेच कुठल्याही आडपडद्यांशिवायचे मोकळे जग या कवितेत आहे. सर्वसामान्य माणसांच्या रोजच्या जगण्यातले कितीतरी संदर्भ, घटना, भाषेचा खळाळता नाद या कवितेत अवतरतो. हर तऱ्हेची माणसं, त्यांच्या बहुविध मिती, बेवारस मुले, कणखर स्त्रियांच्या स्वभावखुणा, जातीधर्माच्या पल्याडचे करुणेने भरलेले जग आणि कामगार आणि कामगारवर्गाच्या अधःपतनाचे कैक संदर्भ नारायण सुर्वे यांच्या कवितेत यांत्रिकपणा टाळून अवतरतात. 

'मजूर हा शब्द मी कटाक्षाने टाळतो. असे शब्द टाळताना माझी राजकीय व सामाजिक भूमिकाही असते. त्याऐवजी मी माझ्याच लोकांच्या बोलीभाषेतले शब्द उचलतो. ते अधिक सामर्थ्यवान वाटतात. सामान्य लोकांची भाषा हीच खरी कवितेची भाषा.' 

जाहीरनामा या संग्रहासाठी लिहिलेल्या 'कविता आणि मी' या लेखातील वरील ओळी सुर्वे कविता या घटकावर किती बारकाईने आणि गांभीर्याने विचार करीत होते याची प्रचिती येते. केवळ लोकभाषेतले शब्दच नाहीत तर लोकभाषेत नांदणाऱ्या माणसांना कवितेचा विषय करणे हेही सुर्वे यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक कविता पाहिल्यावर लक्षात येते. 

भूमिनिष्ठ लेखकाच्या जाणिवा तळागाळातील लोकव्यवहाराशी किती एकरूप आणि घनिष्ट असतात याचे निखळ उदाहरण सुर्वे यांच्या काव्यसंग्रहांत सापडते. या सहसंबंधांची घट्ट वीण आणि त्या जीवनव्यवहारांकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती यांची अजोड अशी बांधणी या कवितांमधून आविष्कृत होते. केवळ गिरणी कामगार वर्ग किंवा श्रमिकांच्या जगण्यातल्या व्याकुळतेचाच नव्हे तर सर्वहारा वर्गाच्या स्थित्यंतराचा चिंतनशील आढावाही ही कविता घेते. सुर्वे यांच्या जगण्या-लिहिण्यात असलेली साम्यवादी जाणीव कवितेच्या निर्मितीचे कारण आहे. कवी आणि मार्क्सवादी चळवळीचा कार्यकर्ता ही सुर्वे यांची ओळख त्या अनुषंगाने पूरक आणि तत्वनिष्ठ अशी आहे. सुखदुःखांची अनेक करूण आणि शाश्वत अशी रेखाचित्रे सुर्वे यांच्या कवितेत उमटतात. म्हणूनच या समूहचित्रांचे बहुपदरी कोलाज सुर्वे यांच्या कवितेत एखाद्या अढळपदासारखे उपस्थित असतात.

आफ्रिकी चाचा चिडे, थुंके, म्हणे; "काम नही करेगा."

चिलमीवर काडी पेटवीत मी विचारी, "चाचा, पेट कैसा भरेगा ?"

किंवा 

आलं आलं वरीस जमीन नांगरून 

उभं पीक नाचे फुलून 

पर एक मेला सावकार ठोला 

हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा 

असं उपाशी राहून ग आम्ही मरावं किती 

डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती 

आलं वरीस राबून मी मरावं किती 

अशाप्रकारची संवादी आणि लोकव्यवहारातील भाषा सुर्वे यांच्या कवितेत मुक्तपणे बागडते. ती मुक्त आहेच, परंतु तुकारामाच्या अभंगांसारखी जनमाणसांत मुखोद्गतही आहे. कष्टकरी वर्गाचे शोषण, त्यामागची भांडवली मानसिकता, जगण्याचा अविरत चिवटपणा आणि त्यामागील साम्यवादी विचारदृष्टी सुर्वे यांच्या दर संग्रहागणिक चिकित्सेचे टप्पे गाठताना दिसते. मार्क्सवाद-लेनिनवाद ह्या विचारदृष्टीसोबतच सर्वहारा, कामगारवर्गाच्या जगण्याचे अनेक चिरंतन संदर्भ अधिक गडद होत गेलेले या कवितेत दिसतात. माणसांसोबतच त्याच्या भवंतालातल्या असंख्य दुर्लक्षित घटकांचा समावेश या कवितेत स्वाभाविकरीत्या असतो. शोषित-वंचित समूहातले अव्यक्त आवाज या कवितेत लक्षणीयरीत्या मुखर होतात. उदा. म्हणून 'शिगवाला' या कवितेतल्या खालील ओळी पाहता येतील. एका साध्या अनुभवाला कवितेचा रचनाबंध देऊन सुर्वे इथे विलक्षण संवादी लय जुळवून आणतात. अशीच संवादी लय 'मुंबई' आणि 'गिरणीची लावणी' या कवितांमध्ये आढळते. सुर्वे यांची लोककलाप्रकारावर असलेली नितांत श्रद्धा आणि आत्मीयता या रचनांमधून आविष्कृत झालेली दिसते. 

नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता 
प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन

देख ये मेरा पाय 

साक्षीको तेरी आई काशीबाय 

'मी खाटीक आहे बेटा - मगर 

गाभणवाली गाय कभी नही काटते''

आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात सर्वसामान्य लोकांच्या जगण्यात इतक्या बेमालूमपणे मिसळलेली कविता इतरत्र क्वचित दिसते. सुर्वे यांच्या अत्यल्प कवितेने हे साधले आहे. 

सुर्वे याच्या कवितेचे मूल्यभान हे इथल्या कष्टकरी जनतेच्या जगण्याशी एकरूप झालेले दिसते. समूहभावना आणि तिच्याशी असलेली बांधिलकी या कवितेच्या रचनेशी दिसते. शहराचे, कामगारांचे आणि पर्यायाने कामगारवर्गाचे जे चित्र ही कविता रेखाटते त्याच्याशी सुर्वे यांची मानवतावादी दृष्टी एकरूप झालेली दिसते. 



कधी विचार असे येतात 

जसे थकून यावेत तिसऱ्या पाळीचे कामगार घरात 

अशाप्रकारचा करुणाभाव या निर्मितीशी असलेला जाणवतो. 

आणि 

स्वतःलाच शोधण्यात अर्धी उमर हरवून गेलो 

स्वतःकडून लाखदा वळलो; तरीही आढळलो नाही  

याप्रकारची एक अगम्य तटस्थताही दिसते. सुर्वे यांच्या कवितेत ही दोन्ही टोकं एकप्रकारे स्वतःची समजूत घालावी अशाप्रकारचा विचारवाद बाळगतात. कदाचित म्हणूनच 'एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे.' असा निर्मळ कबुलीजबाबही या कवितेत दिसतो. सुर्वे यांच्या बहुतांश कवितांमध्ये आढळणारा आत्मकथनात्मक आशय हा या कवितेत एकप्रकारची सर्वव्यापी जाणीव विस्तारत नेतो. एक व्यापक आत्मकथनात्मक अवकाश या निर्मितीने व्यापलेला आहे. 'पुढच्या युगांची सर्वच दुःखे मीही भोगीन म्हणतो' असा स्पष्ट जाहीरनामाच घेऊन ती उभी आहे. 

सुर्वे यांच्या कवितेत आढळणारी समन्वयवादी मानवी दृष्टी शोषणमुक्त समाजाचे पसायदान मागते. खंगलेल्या, पिचलेल्या आणि जगणं विसरलेल्या अनेक माणसांचा ती आवाज बनते. मात्र ती आवाजी बनत नाही. 

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले 

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे 

असा संयम आणि समंजसपणा या कवितेत आहे. या संयमातून आणि समंजसपणातून एक निष्णात लढाऊपणाचा स्वर या कवितेत मिसळलेला आहे. 

कामगार आहे मी तळपती तलवार आहे 

सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा घडणार आहे.

ही स्पष्टता या लढाऊपणाच्या स्वरात आहे. आणि हा स्वर श्रमिकांच्या लढ्याचे प्रतीक आहे. नारायण सुर्वे यांची कविता केवळ तो मार्ग चोखाळत नाही तर त्या मार्गाशी एकनिष्ठही राहते. कलात्मकता आणि कला व जीवन यांच्या गुंत्यातून सुटून आशय आणि भाषाभान जपत ती प्रवाही होते. हे अत्यंत महत्त्वाचं कार्य नारायण सुर्वे यांच्या अत्यल्प कवितेने केलेलं आहे. नारायण सुर्वे ह्या पृथ्वीच्या पाठीवर खरोखरंच एक खणखणीत नाव ठेवून गेलेले आहेत. 

***


Monday, November 27, 2023

आदले । आत्ताचे : समकालीन कल्लोळाची कथा…

''मुंबईच्या गर्दीचा, रेल्वे व्यवहारांचा आणि शहरातील सर्व महत्त्वाच्या परिसराचा फेरफटका घडवत आजच्या शहरी तरुणांची विरत चाललेली स्वप्ने मांडणारी कादंबरी नुकतीच आली आणि वाचकप्रिय झाली. कादंबरीतील सामाजिक व्यवस्थेला व्यवस्थितपणे सामावून घेणारी भाषा सापडणे बऱ्याचदा लेखकाचा कस पाहणारे असते. इथे साजेशी भाषा घडविण्यामध्ये लेखक यशस्वी झाला आहे.''

*** 

प्रदीप कोकरे या तरुण लेखकाची खोल खोल दुष्काळ डोळे ही कादंबरी वाचत असताना मला भालचंद्र नेमाडेंचं एक विधान आठवत होतं. नेमाडे एकदा म्हणाले होते की, साधारणत: पंधरा-वीस वर्षांनी पिढी बदलते. प्रत्येक नव्या पिढीची मानसिकता आदल्यांहून वेगळी असते. जगाकडे बघण्याचे दृष्टिकोन भिन्न असतात. काळ बदलला की प्रश्नांना समोर जाण्याचे प्रत्येकाचे मार्गही बदलून जातात. त्यामुळे ‘कोसला’ मी माझ्या काळच्या तरुण पिढीला समोर ठेवून लिहिली. आजचा एखादा तरुण ‘कोसला’ला नाकारून आजच्या काळातल्या तरुणांच्या नजरेतून जगाला सामोरं जाईल. प्रत्येक पिढीची आपली आपली एक ‘कोसला’ असते.

हा लेख लोकसत्ता, लोकरंग पुरवणीत आदले । आत्ताचे या सदरात दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी
प्रकाशित झाला होता. फोटो : लोकसत्ता  

अधूनमधून काही कादंबऱ्या वाचत असताना हे आठवतं. या कादंबऱ्या आठवतात, त्या ‘कोसला’शी साम्य असलेल्या असतात किंवा ‘कोसला’च्या प्रभावातून लिहिलेल्या असतात असंही काही म्हणता यायचं नाही; पण त्यातली संवेदनशीलता ‘कोसला’ला समांतर जाणारी असते; आपल्या आपल्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी असते.

प्रदीप कोकरे यांची अलीकडेच लोकवाङ्मय गृह, मुंबई या प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेली कादंबरी ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या अर्थाने आजच्या काळातल्या महानगरीय तरुणांच्या संवेदनविश्वाला जवळ जाणारी प्रातिनिधिक कादंबरी आहे. महानगरीय असं म्हटलं तरी आजच्या काळात एकूणच आधुनिक संवेदनांची ज्या पद्धतीने सरमिसळ होऊ लागली आहे, ती पाहता ही कादंबरी केवळ महानगरीय तरुणांच्या संवेदनविश्वापुरती मर्यादित राहत नाही. ती त्याहूनही अधिक अवकाश व्यापताना दिसते. अर्थात, महानगर हे या कादंबरीच्या नायकाच्या वर्तमान जगण्याच्या संघर्षांच्या केंद्रस्थानी असल्याने यात चित्रित झालेल्या बहुतांश सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक घडामोडींमधून महानगरीय संवेदनाविश्व दृग्गोचर होत राहते. नायक काही दिवसांसाठी गावी गेल्यावर निवेदनात तिथल्या दैनंदिन लोकजीवनाचे तपशील येतात. त्यातही गावातल्या बायकांच्या टीव्हीवरच्या सीरियल्सच्या अनुषंगाने चाललेल्या गप्पा, फोन, क्रिकेट वगैरेमुळे आधुनिकीकरण ग्रामीण संवेदनाविश्व कसे व्यापत आहे आणि नायकही आपले अगदी कालपरवापर्यंतचे तिथे त्याच परिसरात गेलेले आयुष्य नजरेआड करू पाहताना शहरी जगण्याच्या विवंचनातून बाहेर येऊ शकत नाही, हेही समोर येत जाते. गावच्या त्या परिसरात जगत असताना आपण केवळ परंपरेने म्हणून स्वीकारलेल्या काही सांस्कृतिक संरचनांकडे काहीशा संशयास्पदपणे पाहण्याचा नायकाचा प्रयत्नही त्यातून जाणवत राहतो. ही जाणीवही त्याला महानगरीय संवेदनांनी त्याचा वर्तमान व्यापलेला असल्याने झाली असावी, असे वाटते.

कादंबरी हा साहित्य प्रकार वर्तमानाचे बोट पकडून उभा राहत असल्याने भूतकाळ मागे टाकून समकालीन जगण्याच्या शक्यतांचा शोध घेणे हेच कादंबरीकारासमोरील महत्त्वाचे आव्हान असते. या आव्हानाला लेखक कसा सामोरा जातो, काळाने उभे केलेले पेच तो कसे सोडवतो, त्यासाठी स्वत:ची भाषा कशी निर्माण करतो, यातून लेखकाचे सामर्थ्य दिसून येत असते. प्रदीप कोकरे यांनी हे आव्हान या कादंबरीमध्ये बऱ्यापैकी यशस्वीपणे पेलले आहे, असे म्हणावे लागते. मुंबई या महानगराचा अवकाश निवडल्यावर तिथल्या संबंधित परिसराचे, तिथे राहणाऱ्यांच्या दैनंदिन जगण्याचे, जगण्यासाठी आणि आपले वर्चस्व टिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षांचे, सांस्कृतिक व्यवहारांचे, मानसिक स्तरावरील उलाढालींचे जे तपशील लेखकाने दिले आहेत, त्यातून एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील पहिल्या दोन दशकांचे वर्तमान वाचकाच्या नजरेसमोर ठळक होत जाते. प्रथमपुरुषी निवेदनाचा वापर करत नायक स्वत:च्या जगण्याविषयी बोलत असला तरी त्यातून महानगरातील गलिच्छ वस्त्या, तिथलं लोकजीवन, त्यांचे परस्परांशी असलेले संबंध, रोजीरोटीबरोबरच आत्मसन्मानासाठी निर्दयी तसेच आत्मकेंद्री व्यवस्थेशी करावा लागणारा झगडा, विचारी व संवेदनशील माणसाची या व्यवस्थेत होणारी घुसमट, त्यातून येत जाणारा संवेदनांच्या पातळीवरील बधिरपणा, अंतिमत: त्याची परिणती म्हणून परात्म होत जाणे, अशा असंख्य गोष्टींविषयी वाचकाला कळत जाते.

या कादंबरीचा नायक गावातल्या मोकळय़ाढाकळय़ा वातावरणातून पोटापाण्याची काही तरी सोय लावावी म्हणून बाह्यत: गजबजलेल्या, तरीही आतून आक्रसलेल्या शहरात येऊन स्थिरावू पाहतो. या शहराच्या सगळय़ा आत-बाहेरच्या कल्लोळांशी त्याने बऱ्यापैकी जुळवून घेतले आहे. कादंबरीच्या प्रारंभापासूनच पुढे कादंबरीभर पसरून राहिलेले या कल्लोळांचे पडसाद आपल्याला सतत जाणवत राहतात. नायकाच्या भावविश्वाचाच एक भाग बनून गेल्यासारखे त्याच्या एकटेपणातल्या चिंतनातून, दैनंदिनी, कविता वा शिव्यांतून, वेगवेगळय़ा माणसांशी बोलाचाली, व्यवहार करताना घडणाऱ्या कृती अशा सगळय़ामधून ते कमीजास्त तीव्रतेने व्यक्त होतात. तो म्हणतो तसं या कल्लोळांची त्याला हळूहळू सवय होत जाते. त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तो अधिकाधिक त्यात हरवून जातो. वाढ खुंटून स्थितिशील झाल्यासारखा बथ्थडपणे गरगरत राहतो. साधारणत: हे कादंबरीचे एक मध्यवर्ती सूत्र म्हणून सांगता येईल. या मध्यवर्ती सूत्राच्या अनुषंगाने या कादंबरीतील सर्व घटना, प्रसंग, वर्णने, निवेदन, विविध पात्रांचे परस्परसंबंध यांकडे पाहता येऊ शकते.

कादंबरीची सुरुवात नायकाच्या रोजच्या जगण्यातील एका नेहमीच्या सवयीच्या पहाटेपासून होते. शौचाला जातानाचे तपशील, संडाससाठी असलेली रांग, पोटं तुरंबलेल्या तिथल्या माणसांची क्षुद्र अरेरावी, कुरघोडय़ा, शिव्या, गटारातून फिरणाऱ्या घुशी, बेवारशी कुत्री, असं सगळं चाळीतील संस्कृतीच्या संदर्भाने येणारे तेथील उबगवाणे वातावरण महानगरातल्या निम्नस्तरीय जगण्याचा एक अपरिहार्य भाग आजही आहे. दिवसाची ही सुरुवात कुठल्याही अंगाने प्रसन्न आहे, असं म्हणता येणार नाही. या अशा वातावरणात नोकरीची, राहण्याच्या जागेची, लैंगिक भुकेच्या शमनाची, संसाराची, स्थिर जगण्याची, कसलीही शाश्वती नसलेल्या आणि पुस्तकं नि कवितांसह तुकोबा, कबीर, नामदेव ढसाळ, कुमार गंधर्व, मुकुल शिवपुत्र, केसरबाई, मेहदी हसन, फरीद अयाज, लीळाचरित्र, जहांगीरमधली चित्रं वगैरेंशी मनाने सख्य जोडून असलेल्या संवेदनशील तरुणाची काय पंचाईत होत असावी याचा अंदाज येऊ शकतो. कादंबरीच्या सुरुवातीच्या प्रसंगाने आपल्या मनात निर्माण केलेले एक प्रकारच्या उदासीचे, खिन्नतेचे आणि अलिप्ततेचे वातावरण पुढे सबंध कादंबरीला व्यापून राहिलेले दिसते. नायकाचं गावी गेल्यावर आईवडिलांसह लहानपणापासूनच्या त्या परिचित परिसराला भेटल्यावर, जिच्यामध्ये मन गुंतलं आहे त्या सुधासोबत असताना, मित्रांसोबत वावरताना, अन्य सहकाऱ्यांसोबत वा एकटं असतानाही हे उदासवाणं अलिप्तपण दूर गेल्याचे जाणवत नाही. नायकाच्या देहामनाला वेढून राहिलेले हे अलिप्तपण आणि उदासीनतेने वाचकांनाही आपल्यासोबत गुरफटून घेतल्याचा अनुभव ही कादंबरी वाचताना येत राहतो. या कादंबरीचे हे एक वैशिष्टय़ म्हणून नोंदवता येईल.

कादंबरीचे मुखपृष्ठ : अन्वर हुसेन 

या कादंबरीतील जवळपास प्रत्येक लहानमोठय़ा व्यक्तिरेखेला स्वत:चं असं स्वतंत्र अस्तित्व आहे. प्रत्येकाचं या कादंबरीच्या अवकाशात काही एक विशिष्ट स्थान आहे. कादंबरीच्या सुरुवातीला पहाटे चाळीतल्या सार्वजनिक संडाससमोरच्या रांगेत नंबर लावायला जाताना आठवणारी पायांखाली येऊन मेलेली घूस असो, की काळवेळेचं वा कसलंही भान नसलेले रस्त्यावर झेंगट लावून हास्यास्पद प्रदर्शन घडवणारी कुत्री असोत, माणसांइतकेच हे जीवही या किळसवाण्या महानगरीय अधोविश्वाच्या संस्कृतीबरोबरच नायकाच्या मनातील कल्लोळांचे प्रतिनिधित्व करणारी पात्रे आहेत. त्यांच्या कादंबरीतील असण्याला काही एक अर्थपूर्ण प्रयोजन आहे. त्यांच्या अस्तित्वामुळे निवेदनातून आपल्यासमोर साक्षात होत जाणारा तपशील अधिक जिवंत आणि वास्तववादी होत जातो. अर्थात, याशिवाय यात प्रसंगोपात येत जाणाऱ्या वेगवेगळय़ा मानवी व्यक्तिरेखाही तितक्याच लक्षणीय आणि ठसठशीत आहेत. चाळसंस्कृतीतील लाचारी, भूक, उंडगेपणा, नादानपणा, व्यसनी वृत्ती, गुंडगिरी, लैंगिक उपासमार, अकृत्रिम मानवीय जिव्हाळा इ. विशेष स्पष्ट करणारी गण्या फुलवाला, पिंटय़ाभाय, पिंटय़ाचा बाप हरितात्या, सखू म्हातारी, शंकर, बबन्या, सुधा यांसारखी पात्रे, नोकरीच्या ठिकाणाच्या मालकाची मुजोरी, बेफिकिरी, मजबुरी वगैरे दाखवणारी टाटारिया, लावण्या, जितू ही पात्रे, महानगरातील एकाकीपणा, निर्वासित जगणे, दाखवून देणारी कुणी एक ‘तो’ आणि त्याच्यासारखी काही पात्रे ही या कादंबरीची बलस्थाने ठरणारी आहेत. कादंबरीच्या नायकाइतकीच ही पात्रेही या कादंबरीच्या मध्यवर्ती सूत्राला पुढे घेऊन जाण्यासाठी उपयोगी ठरतात.

कादंबरी हे एक भाषित रचित असल्याने कादंबरीकाराला हे रचित घडवताना स्वत:ची भाषाही शोधावी लागते. कादंबरीतील सामाजिक व्यवस्थेला व्यवस्थितपणे सामावून घेणारी भाषा सापडणे बऱ्याचदा लेखकाचा कस पाहणारे असते. कादंबरीच्या भाषेविषयी मराठीमध्ये म्हणावी तितकी जागरूकता दिसत नाही, हे खरे आहे. या उदासीन पार्श्वभूमीवर ‘खोल खोल दुष्काळ डोळे’मध्ये लेखक साजेशी भाषा घडविण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे, हे लक्षात येते. भाऊ पाध्ये, चंद्रकांत खोत, दिवाकर कांबळी, जयंत पवार, जी. के. ऐनापुरे यांनी निम्न वा अधोस्तरीय महानगरीय अवकाशाला साजेशी भाषा त्यांच्या लेखनासाठी जाणीवपूर्वक निर्माण केली. त्या वाटेने प्रदीप कोकरेसारखा तरुण लेखक चालू पाहतो आहे, हे दिलासादायक आहे. कादंबरीत वापरलेले नायकाच्या दैनंदिनीतील चिंतन, त्याच्या मन:स्थितीचे दर्शन घडवणाऱ्या त्याच्या कवितांचे तुकडे, तुकोबांचे अभंग व विविध गायकांच्या चिजांचे संदर्भ, नायकाच्या मनाचे भरकटलेपण पकडू पाहणारे निवेदन, फेसबुक, व्हाटसऍप, इन्स्टा यांसारख्या आधुनिक समाजमाध्यमांशी संबंधित लेखन, अशांसारखी संभाषिते महानगरीय जगण्यातील कोलाहल, वखवखलेपण, अतृप्ती, अशांती, एकाकीपण, तडजोड, स्वप्ने, राडे, स्पर्धा, सत्तासंघर्ष, सांस्कृतिक संघर्ष, डिप्रेशन, अंतिमत: केऑस अशा अनेकानेक घटितांच्या चित्रणाच्या पार्श्वभूमीवर कादंबरीच्या भाषेला वेगळेपण देऊ पाहतात. चाळीतील तरुणांची रांगडी, मोकळीढाकळी भाषा, शिव्यांचा आणि लैंगिक शब्दांचा मुक्त वापर, संवादांतील जिवंतपणा, प्रथमपुरुषी निवेदनातून समोर येणारे वास्तववादी तपशिलांतील बारकावे, यामुळेही कादंबरीच्या भाषेचा बाज खुलला आहे.

कादंबरीच्या आकारामुळे ती चटकन वाचून हातावेगळी होते हे खरे असले, तरी सत्यकथानिष्ठ दीर्घकथा वा लघुकादंबरीसारखे तिचे स्वरूप जाणवत राहते. तिच्यात कादंबरीच्या विस्तृत व गुंतागुंतीच्या संरचना पटाची उणीव जाणवते, हेही मान्य करावे लागते. बऱ्याचदा नायकाच्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित नोंदींपुरतेच यातल्या काही घटनांचे स्वरूप उरते की काय असेही वाटत राहते. वाचक म्हणून असमाधानी वाटावे अशा काही गोष्टी त्यातून जाणवत राहतात. विशेषत: नायकाचं आपलं असं अधांतरी लोंबकळत जगणं जगत असतानाही त्याच्या भवतालच्या अवकाशात देशावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक राजकीय व सांस्कृतिक उलथापालथी याच काळात घडत राहिल्या होत्या. त्यांचा परिणाम राजकीय-सामाजिक वा सांस्कृतिकदृष्टय़ा सजग आणि संवेदनशील असलेल्या नायकाच्या मनावर कळत नकळत होणे साहजिकच आहे. पण तसे ते या कादंबरीत क्वचितच जाणवत राहते. हा दोष म्हणता आला नाही तरी कादंबरीसारख्या सामाजिक व कृतिशील वाङ्मय प्रकाराची ती एक प्रमुख मागणी असते. याच दशकभराच्या काळात आलेल्या, आजच्या पिढीची घुसमट व आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठीचा संघर्ष मांडणाऱ्या किरण गुरव, सुशील धसकटे, प्रसाद कुमठेकर, अवधूत डोंगरे, सुशील गायकवाड यांसारख्या तरुण लेखकांच्या कादंबऱ्यांमध्ये या दृष्टीने विचार केला गेल्याचे दिसून येते.

महानुभवी तत्त्वज्ञानात सांगितल्याप्रमाणे कसल्याही गोष्टीची सवय जडू नये, जगण्याचा साचा होऊ नये, यासाठी आपल्या कादंबरीतील नायकाप्रमाणेच सजग असलेल्या या कादंबरीकाराकडून अधिक खोली गाठण्याच्या अपेक्षा करता येतील, असे मात्र नक्कीच ही त्याची पहिली कादंबरी वाचत असताना जाणवते. आपण जगत असलेल्या काळाचा तुकडा पकडू पाहताना आपल्या अस्तित्वभानाचाही शोध घेण्याचा प्रदीप कोकरे यांचा हा प्रयत्न निश्चित वाखाणण्याजोगा आहे.

- प्रवीण दशरथ बांदेकर

कवी, प्राध्यापक आणि कोकणातील साहित्य चळवळींमधील महत्त्वाचे नाव. नवाक्षर दर्शन’ या मराठी नियतकालिकाचे संस्थापक संपादक. ‘येरू म्हणे’, ‘खेळखंडोबाच्या नावानं’ या काव्यग्रंथांनंतर गद्यलेखनात सक्रिय. ‘चाळेगत’, ‘इंडियन ऍनिमल फार्म’ या कादंबऱ्या लोकप्रिय. ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार.

साभार : लोकसत्ता ,१९ नोव्हेंबर २०२३. 

***

Monday, November 20, 2023

तंद्रीचा पाठलाग




साभार : लोकायन, बिकानेर 

कबीर.
मूळ अरेबिक शब्द. ज्याचा अर्थ होतो श्रेष्ठ, महान.
 
कबिरा तू ही कबिरु नाम तू तोरे नाम कबीर ।
रामरतन तब पाइये जद पहिले तज शरीर ।।
 
असं स्वतः कबिरने स्वतःच्या नावाबद्दल एका दोह्यात म्हटलेलं आहे. एक आख्यायिका अशी सांगितली जाते की, कबीराचे वडील एका काजीकडे घेऊन जातात आणि विचारतात या मुलाचे नाव काय ठेवू ?
काजी कुराणची पोथी उघडतो आणि त्यात नाव शोधू लागतो. तो नाव शोधताना अचानक बाल कबीर उच्चारला 'मी आत्मस्वरूप आणि आत्मप्रकाशी आहे.'
काजी विस्मयचकित होऊन म्हणाला, या बालकाचे नाव कबीर !
कबीराच्या जन्माबद्दलही अशा कैक आख्यायिका सांगितल्या जातात. एका आख्यायिकेनुसार तो निमा-निरू दाम्पत्याचा पुत्र होता. लोकांच्या भयाला शरण जाऊन एका ब्राह्मण विधवेनं आपलं नवजात अर्भक एका तलावात सोडून दिलं. निमा- निरू दाम्पत्याला ते सापडलं आणि ते नवजात बालक घरी आणून त्याला वाढवलं. तर एक आख्यायिका तो प्रकाशकिरणांतून साकारला असं सांगते तर दुसऱ्या आख्यायिकेनुसार एका तलावातील कमलपुष्पात कबीराचा जन्म झाला. निर्णायक पुरावे नसल्याने या आख्यायिकांना फारसा अर्थ उरत नाही. पण यातील दोन संभाव्य आख्यायिकांनुसार कबीर हा ब्राह्मण विधवेच्या पोटी जन्माला आला. तीने त्याचा त्याग केल्यावर तो निमा-निरू या मुस्लिम विणकर दाम्पत्याला एका तलावात सापडला. आणि दुसरी अशी कि तो मुस्लिम विणकर दाम्पत्याचाच पुत्र होता. या संबंधाने कबीर  'तू ब्राम्हण मैं काशिका जुलाहा.' असं आपल्या काव्यात म्हणतो. जुलाहा म्हणजे विणकर. तत्कालीन समाजात काही ठिकाणी जुलाहा ऐवजी 'कोरी' म्हणून उल्लेख केला जायचा जी एक विणकर जात होती. बनारसमध्ये बहुतांश विणकर हे मुस्लिम समुदायाशी संबंधित आहेत. डॉ. हजारीप्रसाद व्दिवेदींच्या मते कबीर 'जुगी' किंवा 'जोगी' जातीचा होता. 'जुगी' किंवा 'जोगी' हे इस्लाम धर्माचा स्वीकार केलेले विणकर होते. वर्णसंकरामुळे ज्या पोटजाती निर्माण झाल्या त्यापैकी एक 'जुलाहा ' हि एक जात होती. इस्लामच्या छळाला बळी पडून वा तो चुकवण्यासाठी ज्या अनेक जातींनी सामूहिक धर्मांतर केले त्यापैकी ही एक जात होती. असं डॉ. व्दिवेदीचं संशोधन सांगतं. असं असलं तरीही स्वतः कबीर या बंधनात अडकलेला दिसत नाही. जाती-धर्माला त्याने महत्त्व दिलेलं दिसत नाही.

कबीर. रेखाटन : मिलिंद कडणे 
जाति न पूछो साधू की, पुछी लिजिये ज्ञान
मोल करो तरवारका, पडा रहन दो म्यान ।।
असं कबीराने एका पद्यात म्हटलेलं आहे.
 
ज्याच्या जन्माबद्दल, जन्मस्थळाबद्दल आणि निर्वाणाबद्दल अनिश्चितता आणि कैक मतमतांतरे आहेत असा हा कवी आणि तत्वचिंतक हिंदी साहित्याचं फार मोठं दालन व्यापून आहे. तुकोबांची गाथा जशी लोकांच्या मुखोद्गत होती, तिने काळाच्या सीमेची बंधनं नाकारली आणि हवेच्या प्रपातासारखी सर्वदूर पसरली अगदी त्याचप्रमाणे कबीराची रचना सर्वदूर पसरलेली दिसते.
 
मसि कागद छुयो नहीं, कलम गही नहीं हाथ ।
चारिउ जुग को महातम मुखहि जनाई बात ।।
 
हातात लेखणी न घेताही केवळ वाणीने धार्मिक कटुतेचं, स्व आणि शरीर यांच्या संबंधांचं, धर्म आणि अंधश्रद्धामूलक आचारांचं, मुक्ती आणि बंधन यांचं आणि मानवी स्वभावगुणांचं माहात्म्य सांगणारा हा कवी नावाप्रमाणेच महान आणि श्रेष्ठ होता. त्याचं हे श्रेष्ठत्व जपणाऱ्या, त्याच्या रचनांचा प्रसार आणि संवर्धन करणाऱ्या एका लोकसंगीत यात्रेत मी यात्री म्हणून ऑक्टोबर २०२२ मध्ये सहभागी झालो होतो. कबिरच्या रचनांचं आकर्षण हे एक कारण होतंच, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं कारण होतं ते देशभर विविध प्रांतात जात-धर्म-वर्ण यांच्या सीमा ओलांडून लोकसंगीताद्वारे कबिर गाणारे लोकगायक. आणि ती यात्रा होती 'राजस्थान कबीर यात्रा' .

राजस्थान कबीर यात्रेतली एक संध्याकाळ . फोटो : लोकायन 
राजस्थान कबीर यात्रा ही भारतातील सर्वात मोठी लोकसंगीत प्रवास यात्रा आहे. हा लोकसंगीत महोत्सव दरवर्षी 2 ते 8 ऑक्टोबर दरम्यान राजस्थानच्या वेगवेगळ्या ग्रामीण भागात फिरतो. ज्यात कबीर, मीराबाई, बाबा बुल्लेशाह, गोरखनाथ, शाह लतीफ आणि इतर संत आणि ऋषींच्या भक्तीचा, निर्गुण आणि सूफी कवितांच्या मौखिक परंपरेचा उत्सव साजरा केला जातो.'लोकायन' या बिकानेर येथील स्वयंसेवी संस्थेच्या पुढाकाराने 2012 मध्ये पहिली राजस्थान कबीर यात्रा सुरू करण्यात आली. 'लोकायन' आणि राजस्थान पोलीस यांच्या 'तानाबाना' या प्रकल्पाद्वारे विविध समुदायांमध्ये सामंजस्यपूर्ण वातावरणाचा प्रचार आणि संगोपन करण्याच्या दृष्टीकोनातून समाजात शांतता आणि धार्मिक सलोखा सुस्थापित व्हावा या उद्देशाने या यात्रेचे आयोजन केले जाते. लोकसंगीताद्वारे मौखिक परंपरेतुन संतांची वाणी मुखर करणाऱ्या लोकगायकांसह जवळपास तीनशेहुन अधिक यात्री, अभ्यासक, संशोधक आणि तंत्रज्ञ या यात्रेत सहभागी होतात. कबीर आणि इतर संतांच्या रचनांचा, सत्संगाचा, सगुण-निर्गुण आणि हद-अनहद या संकल्पनांच्या अर्थांच्या शक्यतेत शरीराचा शोध घेणं, स्वतःला तपासणं, सुधारणं, आणि पूर्णतः खोडून पुन्हा नितळतेने स्वकडे पाहण्याची नितळ दृष्टी विकसित करणारा हा लोकसंगीत महोत्सव असतो.

कहां से आया कहां जाओगे? 

यात्रेला निघण्यापूर्वी मी सातत्याने अशा एका लोकगायकाला ऐकत होतो ज्याने कबीर आपल्या गायकीतून जनसामान्यांपर्यंत पोचवला. नुसता पोचवला नाही तर त्यांनी कबीराच्या रचनांचा अर्थबोध सांगितलाच पण त्या रचनांची आजच्या धार्मिक उन्मादाने दुभंगलेल्या वातावरणात माणसांना जोडून ठेवण्याची निकडही जोरकसपणे मांडली. कबीराच्या भजनांमधून ध्वनित होणारा अर्थ त्यांनी जात-धर्म-वर्ण- भाषा-संप्रदाय यांची बंधनं तोडून लोकांना सांगितला. बंधुभाव, धार्मिक सलोखा, मानवी अंतर्मन आणि मानवी मूल्यांची प्रासंगिकता त्यांनी कबीराच्या पद्यात शोधली, आत्मसात केली आणि तितक्याच तळमळीने लोकांना वाटूनही टाकली. नवनवे अर्थबोध त्यातून उलगडू लागले आणि हा आवाज देशभरच नाही तर विदेशातही पोचला. 

पद्मश्री प्रहलाद सिंग टिपानिया भारत जोडो यात्रेत कबीर गाताना. फोटो : गुगल 
कहां से आया कहां जाओगे
खबर करो अपने तन की
कोई सदगुरु मिले तो भेद बतावे
खुल जावे अंतर खिड़की
 
कबीराचे हे शब्द अमेरिकेच्या स्टॅनफर्ड आणि सिरक्यूझ युनिव्हर्सिटीत गाणारा आवाज होता माळव्याची लोकधून प्रहलाद सिंग टिपानिया.

प्रहलाद सिंग टिपानिया हे कबीर गाणारे भारतातील लोकप्रिय लोकगायक आहेत. मालवी शैलीतील लोकपरंपरेतील गाण्यांद्वारे त्यांनी ४ दशकांहून अधिक काळ ग्रामीण, शहरी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कबीराचा संदेश आणि कार्य पोहोचवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मध्य प्रदेशातील लुनियाखेडी हे त्यांचं जन्मगाव. आई-वडील अशिक्षित. त्यामुळं त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण आजीकडे इंदोरला झालं. तिथेच त्यांनी इतिहास विषयात एम. ए केलं आणि लुनियाखेडी या त्यांच्या गावी ते शिक्षक म्हणून सरकारी शाळेत रुजू झाले.

१९७८ साली वयाच्या २४ व्या वर्षी देवास येथील एका कार्यक्रमात त्यांनी लोकवाद्य तंबुराची धून ऐकली. देवासमधील भजनी मंडळीत ते तंबुरा शिकू लागले आणि शिकता शिकता गाऊही लागले.


खेती करे तो थारे समज बताऊ
बलद्यान दुःख ना दिजे
अवसर खेत बीज मत बोजे
उंची संगत नाहर भुगतावे घरे बैठू रीजे
मन तू ऐसी खेती कीजे

तंबुरा शिकतानाची एक आठवण सांगताना ते म्हणतात -

''ये भजन गाकर मैं जब तंबूर सिख रहा था, तब मैने ये घटना प्रत्यक्ष रूप में देखी और मेरे अंदर का कचरा दूर हुआ. कि ये केवल गाना नहीं हैं, ये प्रकृती मे घटित होने वाली घटना हैं. और हमारे सबके जीवन का एक प्रत्यक्ष दर्शन हैं. तब मुझे इस सन्तोके वाणी के साथ रुजान, लगाव और श्रद्धा हुई. मैं कोई गायक नहीं हू, परंतु संतो कि वाणी को मैने जिस लोगोंसे सिखा उसे मैं अपने तोरतरीकेसे गाता हूँ. ''

घरंदाज गायकीची कुठलीही पार्श्र्वभूमी, परंपरा नाही. मालवी शैलीतील लोकगीतं, मौखिक परंपरेची सशक्त परंपरा आणि तंबुराची विलक्षण गहिरी धून सोबत घेऊन अध्यात्मिक आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कबीराला सोबत घेऊन ते गावोगाव गाऊ लागले. माळवा प्रांतातील लोकगीतांच्या मौखिक परंपरेला चालना आणि श्रेय हे टिपानिया यांच्या गाण्यामुळे मिळालं असं नम्रपणे लुनियाखेडीतली माणसं सांगतात. असं असलं तरी प्रहलाद सिंग टिपानिया यांना स्वतःच्याच गावात सामाजिक भेदभावाला सामोरं जावं लागलं होतं. कथाभागवतच्या एका कार्यक्रमात त्यांना जेवणाचं निमंत्रण होतं. पण निमंत्रण असूनही अन्न आणि पाणी त्यांना दुरून वाढण्यात आलं. त्यांची भांडीही वेगळी ठेवण्यात आली होती. असा उल्लेख शबनम वीरमणी यांनी दिग्दर्शित केलेल्या 'चलो हमारे देस' या माहितीपटात आढळतो. त्या प्रसंगापासून ते गावातील कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होत नाहीत. त्यांनी स्वतःला गाण्याभोवती बांधून घेतलंय. असं त्यांची पत्नी शांती टिपानीया म्हणतात.


पद्मश्री प्रहलाद सिंग टिपानिया. फोटो : लोकायन. 
अनेक बंधन से बांधिया एक बेचारा जीव
छुटु अपने बल से या छूडाए मेरा पिव

असं म्हणत प्रहलाद टिपानिया पुन्हा भजन गायला दुसऱ्या गावी निघून जातात.

प्रहलाद टिपानिया यांनी माळव्यातील ग्राम सत्संग परंपरेसोबत मिसळून कबीराच्या काव्यातील अध्यात्मिकता आणि सामाजिकविचारांचं तत्वज्ञान अत्यंत सहज आणि रसाळ भाषेत लोकांपर्यंत पोचवलं. कर्मकांड, मूर्तिपूजा, पंडितांचा ढोंगीपणा, जातीय शोषणआणि धार्मिक ध्रुवीयकारणावर कबीर ज्या तीक्ष्णपणे खिल्ली उडवून त्यातलं मागासलेपण दाखवून निषेध करतो त्याच आवेशातटिपणीया गावोगाव फिरून भजनांमार्फत जागृती करून कबीरांच्या विचारातली सत्यता गेली 30 वर्षे पोचवत आहेत.

कबीराचा काळ हा धार्मिक आणि सामाजिक दृष्ट्याही अराजकाचा, उन्मादाचा काळ होता. इस्लामचं आक्रमण सुरु झालेलं होतं. धार्मिक आणि राजकीय सत्ता हस्तगत करण्याची आकांक्षा बाळगून जोरजबरदस्तीने धर्मप्रसार होत होता. कबीराने या आक्रमक आणि उन्मादी काळाचं बारकाईने निरीक्षण केलं होतं. त्यामुळंच हिंदू-मुसलमान धर्मांपैकी त्याने एकालाही जवळ केलेलं दिसत नाही. दोन्ही धर्माच्या रूढ संकल्पनांना आणि आचार-विचारांना त्यांनी छेद देऊन प्रखर टीका केलेली दिसते. संन्यासी, फकीर, जोगी, जंगम, नाथपंथी, मुल्ला, मौलवी, सुफी असे कैक पंथ, त्यांचे आचारविचार, उपासनामार्ग असताना कबीराने यापैकी कुठल्याच पंथात स्वतःला बहाल केलं नाही. त्यामुळं त्यांच्या आचारविचारांवर, रूढ धार्मिक कर्मकांडावर, त्यांच्यातील अहंकार आणि दंभावर मोकळी टीकाकरण्याचे स्वातंत्र्य त्याला घेता आले. कुणात सामावलं न गेल्यामुळं त्याची टीका प्रखर, अत्यंत तीक्ष्ण आणि भेदक ठरली. 'जाति न पूछोसाधू की' हे कबिरने दिलेलं मार्मिक उत्तर तत्कालीन 'पाखंडी'यांची मुळं उद्ध्वस्त करणारं ठरलं. यापुढे जाऊन कबिरने त्यांना विचारलेला प्रश्नही भेदक आणि मार्मिक आहे –


तुर्को कि मस्जिद में, हिन्दुओ के मंदिर में 
खुदा और राम दोनों बसते हैं
पर जहाँ न मस्जिद हैं न देवता
वहाँ कोन समाया हुआ हैं ?

कबीर केवळ कवी नाही तर तत्वचिंतक आहे. त्यामुळं तो ईश्वराला एका संकुचित कक्षेत बसवत नाही; तर त्याला अमूर्त रूप देतो. कबीर इस्लामच्या एकेश्वरवादाच्या आणि हिंदूंच्या अनेकदेवतावादाच्या कक्षा ओलांडून मोकळा होतो. तो अल्लाचा उरत नाही, नाही रामाचा. तो फक्त 'सत्य' या तत्वात सामावतो.

आपल्याच वर्तुळात राहणार तो गूढवादी कवी नव्हता. म्हणूनच कबीर जनसामान्यांपासून दूर जात नाही. धर्माच्या नावावर होणाऱ्या अनिष्ट रूढी आणि त्यातल्या खोटेपणाला तो वारंवार धक्के देत राहिला. अशा काळात जिथे बिद्धीप्रामाण्यवाद दुर्मिळ होता. प्रस्थापित धर्माला विरोध हे मोठं पातक समजलं जायचं. कबिरने हे नेटानं आणि निकडीनं सुरु ठेवलं.

प्रहलाद टिपानियांनी लुणियाखेडीत आपल्या घरासमोर सद्गुरू कबीर स्मारक' उभारलं आहे. गावातील अधिकाधिक लोक कबीराच्या विचारांशी जोडले जावेत, त्याच्या रचनांच्या गायनाचे कार्यक्रम व्हावेत हा यामागचा उद्देश. या स्मारकात कोणतीही मूर्ती नाही. कबिरची ना अन्य कुणाची. टिपानिया म्हणतात, "ये स्मारक कबिरकी याद हैं. मूर्ती नहीं हैं क्यू कि कबीर खुद मूर्तिपूजा मानते नहीं थे. ईश्वर तो आकार से परे हैं. मूर्ती होती तो लोग टीका लगाने आ जाते. पैसा देते. और मैं इस स्मारक का पुजारी हो जाता!"

1997 साली कबीरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी प्रहलाद टिपानिया यांनी 'कबीर स्मारक शोध संस्थान' ची स्थापना केली. त्याअंतर्गत वर्षभर अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. कबीरांच्या रचनांचा अर्थ आणि प्रासंगिकता सांगणाऱ्या निवासी कार्यशाळा होतात. गरीब मुलांना निःशुल्क शिक्षण देणारी एक शाळा या संस्थेतर्फे चालवली जाते. माळवा आणि आजूबाजूच्या प्रांतात वसलेल्या कंजर समाजात जनजागृतीसाठी कबीर भजनांचे कार्यक्रम प्रहलाद टिपानिया करतात. त्या समूहाच्या विचारात परिवर्तन व्हावं म्हणून ते जाणीवपूर्वक त्यांना वाईट वाटेल अशी भजनं गातात. आज त्या समूहात शिक्षणाचा प्रसार आणि त्यांचे बदलते विचार पाहून या संस्थेचं कार्य योग्य मार्गावर आणि कबीरांच्या विचारांच्या दिशेने सुरु असल्याचं समाधान ते व्यक्त करतात.

दरवर्षी फेब्रुवारी मध्ये पाच दिवसांची लोकसंगीत यात्रा या संस्थानाच्या माध्यमातून आयोजित करण्यात येते. जी 'माळवा कबीर यात्रा' म्हणून लोकप्रिय आहे. देश-विदेशातून लोक या यात्रेकरिता माळव्यात जमतात. मौखिक परंपरेतून आलेली लोकगीतांचा ,कबीर आणि इतर अनेक संतांच्या काव्याचा उत्सव म्हणजे माळवा कबीर यात्रा असते. लोकसंगीत आणि कबीराच्या तत्वज्ञानाचा खोलवर प्रभाव असणारी असंख्य माणसं या यात्रेत जोडली जातात.

मध्य प्रदेशातील माळवा प्रांतातील मौखिक परंपरेच्या पुनरुत्थानासाठी आणि कबिरची वाणी व तत्वज्ञान देश-विदेशात जनसामान्यांपर्यंत पोचवण्याच्या महत्त्वपूर्ण आणि मौलिक योगदानाबद्दल प्रहलाद टिपानिया यांना 2011 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आपल्या संपूर्ण परिवारासह ते आजही अविश्रांत तळमळीने गावोगाव कबिरचं तत्वज्ञान, जात -पात आणि आजच्या धार्मिक ध्रुवीयकारणाच्या उन्मादी काळात अस्मिता विरहित माणूसपणाचा शोध घेत गाताना दिसतात. 'भारत जोडो यात्रे'त हातात तंबुरा घेऊन कबीर गाण्याचं ते धारिष्ट्य दाखवतात त्यामागे कबिरची त्यांच्यात झीरपलेली अंतर्दृष्टी आहे. प्रहलाद सिंग टिपानियायांनी कबीरांच्या काव्यातलं निर्गुण निराकाराचं, समतेचं सूत्र ओळखून त्याला आपल्या गाण्यातून जनसामान्यांपर्यंत पोचवलं. कबीराचे बोल कानात रुंजी घालतील अशा संस्मरणीय चाली त्यांनी कबीरांच्या भजनांना लावल्या.

तीरथ में तो सब पानी है, होवे नहीं कछु अन्हाय देखा ।

प्रतिमा सकल तो जड है भाई, बोलें नहीं बोलाय देखा ॥
पुरान कुरान सबै बात है, या घट का परदा खोल देखा ।
अनुभव की बात कबीर कहैं, यह सब है झूठी पोल देखा ॥

प्रहलाद सिंग टिपानिया हा कबिराचं तत्व अंगीकारून शून्यतेच्या शिखरावर पोचलेला लोकगायक आहे. ज्याचा शोध 'सत्य' या सूत्राभोवती फिरतो. जे कबीराच्या समतेचं सूत्र होतं.

हमारे मिट्टी कि सुगंध सुनो भाई !

उदयपूरच्या दिशेने ट्रेननं बांद्रा स्टेशन सोडलं तेव्हा मी असं सगळं कायकाय डोक्यात घेऊन निघालो होतो. सरोवरांच्या शहरात फतेसागर लेकच्या शेजारी कबीर यात्रेचं उदघाटन होतं. कबीर मूर्तिपूजन किंवा दीपप्रज्वलन वगैरे असलं काही नाही. फक्त संगीत. पहिला दिवस गाजवला तो कच्छ च्या मुरालाला मारवाडा यांनी. मीराबाईचं  भजन गाऊन त्यांनी सगळ्यांना अगदी चार्ज केलं.

नहीं जाऊं नहीं जाऊं सासरिये मोरी मां, हो रामईया!

मेरो मन लागो रे, मेरो चित्त लागो रे, फ़कीरी (गरीबी) मां

पहाडी आवाजात सगळ्यांना थिरकायला लावणारा मुरालाला मारवाडा आणि त्याचे सोबती. फोटो : शोधण्यातली खाडाखोड

मुरालालाला साथ देणाऱ्यांमध्ये एक वाद्य घडा-घमेला हे आहे. मी मुरालालाचं भजन संपल्यावर स्टेजमागे जाऊन त्यांना भेटायला गेलो तर अक्षरशः शेण भरण्यासाठी जे घमेलं वापरतो ते वाद्य म्हणून त्यांनी वापरलं होतं. त्यासोबत घडा. म्हणजे मडक्याच्या तोंडाला चामड्याचं आवर्तन बांधलेलं होतं. बोटात अंगठी घालून त्याची थाप घमेल्यावर आणि दुसऱ्या हाताने घड्यावर थाप मारली कि जो काही आवाज घुमतो तो अक्षरशः अवाक करणारा असतो.

हिए काया में वर्तन माटी रो, हिए देही में

फूटी जासे नहीं करे रनको
साहिब हमको डर लागे एक दिन रो
एक ही रे दिन को, घड़ी पलक रो
नहीं रे भरोसो एक ही पल रो

हे कबीराचे शब्द मुरालाला एरवी चढत जाणाऱ्या पहाडी आवाजाला बाजूला सारून संथ मधाळ आवाजात निव्वळ घडा-घमेला आणि टाळ ( मंजिरा ) यांच्या साथीनं गातो तेव्हा अक्षरशः तंद्री लागते.

फतेसागरच्या कठड्यावर गार वारा झेलत मुरालालाला बोलतं केलं तेव्हा कळलं, कि एका शिक्षकाने त्यांच्या पुतण्याला मारहाण करतानाचं दृश्य बघितल्यावर त्यांनी पुन्हा शाळेत पाऊल ठेवलं नाही. आठ वर्षांचे असताना त्यांनी त्यांच्या गावातील सत्संगाच्या कार्यक्रमात पहिल्यांदा तंबूराचा आवाज ऐकला. तेव्हापासून शाळेत न जाता त्यांनी वडिलांकडून आणि गावातील लोकगायकांकडून गाणे शिकले. त्यांना कोणतंही गाणं  लिहावं लागलं नाही. अनेक वर्षांच्या सत्संगातून आणि मौखिक परंपरेने जतन केलेल्या लोकगीतांमधून त्यांनी कबिरपासून मीराबाई ते बाबा बुल्लेशाह यांचे कलाम त्यांनी आत्मसात केले. मुरालाला हे राजस्थानातील मेघवाल गायकांच्या वंशातील आहेत ज्यांनी 350 वर्षांपूर्वी कच्छ येथे स्थलांतर केलं होतं. त्या वंशाचे मुरालाला हे 11 व्या पिढीचे गायक आहेत.

त्यांचा देखणा तंबूर हातात घेऊन त्यांना म्हणालो, ये आपने कब बनवाया? तर मोट्ठ्यानं हसत ते म्हणाले, "भाई यें मैने नहीं बनवाया. मेरे परदादा के जमानेका हैं ये. अब डेढसो साल का हो गया हैं. बहुत यादें जुडी हैं हमारी इस तंबूर से."

मुरालालाचा तो देखणा तंबूर तब्बल दीडशे वर्ष जुना होता. अनेक पिढ्यांपासून त्याच्यापर्यंत वाहत आलेला हा संतांच्या विचारांचा प्रवाह होता. स्वतः अक्षर गिरवलेलं नाही पण पारंपरिक लोकगीतांपासून आजच्या बदललेल्या सांस्कृतिक परिवेशातही त्यांनी कबीर, मीरा, रविदास, ब्रह्मानंद, धर्मदास, बुल्लेशाह यांचे शब्द मुखोद्गत करून ठेवले आहेत. मातीबानी सारख्या उपक्रमाद्वारे त्यांनी परदेशातही आपला आवाज पोचवला आहे. कोक स्टुडिओ आणि काही चित्रपटांसाठी त्यांनी गाणी गायली आहेत. ते आता स्वतःच्या मुलीला गाणं शिकवत आहेत. मेघवाल समूहाच्या परिवर्तनाचा दीडशे वर्षांच्या पिढ्यांचा साक्षीदार असलेला तंबूर त्यांनी आता तिच्या हातात सोपवला आहे.

अग्नि कहे मने टाट पड़त है, पानी कहे मैं प्यासा

अनाज कहे मने खुदिया लागी, घिरत कहे मैं रूखा
थारी काया में...

कच्छच्या रणरणत्या उन्हात मुरालाला मारवाडा स्वतःला शोधण्याचा मार्ग शोधत आहेत. ज्याची वाट त्यांना कदाचित मुखोद्गत असलेल्या मौखिक परंपरेत सापडण्याची शक्यता आहे. हे मला वाटतंय. शोध वेगळा असू शकतो. तिथपर्यंत पोचणं वेगळं असू शकतं. 'पोचणं' काय अर्थाने आपण घेतो हेही व्यक्तिगणिक बदलत असावं. पण शेवटी शेवटी शोध उरतोच. काहीतरी सापडणं, गवसणं आपल्याला समूळ बदलू शकतं. पण हीही एक शक्यताच. मी थोडा अधिकाधिक गुंतत जातो नि गाडी पुढच्या गावाला निघते.

क्या खोजती फिरो म्हारी हेली ?


ज़रा हल्के गाड़ी हांको,
मेरे राम गाड़ी वाले
गाड़ी मेरी रंग रंगीली,
पईया है लाल गुलाल
हांकन वाली छैल छबीली,
बैठन वाला राम, ओ भईया
ज़रा हलके गाड़ी हांको

म्हणत गाडी दुसऱ्या गावाच्या दिशेने रवाना झाली. यात्रेसाठी गावं अशी निश्चित केलेली असतात जिथे धार्मिक सलोखा निर्माण करण्याची गरज आहे. राजस्थान पोलिसांच्या सहकार्याने यात्रेच्या स्थळांची निश्चिती होते. दरवर्षी राजस्थानच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात हि यात्रा फिरत असते. यात्रेचा दुसरा मुक्काम होता सेई, साबरमती, पामरी, वाकल, दिवाव आणि कोसंबी या नद्यांनी वेढलेलं कोटडा हे गाव. आमची बस नागमोडी वळणं घेत कोटडाचा घाट चढत होती. बसमध्ये अनेक कविता, कथा, किस्से, एकमेकांची ओळख, भजनं यांचा मिश्र आवाज गर्दी करून होता. तीनशे यात्रींना सोबत घेऊन फिरणाऱ्या दहा बस कोटडा सीमेत पोचल्या तेव्हा उतरल्या उतरल्या गावकऱ्यांनी आमच्या गळ्यात हार आणि फुलांचा वर्षाव केला. मुस्लिम बांधव फळवाटप आणि सरबत एकेकाच्या हातात देते होते. मी हे पाहून चक्रावलो. किती आपुलकीनं त्यांनी आमचं स्वागत केलं. मग सगळ्यात पुढं लोकगायक मग सगळे यात्री अशी एकदिड तासाची वाजतगाजत मिरवणूक पार पडली. फुलांचा वर्षाव आणि सगळ्यांचं मिळूनमिसळून नाचणं.

आम्ही पुन्हा येऊन बसमधल्या आमच्या बॅगा घेऊन निवासाच्या ठिकाणी आलो. ती व्यवस्थाही गावकऱ्यांनी केलेली असते. गावाच्या मोकळ्या सभागृहात किंवा शाळेच्या खोल्यात. गाद्या टाकलेल्या असतात. आपण जाऊन आपली बॅग त्यावर ठेवायची. म्हणजे आपली झोपायची जागा फिक्स झाली. दुसऱ्या गावाला निघताना अंघोळीला पाणी मिळेल का याचीही आपल्याला शाश्वती नसते. रात्रीच्या जेवणाची व्यवस्था ज्या गावात यात्रा जाईल त्या गावातल्या गावकऱ्यांनी केलेली असते.


कोटडा गावात स्वागत करणारे गावकरी. फोटो : शोधण्यातली खाडाखोड

कोटडा मधल्या गावकऱ्यांनी खास पारंपरिक राजस्थानी दाल बाटी चुर्माचा बेत केलेला. जेवण झाल्यावर एकेक करत आम्ही पटांगणात एकत्र जमलो जिथे मुख्य कार्यक्रम असणार होता. रंगमंच योजना आणि साउंड इक्विपमेंट हे दर गावात घेऊन फिरावं लागे त्यामुळं त्यांचं सेटअप होईपर्यंत जेवणाचा कार्यक्रम असे. साधारणतः९ वाजता प्रत्येक कलाकारांच्या लाइनअप नुसार भजनांच्या कार्यक्रमाला सुरुवात व्हायची. लोकगायक मग जे काही सुरु करायचे ते साधरणतः पहाटे ४ वाजेपर्यंत चालायचं. कबीर, बुल्लेशाह, मीरा, अशी कैक नावं. रात्रभर नुसतं संगीत.  गावातल्या स्थानिक भजन मंडळींनाही संधी मिळायची. त्यामुळं कोटडातल्या स्थानिक भजन मंडळींनी खास मेवाडी भाषेत गायलेली भजन आम्हा सगळ्यांनाच अवाक करून गेली.

रात्री साधारणतः दोनेक वाजता मंचावर आला मीर बसू खान. जैसलमेरच्या पुगल या गावातून येणारा मीर बसू हा सुफी आणि सराईकि गायक आहे. जन्मजात संगीताची कुठलीही पार्श्र्वभूमी नाही. त्याच्या सासऱ्याकडून त्याला संगीत मिळालं. मीर बसू हा जैसलमेरमध्ये ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करतो. कबीर याच्यासोबत अमीर खुसरो, बुल्लेशः यांचे कलाम तो गातो. त्या रात्री त्यांनी अमीर खुसरो यांची लोकप्रिय कविता 'छाप तिलक'आपल्या सराईकि अंदाजात सादर केली. त्याला साथ दिली अब्दुल जब्बार यांनी.

वे सानु लई चल

सजना नाल जा टिकटा दो लेले
संग बनीआए किस्मत नाल जा टिकटा दो लेले
ओह प्यार दि ये रीत निभायें
एक दुजे विच फर्क न पाए
बण दुख सुख दा
भाईवाल ते टिकटा दो लेले

म्हणत मीर बसू यांनी ती रात्र गाजवली. मीर बसू जैसलमेरच्या अनेक गावात आज सुफी संगीत आणि सराईकि गायकीतुन कबीर आणि इतर संतांच्या कविता आणि कलाम सादर करत आहेत. त्याबद्दल प्रशिक्षण देत आहेत. मुंबईतील सहेज फाउंडेशनच्या माध्यमातून ते मुंबईसह भारतातील अनेक राज्यांमध्ये गायनाचे कार्यक्रम करतात. जैसरलमेरमध्ये आज अनेक लोकगायक तयार झाले आहेत जे जात-धर्म-संप्रदाय यांच्या पल्याड पाहून मौखिक परंपरेची लय जतन करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

 

मीर बसू खान. याच्या डोळ्यात पाहणं म्हणजे थरार असतो. फोटो : लोकायन 

सरायकी भाषेचे मूळ मुलतान पाकिस्तानात आहे. आजही सिंध प्रांत, दक्षिण पंजाब, बलुचिस्तान मध्ये ही भाषा बोलली जाते. मीर बसू खान, मुख्तियार अली, मीर रझाक या भाषेत गातात. पुगल हे त्याचं गाव पाकिस्तान बॉर्डरपासून काही किलोमीटरवर आहे. पुगल पासून 150 किमी च्या क्षेत्रात सरायकी बोलली जात असल्याचं ते सांगतात. ही भाषा त्याच्यापर्यंत पोचली ती ख्वाजा गुलाम फरीद यांच्या 'काफ़ी' तुन. काफ़ी म्हणजे चार-पाच ओळींची पदं. सरायकी गायकी ही ख्वाजा गुलाम फरीद यांच्या काफ़ीची देण असल्याचं ते सांगतात. कारण या काफ़ी म्हणजेच संगीताचं एक स्वतंत्र रूप आहे. उर्दू, पंजाबी, फारसी आणि मारवाडी या भाषांचं मंथन म्हणजे सरायकी गायन. कबीर यात्रेत त्यांनी गायलेलं 'दो टिकटा' हे गाणं सरायकी-पंजाबी भाषेतलं लोकगीत आहे. या भाषेचा ध्वनी हा सिंधी भाषेशी मिळताजुळता आहे. अताउल्लाह खान एसा ख़िलवी, पठानय खान, आबिदा परवीन ,उस्ताद मुहम्मद जुमान, मंसूर मलंगी, तालिब हुसैन दर्द, कमाल महसूद इत्यादी गायकांनी सरायकी लोकगीतांचं गायन केलेलं आहे. सरायकी भाषेला पंजाबीची बोली म्हणून काहीजण मानतात. परंतु ही एक स्वतंत्र भाषा आहे जिला स्वतःचा वेगळा रंग असल्याचं मीर बसू सांगतात.

शाकिर शुजाबादी हे प्रसिद्ध आधुनिक कवी आहेत ज्यांची  कलाम-ए-शाकिर, खुदा जाने, शाकिर दियान गजलान, पीले पत्र, मुनाफ्क़ान तू खुदा बचावे आणि शाकिर दे दोहरा ही पुस्तकं सरायकी भाषेत प्रसिद्ध झाली आहेत.

मीर मुखतियार अली हे आणखी एक पुगल येथील प्रसिद्ध नाव. बुल्ले शाह, सुलतान बहू, शाह हुसेन यांसारख्या सूफींच्या कविता त्यांनी जिवंत ठेवल्या आहेत. मुख्तियार स्थानिक सत्संग आणि जागरणांमध्ये धार्मिक, सूफी आणि भक्ती परंपरेतून स्वतःपलीकडे पाहून संपूर्ण मानव हिताच्या दृष्टिकोनातून जनजागृती आणि चर्चा घडवून आणण्यात पुढाकार घेत आहेत.

देखा अपने आप को, मेरा दिल दीवाना हो गया

ना छेड़ो यारों मुझे, मैं खुद मस्ती में आ गया

असं म्हणत मुख्तियार अली लोकगायकांच्या प्रसारासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था आणि इतर सामाजिक उपक्रमांसोबत काम करत आहेत. त्यांच्यासोबत रशीद खान, लतीफ खान, बागे खान, सकूर खान, मीर रझाक अली अशी एकाहून एक सरस अशी सुफी-भक्ती लोकगायकांची फळी मौखिक परंपरेचं संवर्धन आणि प्रसार करत आहे. आपल्या गावातील आणि आजूबाजूच्या भागातील अनेक लहान मुलांना मिराशी गायनाचे प्रशिक्षण देत आहेत.


मुख्तियार अली. फोटो : अजब शहर 
स्थानिक भजन मंडळी, मीर बसू, कबीर कॅफे बँड आणि मुरालाला यांनी रंगवलेली मैफिल पहाटे चारला संपली. आम्ही गाणी गुणगुणत निवास्थानी आलो. झोप फक्त तीन तासांची. सकाळी आंघोळीसाठी शाळेच्या नळावर धावाधाव सगळ्यांची. एकेक करत नळाखालीच बसलो. मग गावकऱ्यांनीच पोह्याचा टोप आणून ठेवला शाळेत सोबत चहाची टाकी. घासघास खाऊन पुन्हा आम्ही सगळे बसमध्ये चढलो. असा दिनक्रम रोज. सकाळी दोन तासांचा सस्तंग असतो असा मित्र म्हणालेला. पण अजूनतरी एकाही मुक्कामी सकाळचा सत्संग झाला नाही. कबीर यात्रेचा मुख्य गाभा हा सकाळचा सत्संग असतो. मी उत्सुक होतो. कारण यात्रेतला सत्संग म्हणजे मधोमध गायक आणि सभोवती बसलेल्या यात्रींचं वर्तुळ. टाळ आणि तंबूराची गहिरी मोहमयी धून. मी पुढच्या मुक्कामी तरी सत्संग होईल अशी आशा साठवत गाडीत बसलो. गाडी आरवली डोंगररांगांच्या मधोमध जगातील दुसरी सगळ्यात लांबीची भिंत असलेल्या कुम्भलगड किल्ल्याकडे निघाली. गाडीत पुन्हा भजनं, किस्से, कथा. चहुबाजुंनी नुसतं लोकसंगीत बिलगलेलं. 

सकाळी ११ वाजता निघालेल्या गाड्या कुम्भलगढला संध्याकाळी ५ वाजता पोचल्या. पुन्हा निवासस्थानी जाऊन जागा पकडण्यासाठी धावाधाव. यावेळी राहायला मंगल कार्यालय होतं. बऱ्यापैकी मोठं म्हणजे दुमजली मंगल कार्यालय होतं. नेहमीप्रमाणे स्थानिक गावकऱ्यांनीच जेवणाची व्यवस्था केली होती.  आदल्या दिवशीचं जागरण होतं पण आठ दिवस असंच असणार होतं त्यामुळं लोकांनी मानसिक तयारी ठेवली होती. काहींनी या आधीच्या यात्राही केलेल्या असतात. त्यामुळं त्यांना एकंदरीत सोयीसुविधांचा अंदाज असतो. आधीच्या गावासारखीच नव्या ठिकाणी अंघोळीसाठी किंवा शौचासाठी धावाधाव असते.

निवासस्थानापासून किल्ला दोन किलोमीटरवर होता. किल्ल्यामध्येच आजची मैफल रंगणार होती. रात्रीचा कुम्भलगढ प्रचंड देखणा दिसत होता.

यात्रेच्या पहिल्या दिवशी मुरालाला मारवाडा यांनी लोकांना घडा-घमेल्याच्या तालावर नाचायला लावलं होतं त्याच आवेशात लोकं कुम्भलगडावर नाचत होती. भजन होतं कवी ब्रम्हानंद यांचं,

सब चला चली का खेला

दो दिन का है जुग मां मेला
सब चला चली का खेला
कोई चला गया, कोई जावे
कोई गठड़ी बांध सिधावे
कोई खड़ा तैयार अकेला
सब चला चली का खेला

या भजनावर प्रत्येकजण स्वतःच्या तंद्रीत नाचत होता. कुणी एकेकटं किल्याच्या पायऱ्यांवर बसून गुणगुणत होतं. देहभान हरपून लोकं भजनाच्या लयीत मिसळून गेली होती. नेहमीप्रमाणे आजही मैफल संपायला चार वाजले. पुन्हा तीन-चार तासांची झोप.

सकासकाळी यात्रेचे स्वयंसेवक 'महेशाराम जी सत्संग ले रहे हैं सभी यात्रींओसे निवेदन हैं कृपया जल्दी उठिये.' असं ज्याच्यात्याच्या गादीजवळ जाऊन सांगू लागली. मी हे झोपेत चुकल्यासारखं ऐकलं आणि ताड्कन उठलो. मी ज्याची वाट बघत होतो तो सत्संग होणार होता. आणि ते घेणार होते साक्षात महेशाराम.

मैं वारी जाऊं रे, बलिहारी जाऊं रे

कुम्भलगढला मंगल कार्यालयात सकाळी ८ वाजता सत्संग सुरु झाला. ओ रे गजानन प्यारे गजानन हे गणेश वंदन गाऊन त्यांनी सत्संगाला सुरुवात केली. मैं 'वारी जाऊं रे, बलिहारी जाऊं रे' हे कवी नारायणदास यांचं महेशा राम यांनी गायलेलं भजन लोकप्रिय आहे. महेशरामांचा शांत, संयमी आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज ऐकून मी त्यांचा फॅन झालो होतो. ध्यान आणि मंत्रमुग्धता हा त्याच्या गाण्याचा विशेषगुण आहे. त्यांनी कबीर, गोरखनाथ, बाबुलाल, धरमदास, मीराबाई आणि नारायणदास यांच्या गायलेल्या रचना याची साक्ष देतात.

महेशाराम हे जैसलमेर येथील मेघवाल समुदायातील लोक गायक आहेत. कबीरासह अनेक भक्ती कवींच्या पारंपरिक मौखिक कवितेचे वाहक आहेत. आपल्या गायनाद्वारे त्यांनी ती जिवंत ठेवली आहे. कबीर, मीरा, गोरख आणि इतर भक्ती कवींची गाणी ऐकत त्यांनी मौखिक परंपरेचा आत्मा त्यांनी आत्मसात केला आहे. मेघवाल समूहाच्या लोकशैलीचे प्रतिनिधित्व ते आपल्या गायनातून करतात.


  कुम्भलगढ येथील सत्संगात रंगून गेलेले महेशा राम. फोटो : शोधण्यातली खाडाखोड
जी कबीरा रे
चालत चालत जुग भया
कौन बतावे धाम जी?
मन भेदूं को व्हाला भूलो फिरे
पाँव कोस पर गाम जी

हे कबिरांचं भजन त्यांनी सत्संगात गायलं. ईश्वराचं अस्तित्व हे तुमच्या-माझ्या शरीरात आहे. इतरत्र त्याचा शोध घेण्याची गरज नाही. असं ते म्हणाले.

मी मात्र त्यांचं हळू बोलण्याकडे आकर्षित झालो होतो. याआधीही त्यांच्या गाण्याने निव्वळ सुख दिलं होतं. गाण्यातही त्यांचा शांत सूर आहे. कुणाला आकर्षून घेण्याची लालसा त्यांच्या गायनात नाही. तरीही आपण त्यांच्या गायनाकडे आकर्षित होतो. कबिरांचं तत्वज्ञान आणि भक्तिकाव्यातील सहजता महेशा राम तितक्याच तन्मयतेनं आणि हळुवार समजावून सांगतात. माझ्यासाठी महेशा राम यांचा सत्संग यासाठी महत्त्वाचा होता. काहीतरी गोष्ट शोधण्यासाठी असते. त्याचा प्रवास शांततेत व्हायला हवा. नंतर जे काही चांगलं-वाईट सापडेल ते आपलं असेल. शांततेचा शोध बहुतेक संगीतात आहे असं कबीर यात्रेत गायलं जाणारं जे लोकसंगीत आहे ते ऐकताना सतत वाटत राहील. एखाद्या गोष्टीत रमून जाणं क्वचित घडतं. महेशा राम ऐकताना मी रमून जातो.


पिया जी थारो पंथ है भारी
मुझे प्रेम की कटारी डारी
मधुर सुर बोल रे कागा
मीरा रो मन राम से लागा

सत्संग संपवताना महेशा राम यांनी मीराबाईचं हे भजन गायलं. मी पुन्हा नेमकं आपण कशाच्या शोधात आहोत विचार करत बसलो. आणि हा शोध नेमका कसा घेतात असा पेच माझ्यासमोर उभा राहिला. प्रश्नातच उत्तर आणि उत्तरातच प्रश्न असा घोळ निर्माण झाला.

 

परतीच्या प्रवासात प्रकाश खातू भजन गातोय. फोटो : शोधण्यातली खाडाखोड 

प्रकाश खातू या बाडनेर मधल्या मुलाने फलासिया आणि सलूंबर येथे अक्षरशः धमाल आणली. काय एनर्जेटिक आवाज. सलूंबर मध्ये पावसामुळे मूड गेलेला. पण या पोरांनी अक्षरशः सगळ्यांना जागेवरून उठवून नाचायला लावलं. यात्रेच्या शेवटच्या दिवशी भीम या गावातून जयपूरकडे निघताना बसमध्ये याला मी गायला लावलं. बाडनेर मधल्या अनेक तरुण मुलांसह त्याने मौखिक परंपरेतील लोकगीतं तोंडपाठ केली आहेत. गावात सार्वजनिक कार्यक्रम किंवा सत्संगामध्ये ते आपलं गायन सादर करतात. कबीर यात्रेत मीराबाईच्या 'बाई मीरा ने गिरीधर मिलिया' या अप्रतिम भजनाच्या गायनाने त्याने सगळ्यांना जिंकून घेतलं. राजस्थान कबीर यात्रेच्या लोकगायकांपैकी प्रकाश खातू हा सर्वात तरुण गायक आहे. मौखिक परंपरेतून मिळालेलं उत्कट ज्ञान हा प्रकाश आणि त्याच्या सहकारी गायकांच्या गाण्याचा मूळ स्रोत आहे. या परंपरेच्या प्रसारासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिलं आहे.

गाडी पुन्हा पुढच्या मुक्कामाला निघाली. पुन्हा वेगळं गाव. उदयपूर-कोटडा-फलासिया- कुम्भलगड राजसमंद-सलूंबर-भीम करत अखेर बस जयपूर इथं पोचली.

आठ दिवस धावपळीचं संगीत मागोमाग. तीन-चार तासांची झोप. सकाळी पाणी मिळालं तर अंघोळ नाहीतर सगळा बोजा घेऊन सरळ गाडीत बसायचं. गाडीत पुन्हा संगीत. नव्या ओळखी. किस्से. आठवणी आणि बरंच कायकाय मागचं पुढं घेऊन जाणारा प्रवास. यात्रेच्या एका स्थळावरून दुसऱ्या स्थळाचं अंतर साधारणतः शंभर-दीडशे किलोमीटर. दोन गावांदरम्यानचा प्रवास आणि आदल्या रात्रीच्या जागरणाचा थकवा. पण थकवा असं काही आपल्या म्हणता येत नाही. जाणवत नाही असंही आपण म्हणू शकत नाही. फक्त तसं लक्षात येणारं वातावरण नसतं आसपास. आठ दिवस कानात असंख्य गोष्टी शिरतात. नव्या-जुण्या. कायकाय घ्यावं किती ऐकावं आणि काय नको ते अजिबात ठरवण्याची सोय नसते. तरी किंचित वेळ मिळते आपल्याला काहीतरी यातलं मनापासून लागलंय याची जाणीव होणारी. त्यांच कनेक्शन कधीतरी जुळलं जातं. नाहीतर नुसता गोफ होतो सगळ्या ऐकण्यापाहणाऱ्या दृश्याचा.

जयपूरहून मुंबईकडे येताना मी यात्रेतल्या रेकॉर्डी ऐकत होतो. प्रहलाद टिपाणीया, महेशा राम, बागे खान, मीर बसू, काळुराम बामनीया, मुरालाला मारवाडा, गवरा देवी, रायजिंग मलंग, प्रकाश खातू, आठवत राहिले. पण एक वेळ अशी आली कि फक्त शांत बसून राहिलो. मग


सभी ठौर जमात हमरी
सब ही ठौर पर मेला
हम सब माय सब है हम माय
हम है बहुरी अकेला

हे कबीराचे शब्द आठवत राहिले. गाडीनं वेग पकडला नि आठवणी एकेकट्या होत गेल्या.

पूर्वप्रसिद्धी : ‘वसा’ दिवाळी, २०२३.

 *** 


अधल्यामधल्या भटक्यानोंदी : मुक्काम बगरु

बगरु गावात शिरताना  जयपूरपासून साधारणतः चाळीसेक किमी अंतरावर असलेल्या बगरु गावात होस्टेलमधल्या एका मुलाला घेऊन गेलो. तो बाईक घेऊन राजस्थान फ...