Wednesday, January 31, 2024

चार कविता : अधली-मधली खाडाखोड

या चार कविता बहुतेक कोविडच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लिहून झाल्या. मनोज पाठक यांच्या 'वर्णमुद्रा' या  मासिकात यातील पहिल्या तीन कविता प्रकाशित झाल्या होत्या. नंतर नंतर कविता किंवा काहीएक सुचणं वगैरे आपण म्हणतो ते साधारणतः या कवितांच्या लयीत सुचू लागलं. लिहिताना शब्द आपोआप त्यांची त्यांची लय घेऊन उतरतात असलं काही त्यावेळी जाणवलेलं. अलीकडे सहाएक महिन्यात कविता लिहून झालेली नाही. त्यामुळं आता त्याबद्दल अधिक बोलता यायचं नाही. पण त्यावेळच्या आपल्या मनस्थितीबाबत हे नोंदवावं वाटलं. कदाचित हीच लय डोक्यात आताही बसली असेलही. किंवा डोक्यातून गेलीही असेल. शब्दाला नवी वळणं लागायला हवीत च्यायला. माहित नाही. पण बघू नवी कविता लिहीपर्यंत काय होतं या अवस्थेचं ते.
तोपर्यंत या चार कविता.  

***




१. धाबायधा

धाबायधाच्या चौकोनी अडगळीत 
संचारतं शरीर काटकोनत्रिकोण लंबगोलाकार

अग्रीमेंटच्या पेप्रावर गॅस त्यावर  
जर्मन टोपात रटरटतो भात सुस्वर 
कमवणारी दोन खाणारी धा 
जिभेवर चव खरपूस व्यर्थ घरंदाज 

संडासच्या लायनीत चिम्पाट वेळखात 
टमरेलभर पाणी डोईवर 
सार्वजनिक पाणी चुळभर नरड्यात 
फोद्रीत मसाला भरण्याची प्राचीन भाषा 
जिभेवर अंगाखांद्यांवर खेळतीजन्मजात 

लंगोटअंडरपँटब्राकुबटवासटॉवेल दृष्टिसातत्यात 
देवासमोर सुवासिक अगरबत्ती स्वस्तात
चप्पल शिवायला मोची कंटाळलेला वारंवार 
तोंडात गोष्ठी मोठेपणाच्या रस्त्यात 

धाबायधाच्या चौकोनी अडगळीत 
अंगावर मुताने परमळलेली गोधडी घेत 
जन्म नांदतो दिगंतर अदृश्य वाऱ्यासारखा 

***

२. आरभाट शाखेत हसतात चिरमुरी ओठ 

आरभाट शाखेत हसतात चिरमुरी ओठ 
चिंचोळ्या गल्लीत स्पर्श 

भिनभिनतो कातडीसदृश्य अंगात 
पापणी लवेपर्यंत घमघमतो सुवासिक दर्प 

दर्प ओला उडवतो थरकाप 
थिबकतो नादलयसदृश्य घमघमाट 

गर्भार डोळ्यात साचते गगनचुंबी इंद्रधनुष्य धूळ 
चिवचिवाट कर्कशतो 
निष्पर्ण फांदीवर 

दोलायमंतो घालमेल उपासपोटी 
येणाऱ्याजाणाऱ्या ठायी कुजबुजतो आडोशी चपट्याभिंती 

निस्तेज चेहरा मुसमुसतो नयनकंपी 
वाऱ्यासरशी केसाळ चेहरा झाकतो
डोळा अश्रूंच्या पदरी हळहळतो हात
 
पुसतो डोळा लाल ओठीओठ 
चिटकवतो बंद डोळा 
रक्ताभिसरण पुर्वव्रत गल्ली शरमते तुंबवत गटार
 
येजा पुर्वव्रत कपाळ थंड 
तसे पुर्वव्रत मार्गाने आम्ही आपापल्या 
तसे अनोळखी नेहमीचेच 

आरभाट शाखेत हसतात चिरमुरी ओठ 
लाजवतात मरणकळा 

***


३. बेरोजगार लाळेच्या मजबूर येडझव्या दृश्यात 

१.
 
आहे पण दिसत नाहीय अशा संभ्रमावस्थेत 
लादीवर उताणी डावंउजवं शरीर 
एका कावळ्याची तीक्ष्ण चोच बोचत चाल्लीय नजरदृष्याला आणि डोळ्यासमोर काळोख पसरलाय भरदिवसा 
२. 
मिजासखोर गुणवैशिष्ट्यात जीभ झालीय
पापडलोंची चवीपुरती मर्यादित
शरीर कशालाच डिमांड देत नाहीय कि 
कसलाच रिस्पॉन्स देत नाहीय सजीवसदृश्य 
३.
झाड आहे पान आहे हवा आहे ढीगभर अमर्याद 
तरी शरीरातून वजा होतोय घाम होऊन 
प्राण थेम्बथेम्ब कि 
झाडालापानालाहवेला दोष देता येत नाहीय 
स्वतःच्या मर्जीत असतात निसर्गाचे व्यवहार सगळे 
४. 
एकटेपणाची आयाळं खाजवतात 
बढाईखोर गांडमस्ती पापणी भुयारं 
निजतात खडकाळ माथ्यावर चिंताग्रस्त सदासर्वदा 
शरीराचं वारूळ होऊन लागलीय रांग मुंगीसदृश्य 
५.  
बोल्तालिवताबिवता येत नसते भुकेची व्याख्या किंवा 
खोटंखोटं नाटकही करता येत नाही भुकेसमोर 
किंवा भुकेची समजही घालता येत नाही 
हातापायापडून डोळेओले करून 
६. 
बेरोजगार लाळेच्या मजबूर येडझव्या दृश्यात 
चढत नाही दातावर मांस 
भातावर डाळीचं पाणी कालवून 
पिता येतं पोटभर पाणी 

पाण्याची पाणीपट्टी भरावी लागते दर महिन्याला ही पुन्हा नवी तऱ्हा नवा व्याप 

***

४. एकाखालीएक मुद्देसूद हळहळ 

टोलेजंग 
इमारतींच्या 
पायथ्याशी 
घुटमळतो 
धाबायधाचा 
नखाएवढा 
जीव 
उष्णसमशीतोष्ण 
पट्ट्यात 
भोवळतात 
माथी 
एकावरएक 
दोनावरदोन 
आकडे 
या
सुशिक्षित 
बेजरोजगार
कंगाल
डोळ्यात 
एकटक 
कटकट 
सतावते 
उदाहरणार्थ 
साक्षात 
किंचित 
संचित  
डोकावतं 
फाटक्या  
बनियनबर्मोड्यात 
कॅलेंडर 
तारखा 
मोजतात 
दरमहा 
रुपयांची 
जमापुंजी  
अखेर 
सरता 
महिना 
हाती 
शून्यगोळाबेरीज 
एकाखालीएक 
मुद्देसूद 
हळहळ 
कालवाकालव 
माजवते 
या 
जड
जड 
डोक्यात 
बेमालूमपणे 

***

Saturday, January 6, 2024

तीन कविता : अधली-मधली खाडाखोड

खाली दिलेल्या तीन कविता अशाच अधेमध्ये कधीतरी लिहून झाल्या. बहुतेक कोविड दरम्यान. निरोपाचं गाणं वगळून. ती अशीच कुठल्यातरी काळात लिहून झाली. चांगलं-वाईट घडतं त्याला प्रतिसाद म्हणून अशी बिलकुल समजूत करून घेऊ नये. मीही तशी करून घेतलेली नाही. निदान कविता लिहिल्यामुळे मी शाबूत तरी राहिलो. नाहीतर भलत्याच गोष्टी घडण्याला वाव असतोच. मागचं-पुढचं कुणाला काय माहित असतं ! 
मंगेश नारायणराव काळे या कवी-चित्रकार माणसानं कधीतरी ते चालवत असलेल्या 'खेळ' या अनियतकालिकासाठी या कविता छापण्यासाठी मागवल्या. त्या अंकात आणखी एक कविता होती, ती मात्र इथं या पोस्टमध्ये जोडलेली नाही. पुढेमागे कधीतरी तीही पोस्टेनच.
एवढं पुरे. ठीकाय. 

***




1. स्वप्नात लोळतात सप्तरंगी गालिचे 

पूर्वार्ध : 

स्वप्नात लोळतात सप्तरंगी गालिचे 
नवेनवे हवेहवेसे उबदार बिनखर्चाचे 
कठोर डोळ्यात खुपसतो ऐषोआरामी हळहळ 
विसरतात रडणं फुटले डोळे पंचविशीचे 
टपकतात खत्रूड उडाणटप्पू कळप 
आलिंगनी आभाळ छाताडी धडधड गरजते
केसाळकातडं लुसलुशीत लसूणफोडणी 
बत्तीशी तोंडात जुलूस उजागर खमंगतो
मध्यांतर : 
वाडवडला महापुरुषा आज्यापणज्या ठिकाणदारा 
मालका गणपतीबावा गजानना उभा ऱ्हा ज्याची करणी 
त्याच्या मस्तकी आपट आणि सुखात ठेव बावा म्हणत 
बाप ओवाळतो अगरबत्ती रोज आंघोळ करून 
उत्तरार्ध : 
नस्तो कोणकुणाचा आपले आपण अस्तो एकटे 
एकट्याच्या अवतीभोवती एकट्याचा फापटपसारा 
रांत्रदिन मृत्यू मुकाबला भयभीत डोळ्यात उजाडते सकाळ 
कुरतडतात आवाज क्षणाक्षणाचे क्षण बेमालूम 
टरकवतात घटका झोप आणि पान गळतं दिशाहीन 
नित्यनियमाने घोरतात नाकपुड्या विलक्षण डेंजर 
वळवळतो हव्यासभर च्यायचा घोडा निमूटपणे 
स्टिलच्या कपात कोऱ्या चाईत बुडबुडतो पुडा पार्लेजीचा  
बुचकळतो बादलीभर पाण्यात मरतुकडं शरीर खात 
गटांगळ्या इचकत चावतो दात पेलतो शिव्या अफलातून 
भरपगारी खळखळतो चिल्लर कंगाल महिना
फाटका खिसा फाटकं नशीब खिदळतं निष्ठावंत तोऱ्यात 
स्वप्नात लोळतात सप्तरंगी गालिचे 
नवेनवे हवेहवेसे उबदार बिनखर्चाचे 

***

2. मुसळधार पावसाळी आकृतीत अर्थात विस्कळीत आत्मचरित्रात्मक नोंद 

१. 
मुसळधार पावसाळी आकृतीत 
वाजतात तीनतेरा 
निरामय डोळे विरघळतात कपाळी जीभ बोबडी पडते 
२. 
भाडोत्री खूणगाठ विस्फारते 
चकणाचुर भिंतींना 
मोरीत तुंबतात खरकटी शीतं 
३. 
तुडुंब पाण्यात 
बुचकळतो शरीर डोईवर 
तांब्याभर पाणी मांडी घालून 
४. 
रैवारच्या जिभेला सुटते खाज 
दाल्दीनीला पाचपन्नास शिव्या घालून 
उर्मट दात चाटतात जिभल्या 
५. 
तिनसांच्याला कपाळाला लागतो हात 
पिढीजात वंशावळ 
उगवते दुष्काळ डोळ्यात 
६. 
बसल्या तटावर भोवळ आणते 
डेरेदार मिजास 
एन्टायमाला ठसका लागतो 
डोळे ओतायला लागतात 
ही यातनांची लंबीचौडी पिलावळ 
७. 
उजाडताना ह्या भुरटभुरट 
सकाळी गिरवतात 
उभ्या दिवसाला गच्च माथ्यात 
८. 
कुठल्याही दवाउपचाराने शांत होत नाही 
ही शरीर पोखरत चाल्लेली कीड अथवा 
नष्ट होत नाही तीचं दर्शनी कवडीइतकं नामोनिशाण 
९. 
कुठल्याच प्रहरी मान वर करवत नाही 
घरच्यांच्या तोंडात दर्वळतात 
सरकारी नोकऱ्यांचे फॉर्म 
उपसतो ही अनाठायी शैक्षणिक उलाढाल 
१०. 
हे भव्य आभाळ डोईवर 
मिऱ्या वाटायला लागतं 
दिशाहीन गलबत हेलपाटतं समतोल कक्षेत 
११. 
अंथरुणात कुबट वास शिरतो 
नाकाला सवयीचा होतो 
पाय कुजतात हळद लावून सकाळी 
शरीर उभं पायांवर मर्जीत 
१२. 
रात्री पाय एकमेकांवर चढतात 
नखं टोचतात डोक्याला डोकं लागतं 
आणि डोळे झिरमतात किन्न काळोखात निमूट कंटाळून 
रेशनचे गहूतांदूळ पाखडून चारघास खातात पाचसा तोंडं 

***

3. निरोपाचं गाणं 

आपण एकमेकांपुरते एकमेकांसाठी होतोनव्हतो 
तारांबळ क्षणिक घटकेपुरती 

धांदल जवळीक उताणी अर्धचंद्र 

शिफारशी नामंजूर बेदखल सहेतुक 
डोळे वितळत डोंगराळ गालफडांवरून 

गर्जत आक्रोश कानठळ्या बेशुद्ध वाचा गेली 

स्पर्श कोलमडले गोठीव स्तनांवर
हातापायातडोक्यात मुंग्या वळवळल्या तात्पुरत्या 
दिगंतर चावत नखांवरनखं 

मधल्यामध्ये जीभ साकंडली रक्ताची थुंकी पोटात गेली

येजाकरत राहिलीस डेरेदार नखऱ्यात 
हुलकावणी फाजील क्षणिक सोहळ्यात 

खुपत संपत उरत गेलीस थंडअखंड डोळ्यात 

कस्मेवादे धुपूत गेले 
नावाच्या शपथा चुलीत गेल्या 
भेटण्याच्या जागी गवताळ प्रदेश वाढले 

झाड झाड राहिलं नाही 
पाणी पाणी राहिलं नाही 
नाही मातीचा सुगंध सुगंध राहिला 
तरी शरीराचे गुणधर्म बदलले नाहीत 

नाही होकार - नकारातलं मौनव्रत सुटलं शेवटच्या क्षणी 

ओठांवरओठ थर्थरले 
अवाक्षर डोळे निथळत हातातले हात सुटले 

***



Tuesday, December 19, 2023

अमुकच्या व्याकूळतेचा तळशोध

‘अमुकचे स्वातंत्र्य’ ही फक्त एकाकी आणि तुटलेपणाच्या अवस्थेचं चित्रण करणारी कादंबरी नाही. तर माणूसपण या मूल्याला सर्वाधिक महत्त्व देऊन त्याच्या स्वातंत्र्याविषयी मूलभूत चिंतन व्यक्त करणारी कादंबरी आहे. स्वतंत्र असणं म्हणजे हवं असलेलं मिळणं नव्हे, तर काय हवंय ते ठरवता येणं. आपल्या आयुष्याचं काय करायचं ते ठरवता येणं. स्वातंत्र्य म्हणजे नसलेलं मिळवणं नव्हे, तर असलेलं नाकारणं. नकार जगणं हेच माझं स्वातंत्र्य असे म्हणणारा आणीबाणी काळातील नायक यात आहे. 

***

‘‘माझ्यावरचा मुख्य आरोप हा की मला अँम्बिशन नाही. याचा अर्थ इतकाच की माझ्या आई-वडिलांना मी सी. ए. करून चांगला मोठा एक्झिक्युटिव्ह बनावं असं अँम्बिशन आहे, आणि मी सी. ए.च्या परीक्षेला बसलो नाही. तेव्हा मला अँम्बीशन नाही. हे तसं आपल्याला मान्यच आहे. आयुष्य ही काही मला पैसे मिळवण्याची संधी वाटत नाही. आणि आपलं सबंध आयुष्यच्या आयुष्य दुसऱ्याला आयते पैसे मिळवण्यासाठी देऊन टाकणं तर आपल्याला साफ नाकबूल आहे. तेव्हा मला अँम्बिशन नाहीच. मी तळ नसलेला माणूस आहे. मला जमिनीत रोवायला मुळंच नाहीत.’’
शशांक ओक यांच्या १९८७ साली पॉप्युलर प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या कादंबरीतील सुरुवातीच्या पानांतील या काही ओळी आहेत.

मुखपृष्ठ : राजू देशपांडे, पॉप्युलर प्रकाशन 
१९६० सालापासून प्रकाशित झालेल्या ‘धग’, ‘कोसला’, ‘बॅरिस्टर’, ‘अनिरुद्ध धोपेश्वरकर’, ‘चांगदेव चतुष्टय़’, ‘माणूस’, ‘पुत्र’ आणि अशा कैक कादंबऱ्या अस्तित्ववादी कादंबऱ्या म्हणून ओळखल्या जातात. नवे अनुभवविश्व हा या सगळय़ा कादंबऱ्यांचा विशेष. पारंपरिक कादंबरीच्या रूपाला छेद देत वास्तवाचा अन्वयार्थ लावणं आणि कादंबरी या घटकाकडे सामाजिक दस्तऐवज म्हणून या नवकादंबऱ्यांसंदर्भात आपल्याला पाहता येतं. ‘अमुकचे स्वातंत्र्य’ ही कादंबरी त्याच वाटेवरची असली तरी तिचं वळण मात्र या सर्वांहून भिन्न आहे. वेगळं आहे.
आदलं-आत्ताच्या मधल्या घुसमटीत अडकलेल्या, माणूस आणि स्वातंत्र्य या मूल्यांचा आस्थेनं शोध घेऊ पाहणाऱ्या तरुणाची आणीबाणीच्या काळात घडणारी व्याकूळ गोष्ट ‘अमुकचे स्वातंत्र्य’ मध्ये आहे. निवेदकाचं निम्मं बालपण पाळणाघर आणि उरलेलं एकटय़ानं वेळ घालवण्यात नाहीतर वाट बघण्यात गेलेलं आहे. मध्यमवर्गीय नोकरदार आईवडील. वडिलांचं नोकरीनिमित्त गावोगाव फिरणं आणि आईची ८ ते ६ नोकरी. अशा बालपणावर काय उभं राहणार असा वैफल्यग्रस्त प्रश्न निवेदकाला पडलेला आहे.

आपले स्वातंत्र्य जपताना निवेदक ‘माणूस’ म्हणून जगण्याची पराकाष्ठा करताना दिसतो. पण हेही तात्पुरतं आहे, यालाही काही काळाने धक्का लागणार आणि आपल्या धडपडीला काहीच अर्थ उरणार नाही, अशी भावना त्याला प्रत्येक वेळी जाणवते. आपल्या भोवताली जे चाललेलं आहे त्याचा जराही संबंध आपल्या जगण्याशी नाहीय, जे जे सुरूय त्यातलं काहीच आपल्याशी ‘रिलेट’ होऊ शकणारं नाहीय अशा अवघडलेल्या मन:स्थितीत निवेदक अडकलेला आहे. आज निघून जातो आणि उद्या सारखा येतंच राहतो अशी भयंकर तगमग त्याला बिलगून आहे. जीवन भावनाशून्य आणि यांत्रिक आहे, माणूस स्वार्थी आहे आणि म्हणूनच आपण एकेकटे पडत चाललो आहोत असा अगदी पाळणाघरातल्या दिवसांपासून ते ‘सीए’चं सर्टिफिकेट फाडून टाकण्यापर्यंतच्या दिवसांच्या क्षुल्लकपणात त्याला जगण्यातल्या विरोधाभासाची अर्थहीनता पदोपदी जाणवत राहते. म्हणूनच पाळणाघर आणि अनाथालय यात त्याला काहीच भेद करता येत नाही. लहान वयात निवेदकाच्या अबोल आणि अंतर्वक्र एकटेपणाला बिलगलेली ही व्याकूळता शशांक ओक या कादंबरीत तिरकस विनोदाने आणि भेदक उपहासाने पानापानांत पेरतात. यातून मानवी मूल्यांच्या फोलपणाचं लक्षण ते दाखवतातच शिवाय विस्कटत चाललेल्या सामाजिक घडीचं आणि मानसिक स्वास्थ्याच्या दुभंगलेपणाचं चित्रणही ते मोठय़ा खुबीने रंगवतात. पात्रापात्रांत होत असणाऱ्या संवादात, घटनाप्रसंगात, रिकामपणात या दुभंगलेपणाची, तुटलेपणाची आणि व्याकूळतेची दाट अस घुसमट कादंबरीभर सलत राहते. या कादंबरीतील मानसिक संतुलन बिघडलेलं शिरीष साठे नावाचं पात्र एके ठिकाणी म्हणतं, ‘‘डोक्यातलं हे वजन... त्याचीच काळजी वाटतीय.’’ त्याच्या वेडसरपणाला निवेदक आणि त्याचा मित्र अन्या स्वत: जबाबदार असल्याचं ठरवतात. रूढार्थाने आखून दिलेल्या सामाजिक चौकटी ओलांडून स्वत:ला हव्या असलेल्या जगण्याचा शोध घेण्यासाठी पुढं सरसावणं आणि त्याला मानसिक धैर्य गमावून बसलेली पिढी म्हणून उल्लेखणं आणि या ओढवलेल्या परिस्थितीलाही त्याचं कारण ठरवणं यातल्या छुप्या सामाजिक हेवेदाव्यांचं चित्रणही ओक अत्यंत बारकाईने करतात. त्यातून आलेली व्यक्ती आणि समाज यांच्या मोकळीकतेची आणि स्वतंत्रतेची एककंही अधोरेखित करतात.

यातूनच बेडकिहाळकर नावाचं पात्र तीन मुलींच्या नंतर जन्मलेला मुलगा म्हणून घरी श्रेष्ठ ठरतो आणि त्याच्या बहिणी याच्या आज्ञेचं पालन करणाऱ्या ठरतात. पण शाळेत तो अत्यंत गरीब घरातला कुरूप, ढ, बुटका आणि सामान्य ठरतो. त्यामुळं घराबाहेर पडल्यावर त्याला प्रचंड न्यूनगंड येतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वाची ही दोन विषम टोकं सांधण्यात तो कधीच यशस्वी होत नाही. दुसरं विजय नावाचं गुंतागुंतीचं पात्रही असंच. आजोबांनी लंपास केलेली इस्टेट त्याच्या बापानं काकाला भानगडी करून हाकलून देऊन स्वत:च्या नावावर केली. त्यामुळं शाळेत त्याला मुलं या भानगडीवरून सतत चिडवायची. त्यामुळं लोक आपल्याकडे एका भानगडबाज बापाचा मुलगा म्हणून पाहतात, ओळखतात अशी ठाम समजूत विजयची झालेली आहे. यातून त्याच्या एका मनाचा कोपरा कायम बंद झालेला आहे. त्याचा बाप हुकूमशाह प्रवृत्तीचा आहे आणि या प्रवृत्तीतून तो विजयला आणि त्याच्या आईला मारहाण करतो. त्याची आई निमूटपणे सहन करते आणि नवरा म्हणून देव वगैरे समजून पाडव्याला त्याची पूजा करते. व्यक्ती म्हणून वावरताना या दोन विषम टोकांचा न्यूनगंड घेऊन जगणारी आणि सतत दडपणाखाली वावरणारी ही पात्रं या कादंबरीत ओकांनी रंगवलेली आहेत. त्यांच्याकडे एक व्यक्ती म्हणून पाहताना एक समाज म्हणूनही पाहावं लागतं. त्यांच्या जगण्यातले अंतर्विरोध हे ते ज्या काळात जगतायत त्या जगण्याशी जोडलेले आहेतच शिवाय समूहाचं चित्रण म्हणून ते कादंबरीत एकटंही येत नाही. आजच्या जगण्याशी अनेक अर्थानी ते बांधता येईल इतकं ते कालसुसंगत आहे.

या कादंबरीतील निवेदकाचा इथल्या सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक आणि आर्थिक व्यवस्थेला नकार आहे. माणूसपणाच्या जवळ जाणारं एकही स्ट्रक्चर या भोवतालात नाहीय. जी संरचना निर्माण झालेली आहे ती यांत्रिक आहे. तिला माणसाचं स्वातंत्र्य मान्य नाही अशी व्याकूळता या नकारात आहे. त्यामुळं या परिसंस्थेत वावरताना निवेदकाला त्याच्या बागेत घोसाळय़ाच्या वेलाला एक मोठं घोसाळं जागच्या जागीच वाळून गेलेलं दिसतं. निवेदकाला आतून तसं वाटायचं. या एकाकीपणातही तो म्हणतो, ‘मी स्वतंत्र होईन. एक ना एक दिवस स्वतंत्र होईन. मला हवं ते करीन. मला हवं तसं करीन.’ पण या भावना व्यक्त करतानाच त्याला त्याच्या मित्रांच्यातल्या एकाच्या भावाच्या लग्नाला बोलावण्यासाठी केलेली यादी दिसते. त्यात त्याला त्याचं नाव दिसत नाही. आणि तेव्हा तो म्हणतो, ‘मी यांच्यातला एक का बनू शकत नाही?’ एकीकडे या सगळय़ा परिस्थितीला बळी न पडता नाकारायचं आणि त्याच परिस्थितीत स्वत:चा अवकाश शोधायचा अशी असह्य गुंतागुंत त्याच्या वाटय़ाला येते. तो म्हणतो, ‘‘... आपण स्वत:लाच धरून बसतो. कशातही पडायची आपल्याला भीती वाटते. कशातही अडकायची भीती वाटते. स्वत:च्याच भिंती बांधून स्वत:ला तोडून घेतो आपण आणि त्यातच स्वतंत्र आहोत असं भासवतो. आपल्याला स्वत:ला सोडता येत नाही. आपलं स्वातंत्र्य खरं नाही. आपल्याला काडीइतकी किंमत नाही. आपलं सगळं खोटंच असतं. काहीही केलं तरी ते खोटं, अर्थहीन, विफल. आपलं स्वातंत्र्य खरं नाही. आपलं काहीही खरं नाही...’’

या व्याकूळतेच्या तळाशी कादंबरीतील सर्व पात्रांना मानसिक स्थैर्य हवं असल्याचं दिसतं. निवेदकाच्या आईवडिलांना निवेदकाच्या समस्या तुलनेनं छोटय़ा आणि बिनमहत्त्वाच्या वाटतात. निवेदक आपल्याला थकवा आलाय, मला बरं वाटत नाहीय असं म्हणतो तेव्हा त्याचे आईवडील या वयात कसला आलाय थकवा, काही काम करायला नको, तुमच्या वयाचे आम्ही होतो तेव्हा वगैरेवगैरे ऐकवतात. अशा वातावरणात या सगळय़ाला नाकारत सुटत, परीक्षेला न बसण्याची आणि अखेर सीएचं सर्टिफिकेट फाडण्यापर्यंतची मजल निवेदक गाठतो. हे बंड त्याने आपल्यावर विनाकारण लादलेल्या आणि आपल्याला नको असलेल्या बिनमहत्त्वाच्या गोष्टींविरुद्ध पुकारलेला आहे. सामाजिक प्रतिष्ठा म्हणून असलेल्या नावलौकिकातल्या फोलपणाला दिलेलं हे सक्षम उत्तर आहे. त्यावर तो ठाम आहे. दुरून मुलींकडे पाहून पुंगुड स्वप्न पाहण्यात आणि मासिकांवरच्या बायांच्या शरीराला सिग्रेटीचे चटके देण्यातून लैंगिक भावनांचा कोंडलेपणा दिसतो. तरीही कादंबरीतल्या पात्रांची लैंगिकतेविषयीची जाणीव एखाद्या थांबलेल्या क्षणासारखी स्तब्ध आहे. मुली पाहण्यात आणि नजर लपवण्याइतपतच हे आकर्षण आहे. यापलीकडे लैंगिक भावनांना कुणीही वाहू दिलेलं नाही. लैंगिक आकर्षणाबाबतचा एकप्रकारचा अशक्य अवघडलेपणा या कादंबरीतल्या पात्रांच्या मन:स्थितीत दाटलेला आहे. मुक्ततेची मर्यादा न ओलांडता त्याच अवकाशात मुलींबद्दल आणि पुढे लग्न झालेल्या बायांबद्दल निरीक्षणं येतात. त्यातही कोरडेपणा आहे. पण तोही आशयाला जोडलेला आहे.

आणीबाणीच्या आसपासच्या काळाचं रेखाटन, प्रचंड भाववाढ, संप, कॉलेज निवडणूक, मारामाऱ्या, आंदोलनं, टाळेबंदी, दंगली आणि या सगळय़ा पार्श्र्वभूमीवर स्वत:च्या स्वातंत्र्याचा व्याकूळ शोध असं या कादंबरीचं सूत्र आहे. हे इतकं बाहेर घडत असतानाही निवेदकाला स्वत:चा अनुभव, स्वत:च्या भावना व्यक्त करता येत नाहीत, स्वत:च्या जगात इतर कुणाला भागीदार बनवता येत नाही. रिकामं वाटणं आणि काहीच न करावं वाटणं ही अत्यंत उदासीन अवस्था या कादंबरीच्या पानापानाला बिलगून आहे. कादंबरीअंतर्गत काळाचं आणि पात्रांचं ते एक महत्त्वाचं वैशिष्टय़ आहे. आजचंदेखील.

फक्त एकाकी आणि तुटलेपणाच्या अवस्थेचं चित्रण करणारी ही कादंबरी नाही. तर माणूसपण या मूल्याला सर्वाधिक महत्त्व देऊन त्याच्या स्वातंत्र्याविषयी मूलभूत चिंतन व्यक्त करणारी ही कादंबरी आहे. ज्या सामाजिक संरचना निर्माण झाल्या आहेत त्या निभावून नेताना त्यातली पोकळता आणि त्यांच्या असण्यात आपल्या अस्तित्वाचं होणारं स्खलन अशा दुहेरी पातळीवर अधांतरी लोंबकळणं वाटय़ाला येऊन आपल्या स्वातंत्र्याचा शोध घेऊ पाहणारी ही कादंबरी आहे. जन्मायचं की नाही ही निवड आपल्याला नाही. म्हणजे तिथेही आपण स्वतंत्र नाही. मृत्यूतही स्वतंत्र नाहीच. आपण स्वतंत्र नाहीच. अशाप्रकारची भावना निवेदक व्यक्त करतो. प्रत्येकाला असा एक प्रदेश लागतो जिथं त्याचीच पावलं उमटलेली असतील आणि ज्यात फक्त त्याचीच पावलं उमटतील. जिथे तो शांतपणे जगू शकेल. राहू शकेल. तो प्रदेश. जपायला हवा. हा प्रदेश जपण्यासाठी निवेदकाचा झगडा सुरू आहे. आणि बाहेरचं वजन मात्र असह्य आहे. ही त्याच्या स्वातंत्र्याआड येणारी भिंत आहे.
निवेदकाला हवं असलेलं स्वातंत्र्य मग नेमकं कसं आहे?
तो म्हणतो, ‘‘स्वतंत्र असणं म्हणजे हवं असलेलं मिळणं नव्हे, तर काय हवंय ते ठरवता येणं. आपल्या आयुष्याचं काय करायचं ते ठरवता येणं. स्वातंत्र्य म्हणजे नसलेलं मिळवणं नव्हे, तर असलेलं नाकारणं. नकार जगणं हेच माझं स्वातंत्र्य.’’
‘‘मी काहीही करीन पण काहीही करणार नाही. सीए होण्यापेक्षा मला माणूस होणं जास्त परवडेल.’’
हे निवेदकाचं कादंबरीच्या शेवटी येणारं वाक्य स्वातंत्र्याच्या व्याकूळ तळशोधात असलेल्या निवेदकाच्या मानसिक स्वास्थ्याचा शांत ठहराव आहे. यानंतर काहीही आधीसारखं असणार नाही. कितीतरी नवी स्ट्रक्चर उभी राहिली तरी त्याचं दरवेळी नकार जगणं हेच प्राधान्यक्रमानं वरचढ ठरणार आहे, अशी ठाम समजूत ही कादंबरी निर्माण करते. स्वत:चा प्रदेश जपण्याला महत्त्व देते. त्यातला स्वातंत्र्याला महत्त्व देते. म्हणून तिचं वळण महत्त्वाचं.

या कादंबरीच्या दुसऱ्या वाचनानंतर कुतूहल म्हणून मी पुण्यात जाऊन शशांक ओकांना भेटलो. त्या भेटीत त्यांच्याकडून ‘अमुकचे स्वातंत्र्य’च्या पुढच्या भागाची जवळपास अडीचशेहून अधिक पानं लिहून झाल्याचं कळलं आणि पुढच्याच वाक्यात ती सगळीच्या सगळी पानं चोरीला गेल्याचंही.
‘अमुकचे स्वातंत्र्य’च्या मलपृष्ठावर पुढच्या भागाची पूर्वसूचना देताना असा मजकूर येतो :
अमुकचा ‘स्वातंत्र्य लढा’ संपलेला नाही. तो चालूच राहणार..
सुरुवात कोणती आणि शेवट कोणता ?'

त्यानंतर वैयक्तिक आयुष्याच्या बऱ्याच दमवून टाकणाऱ्या उलथापालथी निभावून नेण्यात ओकांनी पुढं काहीच लिहिलं नाही. या कादंबरीची लेखकाकडे एकही प्रत सध्या उपलब्ध नाही. एकदोन ग्रंथालयं वगळता दुसरीकडे कुठे असण्याची शक्यताही तशी कमीच. या कादंबरीच्या प्रकाशन संस्थेचं- पॉप्युलर प्रकाशनाचं शंभरावं वर्ष सध्या सुरू आहे. निदान त्यानिमित्ताने तरी ही कादंबरी उपलब्ध व्हावी असं आपण फारफार मनातलं बोलू शकतो. आपल्यापुरतं एवढंच बोलण्याजोगं उरतं.
***
 

( हा लेख लोकसत्ता, रविवार १० डिसेंबर च्या लोकरंग पुरवणीत 'आदले । आत्ताचे' या सदराअंतर्गत प्रसिद्ध झाला आहे.)  


Tuesday, December 12, 2023

दोन कविता : अधली-मधली खाडाखोड

अधेमधे लिहिलेल्या या दोन कविता. एकामागोमाग ह्याच का ? तर त्याचं काही ठराविक उत्तर नाहीय. इथं नोंदवाव्यात असं वाटलं म्हणून त्या इथं आहेत एवढंच सांगता येईल. आणखीही आहेत त्याही अधेमधे नोंदवून ठेवेनेच. 

***



१.  होप इन सॉलीट्युड 

पापण्यांच्या वचळणीतला 
फॅब इंडिया 
चित्रमय चिंतेतली 
अल्पवयीन चुम्माचाटी 
भोस्कं पडलेल्या अंडरवियरची 
मॉर्डन आर्ट गॅलरी
घराच्या छताचा उनाड 
भाडोत्री पत्रा 
गोधडीच्या अंतर्मनातली 
उबदार लपाछपी 
भिंतींच्या कानातले 
पिढीजात मौन 
चटईच्या क्षेत्रफळाइतकी 
वैश्विक वणवण   
डोळ्यातल्या डोळ्यात 
पाणावलेलं वाऱ्यासारखं 
अदृश्य सुख 
देठाच्या भुईगर्भात स्थिरावलेली 
आदिम दुःखद रेलचेल 
जिभेच्या काठावरची 
वाळवंटी तहान 
पायांच्या ठशांचा 
अज्ञात मालकीहक्क 
घराच्या आड्यातली 
मरणप्रिय शांतता 
अंथरुणाच्या पायाबाहेरच्या स्वप्नांची 
जागतिक एलिजिबलीटी 
चार्पाच अंग पुसलेला दारावर 
सुकलेला ओरिजिनल टॉवेल 
कॉमन संडासातली ब्रह्मांडथाप 
शहरांच्या कपाळावरची 
लॅव्हिश भुरळ 
ग्लोरिअस खेड्यांच्या गालावरचे 
दुष्काळ खडकाळ गालिचे 
रात्रीच्या गर्भातला 
विंटेज लूक 
वाढत्या बेरोजगार वयाचा 
फिफ्टीपरसेंट ब्राईटनेस 
नी 
एकाएकी 
हुंदक्यातला 
होप इन सॉलीट्युड

***

२. 
मालडब्यातली कुण्या हसऱ्या चेहऱ्याची तात्पुरती ओळख 
हीच काय ती आपल्या अस्तित्वाची ठळकरेष 
एलआयसीच्या एजंटनं दाखवावं लाइफटाइम स्वप्न 
इतकी भीती क्वचित कुणाची 

नाईटस्कुलच्या बेन्चवरची तंबाखूची पिचकारी 
नी कर्कटकनं खरवडलेली आईवरची पिव्वर शिवी
एवढं तंदुरुस्त शिक्षण आपलं

मुहंमदअली रोडवरचा चचा म्हंतो 
इतना टेन्शन नहीं लेनेका दुनिया बडी मादरचोद हैं 
सॉरी बोलनेवाले तुम कौन हो भई 
इतकी सिम्पल ओळख दुनियेशी

येष्टीच्या खिडक्यांची दीर्घ थरथर 
नि बाजूला बसलेल्या म्हाताऱ्याची 
खांद्यावर लवंडलेली मान एवढाच काय तो 
आधार आपला कुणाला 

ट्रकड्रायव्हरची लांब पल्ल्याची
अनोळखी डिमलाईट साथसंगत 
नि अंधार कोरून उरणारी एकाएकी स्तब्धता 
इतकंच काय ते रितेपण प्रत्येक थांब्याचं 

नाव तेवढं विचारायचं राहून जातं दरवेळी 
इतकीच उणीव चरित्राची 

लायटीच्या खांबावर कुत्रा करतो वर ढ्यांग
इतकं अबाधित स्वातंत्र्य आपलं 
नी रस्त्यांना चिरत नेणारी अविरत धावपळ 
इतकी प्रामाणिक पायांची दृढ वणवण 

दुःखाची निर्वाणकळ पोटात 
इतका शांत गळफास उर्वरित वर्षांचा  

***

Monday, November 27, 2023

आदले । आत्ताचे : समकालीन कल्लोळाची कथा…

''मुंबईच्या गर्दीचा, रेल्वे व्यवहारांचा आणि शहरातील सर्व महत्त्वाच्या परिसराचा फेरफटका घडवत आजच्या शहरी तरुणांची विरत चाललेली स्वप्ने मांडणारी कादंबरी नुकतीच आली आणि वाचकप्रिय झाली. कादंबरीतील सामाजिक व्यवस्थेला व्यवस्थितपणे सामावून घेणारी भाषा सापडणे बऱ्याचदा लेखकाचा कस पाहणारे असते. इथे साजेशी भाषा घडविण्यामध्ये लेखक यशस्वी झाला आहे.''

*** 

प्रदीप कोकरे या तरुण लेखकाची खोल खोल दुष्काळ डोळे ही कादंबरी वाचत असताना मला भालचंद्र नेमाडेंचं एक विधान आठवत होतं. नेमाडे एकदा म्हणाले होते की, साधारणत: पंधरा-वीस वर्षांनी पिढी बदलते. प्रत्येक नव्या पिढीची मानसिकता आदल्यांहून वेगळी असते. जगाकडे बघण्याचे दृष्टिकोन भिन्न असतात. काळ बदलला की प्रश्नांना समोर जाण्याचे प्रत्येकाचे मार्गही बदलून जातात. त्यामुळे ‘कोसला’ मी माझ्या काळच्या तरुण पिढीला समोर ठेवून लिहिली. आजचा एखादा तरुण ‘कोसला’ला नाकारून आजच्या काळातल्या तरुणांच्या नजरेतून जगाला सामोरं जाईल. प्रत्येक पिढीची आपली आपली एक ‘कोसला’ असते.

हा लेख लोकसत्ता, लोकरंग पुरवणीत आदले । आत्ताचे या सदरात दिनांक १९ नोव्हेंबर २०२३ रोजी
प्रकाशित झाला होता. फोटो : लोकसत्ता  

अधूनमधून काही कादंबऱ्या वाचत असताना हे आठवतं. या कादंबऱ्या आठवतात, त्या ‘कोसला’शी साम्य असलेल्या असतात किंवा ‘कोसला’च्या प्रभावातून लिहिलेल्या असतात असंही काही म्हणता यायचं नाही; पण त्यातली संवेदनशीलता ‘कोसला’ला समांतर जाणारी असते; आपल्या आपल्या पिढीचं प्रतिनिधित्व करणारी असते.

प्रदीप कोकरे यांची अलीकडेच लोकवाङ्मय गृह, मुंबई या प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेली कादंबरी ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या अर्थाने आजच्या काळातल्या महानगरीय तरुणांच्या संवेदनविश्वाला जवळ जाणारी प्रातिनिधिक कादंबरी आहे. महानगरीय असं म्हटलं तरी आजच्या काळात एकूणच आधुनिक संवेदनांची ज्या पद्धतीने सरमिसळ होऊ लागली आहे, ती पाहता ही कादंबरी केवळ महानगरीय तरुणांच्या संवेदनविश्वापुरती मर्यादित राहत नाही. ती त्याहूनही अधिक अवकाश व्यापताना दिसते. अर्थात, महानगर हे या कादंबरीच्या नायकाच्या वर्तमान जगण्याच्या संघर्षांच्या केंद्रस्थानी असल्याने यात चित्रित झालेल्या बहुतांश सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक घडामोडींमधून महानगरीय संवेदनाविश्व दृग्गोचर होत राहते. नायक काही दिवसांसाठी गावी गेल्यावर निवेदनात तिथल्या दैनंदिन लोकजीवनाचे तपशील येतात. त्यातही गावातल्या बायकांच्या टीव्हीवरच्या सीरियल्सच्या अनुषंगाने चाललेल्या गप्पा, फोन, क्रिकेट वगैरेमुळे आधुनिकीकरण ग्रामीण संवेदनाविश्व कसे व्यापत आहे आणि नायकही आपले अगदी कालपरवापर्यंतचे तिथे त्याच परिसरात गेलेले आयुष्य नजरेआड करू पाहताना शहरी जगण्याच्या विवंचनातून बाहेर येऊ शकत नाही, हेही समोर येत जाते. गावच्या त्या परिसरात जगत असताना आपण केवळ परंपरेने म्हणून स्वीकारलेल्या काही सांस्कृतिक संरचनांकडे काहीशा संशयास्पदपणे पाहण्याचा नायकाचा प्रयत्नही त्यातून जाणवत राहतो. ही जाणीवही त्याला महानगरीय संवेदनांनी त्याचा वर्तमान व्यापलेला असल्याने झाली असावी, असे वाटते.

कादंबरी हा साहित्य प्रकार वर्तमानाचे बोट पकडून उभा राहत असल्याने भूतकाळ मागे टाकून समकालीन जगण्याच्या शक्यतांचा शोध घेणे हेच कादंबरीकारासमोरील महत्त्वाचे आव्हान असते. या आव्हानाला लेखक कसा सामोरा जातो, काळाने उभे केलेले पेच तो कसे सोडवतो, त्यासाठी स्वत:ची भाषा कशी निर्माण करतो, यातून लेखकाचे सामर्थ्य दिसून येत असते. प्रदीप कोकरे यांनी हे आव्हान या कादंबरीमध्ये बऱ्यापैकी यशस्वीपणे पेलले आहे, असे म्हणावे लागते. मुंबई या महानगराचा अवकाश निवडल्यावर तिथल्या संबंधित परिसराचे, तिथे राहणाऱ्यांच्या दैनंदिन जगण्याचे, जगण्यासाठी आणि आपले वर्चस्व टिकवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या संघर्षांचे, सांस्कृतिक व्यवहारांचे, मानसिक स्तरावरील उलाढालींचे जे तपशील लेखकाने दिले आहेत, त्यातून एकविसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील पहिल्या दोन दशकांचे वर्तमान वाचकाच्या नजरेसमोर ठळक होत जाते. प्रथमपुरुषी निवेदनाचा वापर करत नायक स्वत:च्या जगण्याविषयी बोलत असला तरी त्यातून महानगरातील गलिच्छ वस्त्या, तिथलं लोकजीवन, त्यांचे परस्परांशी असलेले संबंध, रोजीरोटीबरोबरच आत्मसन्मानासाठी निर्दयी तसेच आत्मकेंद्री व्यवस्थेशी करावा लागणारा झगडा, विचारी व संवेदनशील माणसाची या व्यवस्थेत होणारी घुसमट, त्यातून येत जाणारा संवेदनांच्या पातळीवरील बधिरपणा, अंतिमत: त्याची परिणती म्हणून परात्म होत जाणे, अशा असंख्य गोष्टींविषयी वाचकाला कळत जाते.

या कादंबरीचा नायक गावातल्या मोकळय़ाढाकळय़ा वातावरणातून पोटापाण्याची काही तरी सोय लावावी म्हणून बाह्यत: गजबजलेल्या, तरीही आतून आक्रसलेल्या शहरात येऊन स्थिरावू पाहतो. या शहराच्या सगळय़ा आत-बाहेरच्या कल्लोळांशी त्याने बऱ्यापैकी जुळवून घेतले आहे. कादंबरीच्या प्रारंभापासूनच पुढे कादंबरीभर पसरून राहिलेले या कल्लोळांचे पडसाद आपल्याला सतत जाणवत राहतात. नायकाच्या भावविश्वाचाच एक भाग बनून गेल्यासारखे त्याच्या एकटेपणातल्या चिंतनातून, दैनंदिनी, कविता वा शिव्यांतून, वेगवेगळय़ा माणसांशी बोलाचाली, व्यवहार करताना घडणाऱ्या कृती अशा सगळय़ामधून ते कमीजास्त तीव्रतेने व्यक्त होतात. तो म्हणतो तसं या कल्लोळांची त्याला हळूहळू सवय होत जाते. त्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करण्याऐवजी तो अधिकाधिक त्यात हरवून जातो. वाढ खुंटून स्थितिशील झाल्यासारखा बथ्थडपणे गरगरत राहतो. साधारणत: हे कादंबरीचे एक मध्यवर्ती सूत्र म्हणून सांगता येईल. या मध्यवर्ती सूत्राच्या अनुषंगाने या कादंबरीतील सर्व घटना, प्रसंग, वर्णने, निवेदन, विविध पात्रांचे परस्परसंबंध यांकडे पाहता येऊ शकते.

कादंबरीची सुरुवात नायकाच्या रोजच्या जगण्यातील एका नेहमीच्या सवयीच्या पहाटेपासून होते. शौचाला जातानाचे तपशील, संडाससाठी असलेली रांग, पोटं तुरंबलेल्या तिथल्या माणसांची क्षुद्र अरेरावी, कुरघोडय़ा, शिव्या, गटारातून फिरणाऱ्या घुशी, बेवारशी कुत्री, असं सगळं चाळीतील संस्कृतीच्या संदर्भाने येणारे तेथील उबगवाणे वातावरण महानगरातल्या निम्नस्तरीय जगण्याचा एक अपरिहार्य भाग आजही आहे. दिवसाची ही सुरुवात कुठल्याही अंगाने प्रसन्न आहे, असं म्हणता येणार नाही. या अशा वातावरणात नोकरीची, राहण्याच्या जागेची, लैंगिक भुकेच्या शमनाची, संसाराची, स्थिर जगण्याची, कसलीही शाश्वती नसलेल्या आणि पुस्तकं नि कवितांसह तुकोबा, कबीर, नामदेव ढसाळ, कुमार गंधर्व, मुकुल शिवपुत्र, केसरबाई, मेहदी हसन, फरीद अयाज, लीळाचरित्र, जहांगीरमधली चित्रं वगैरेंशी मनाने सख्य जोडून असलेल्या संवेदनशील तरुणाची काय पंचाईत होत असावी याचा अंदाज येऊ शकतो. कादंबरीच्या सुरुवातीच्या प्रसंगाने आपल्या मनात निर्माण केलेले एक प्रकारच्या उदासीचे, खिन्नतेचे आणि अलिप्ततेचे वातावरण पुढे सबंध कादंबरीला व्यापून राहिलेले दिसते. नायकाचं गावी गेल्यावर आईवडिलांसह लहानपणापासूनच्या त्या परिचित परिसराला भेटल्यावर, जिच्यामध्ये मन गुंतलं आहे त्या सुधासोबत असताना, मित्रांसोबत वावरताना, अन्य सहकाऱ्यांसोबत वा एकटं असतानाही हे उदासवाणं अलिप्तपण दूर गेल्याचे जाणवत नाही. नायकाच्या देहामनाला वेढून राहिलेले हे अलिप्तपण आणि उदासीनतेने वाचकांनाही आपल्यासोबत गुरफटून घेतल्याचा अनुभव ही कादंबरी वाचताना येत राहतो. या कादंबरीचे हे एक वैशिष्टय़ म्हणून नोंदवता येईल.

कादंबरीचे मुखपृष्ठ : अन्वर हुसेन 

या कादंबरीतील जवळपास प्रत्येक लहानमोठय़ा व्यक्तिरेखेला स्वत:चं असं स्वतंत्र अस्तित्व आहे. प्रत्येकाचं या कादंबरीच्या अवकाशात काही एक विशिष्ट स्थान आहे. कादंबरीच्या सुरुवातीला पहाटे चाळीतल्या सार्वजनिक संडाससमोरच्या रांगेत नंबर लावायला जाताना आठवणारी पायांखाली येऊन मेलेली घूस असो, की काळवेळेचं वा कसलंही भान नसलेले रस्त्यावर झेंगट लावून हास्यास्पद प्रदर्शन घडवणारी कुत्री असोत, माणसांइतकेच हे जीवही या किळसवाण्या महानगरीय अधोविश्वाच्या संस्कृतीबरोबरच नायकाच्या मनातील कल्लोळांचे प्रतिनिधित्व करणारी पात्रे आहेत. त्यांच्या कादंबरीतील असण्याला काही एक अर्थपूर्ण प्रयोजन आहे. त्यांच्या अस्तित्वामुळे निवेदनातून आपल्यासमोर साक्षात होत जाणारा तपशील अधिक जिवंत आणि वास्तववादी होत जातो. अर्थात, याशिवाय यात प्रसंगोपात येत जाणाऱ्या वेगवेगळय़ा मानवी व्यक्तिरेखाही तितक्याच लक्षणीय आणि ठसठशीत आहेत. चाळसंस्कृतीतील लाचारी, भूक, उंडगेपणा, नादानपणा, व्यसनी वृत्ती, गुंडगिरी, लैंगिक उपासमार, अकृत्रिम मानवीय जिव्हाळा इ. विशेष स्पष्ट करणारी गण्या फुलवाला, पिंटय़ाभाय, पिंटय़ाचा बाप हरितात्या, सखू म्हातारी, शंकर, बबन्या, सुधा यांसारखी पात्रे, नोकरीच्या ठिकाणाच्या मालकाची मुजोरी, बेफिकिरी, मजबुरी वगैरे दाखवणारी टाटारिया, लावण्या, जितू ही पात्रे, महानगरातील एकाकीपणा, निर्वासित जगणे, दाखवून देणारी कुणी एक ‘तो’ आणि त्याच्यासारखी काही पात्रे ही या कादंबरीची बलस्थाने ठरणारी आहेत. कादंबरीच्या नायकाइतकीच ही पात्रेही या कादंबरीच्या मध्यवर्ती सूत्राला पुढे घेऊन जाण्यासाठी उपयोगी ठरतात.

कादंबरी हे एक भाषित रचित असल्याने कादंबरीकाराला हे रचित घडवताना स्वत:ची भाषाही शोधावी लागते. कादंबरीतील सामाजिक व्यवस्थेला व्यवस्थितपणे सामावून घेणारी भाषा सापडणे बऱ्याचदा लेखकाचा कस पाहणारे असते. कादंबरीच्या भाषेविषयी मराठीमध्ये म्हणावी तितकी जागरूकता दिसत नाही, हे खरे आहे. या उदासीन पार्श्वभूमीवर ‘खोल खोल दुष्काळ डोळे’मध्ये लेखक साजेशी भाषा घडविण्यामध्ये बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे, हे लक्षात येते. भाऊ पाध्ये, चंद्रकांत खोत, दिवाकर कांबळी, जयंत पवार, जी. के. ऐनापुरे यांनी निम्न वा अधोस्तरीय महानगरीय अवकाशाला साजेशी भाषा त्यांच्या लेखनासाठी जाणीवपूर्वक निर्माण केली. त्या वाटेने प्रदीप कोकरेसारखा तरुण लेखक चालू पाहतो आहे, हे दिलासादायक आहे. कादंबरीत वापरलेले नायकाच्या दैनंदिनीतील चिंतन, त्याच्या मन:स्थितीचे दर्शन घडवणाऱ्या त्याच्या कवितांचे तुकडे, तुकोबांचे अभंग व विविध गायकांच्या चिजांचे संदर्भ, नायकाच्या मनाचे भरकटलेपण पकडू पाहणारे निवेदन, फेसबुक, व्हाटसऍप, इन्स्टा यांसारख्या आधुनिक समाजमाध्यमांशी संबंधित लेखन, अशांसारखी संभाषिते महानगरीय जगण्यातील कोलाहल, वखवखलेपण, अतृप्ती, अशांती, एकाकीपण, तडजोड, स्वप्ने, राडे, स्पर्धा, सत्तासंघर्ष, सांस्कृतिक संघर्ष, डिप्रेशन, अंतिमत: केऑस अशा अनेकानेक घटितांच्या चित्रणाच्या पार्श्वभूमीवर कादंबरीच्या भाषेला वेगळेपण देऊ पाहतात. चाळीतील तरुणांची रांगडी, मोकळीढाकळी भाषा, शिव्यांचा आणि लैंगिक शब्दांचा मुक्त वापर, संवादांतील जिवंतपणा, प्रथमपुरुषी निवेदनातून समोर येणारे वास्तववादी तपशिलांतील बारकावे, यामुळेही कादंबरीच्या भाषेचा बाज खुलला आहे.

कादंबरीच्या आकारामुळे ती चटकन वाचून हातावेगळी होते हे खरे असले, तरी सत्यकथानिष्ठ दीर्घकथा वा लघुकादंबरीसारखे तिचे स्वरूप जाणवत राहते. तिच्यात कादंबरीच्या विस्तृत व गुंतागुंतीच्या संरचना पटाची उणीव जाणवते, हेही मान्य करावे लागते. बऱ्याचदा नायकाच्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित नोंदींपुरतेच यातल्या काही घटनांचे स्वरूप उरते की काय असेही वाटत राहते. वाचक म्हणून असमाधानी वाटावे अशा काही गोष्टी त्यातून जाणवत राहतात. विशेषत: नायकाचं आपलं असं अधांतरी लोंबकळत जगणं जगत असतानाही त्याच्या भवतालच्या अवकाशात देशावर प्रभाव टाकणाऱ्या अनेक राजकीय व सांस्कृतिक उलथापालथी याच काळात घडत राहिल्या होत्या. त्यांचा परिणाम राजकीय-सामाजिक वा सांस्कृतिकदृष्टय़ा सजग आणि संवेदनशील असलेल्या नायकाच्या मनावर कळत नकळत होणे साहजिकच आहे. पण तसे ते या कादंबरीत क्वचितच जाणवत राहते. हा दोष म्हणता आला नाही तरी कादंबरीसारख्या सामाजिक व कृतिशील वाङ्मय प्रकाराची ती एक प्रमुख मागणी असते. याच दशकभराच्या काळात आलेल्या, आजच्या पिढीची घुसमट व आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठीचा संघर्ष मांडणाऱ्या किरण गुरव, सुशील धसकटे, प्रसाद कुमठेकर, अवधूत डोंगरे, सुशील गायकवाड यांसारख्या तरुण लेखकांच्या कादंबऱ्यांमध्ये या दृष्टीने विचार केला गेल्याचे दिसून येते.

महानुभवी तत्त्वज्ञानात सांगितल्याप्रमाणे कसल्याही गोष्टीची सवय जडू नये, जगण्याचा साचा होऊ नये, यासाठी आपल्या कादंबरीतील नायकाप्रमाणेच सजग असलेल्या या कादंबरीकाराकडून अधिक खोली गाठण्याच्या अपेक्षा करता येतील, असे मात्र नक्कीच ही त्याची पहिली कादंबरी वाचत असताना जाणवते. आपण जगत असलेल्या काळाचा तुकडा पकडू पाहताना आपल्या अस्तित्वभानाचाही शोध घेण्याचा प्रदीप कोकरे यांचा हा प्रयत्न निश्चित वाखाणण्याजोगा आहे.

- प्रवीण दशरथ बांदेकर

कवी, प्राध्यापक आणि कोकणातील साहित्य चळवळींमधील महत्त्वाचे नाव. नवाक्षर दर्शन’ या मराठी नियतकालिकाचे संस्थापक संपादक. ‘येरू म्हणे’, ‘खेळखंडोबाच्या नावानं’ या काव्यग्रंथांनंतर गद्यलेखनात सक्रिय. ‘चाळेगत’, ‘इंडियन ऍनिमल फार्म’ या कादंबऱ्या लोकप्रिय. ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार.

साभार : लोकसत्ता ,१९ नोव्हेंबर २०२३. 

***

दास्तान -ए- रामजी : जन्म-मृत्यूच्या गडद अंधारातलं कथननाट्य

भारतात कथा-कथनाची प्रदीर्घ अशी सशक्त परंपरा आहे. दोन व्यक्तींच्या किंवा समूहाच्या मौखिक संवादप्रक्रियेतून ती अधिकाधिक काळ इथल्या मातीत इथल्य...