Monday, October 27, 2025

नारायण सुर्वे : लढाऊपणाचं संयमी स्वगत


आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात अढळ स्थान असणाऱ्या कवी नारायण गंगाराम सुर्वे ( १५ ऑक्टोबर १९२६ - १६ ऑगस्ट २०१०) यांचं जन्मशताब्दी वर्ष १५ ऑक्टोबर २०२५ पासून झालं. पॉप्युलर प्रकाशनाच्या ‘प्रिय रसिक’ या मासिकासाठी सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने लिहिलेलं हे टिपण : 

*** 

ऐसा गा मी ब्रह्म (१९६२), माझे विद्यापीठ (१९६६), जाहीरनामा (१९७५) आणि नव्या माणसाचे आगमन (१९९५) असे केवळ चार छोटेखानी काव्यसंग्रह. साधारणतः चाळीस-पंचेचाळीस वर्षांची वाङ्मयीन कारकीर्द. आणि १४५ च्या आसपास एकूण कविता. एवढ्या ऐवजावर आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात अढळ स्थान असणाऱ्या कवी नारायण गंगाराम सुर्वे ( १५ ऑक्टोबर १९२६ - १६ ऑगस्ट २०१०) यांचं जन्मशताब्दी वर्ष १५ ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. 'मी जन्मलो तेव्हा काही नाम धारण करून जन्मलो नाही. मात्र मी नसेन तेव्हा ह्या पृथ्वीच्या पाठीवर एक नाव ठेवून जाईन.' स्वतःच्या जडणघडणीसंदर्भात सुर्वे यांचे वरील उदगार आहेत. सुर्वे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आरंभ होत असताना या उद्गाराची प्रस्तुतता महत्त्वाची वाटते. भारतीय स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्राची चळवळ अशा दोन्ही निर्णायक चळवळींच्या सानिध्यात सुर्वे यांची जडणघडण झालेली आहे. अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमरशेख यांच्या बुलंद आवाजाचा आणि परिवर्तनशील लेखणीचा आधार त्यांच्या पाठीशी होता. बालमजूर म्हणून गिरणीत केलेलं काम आणि त्यातून कामगार चळवळीशी जुळलेली नाळ ही पार्श्र्वभूमी  लक्षात घेतली तर नारायण सुर्वे यांचा जीवनसंघर्ष आणि त्यातून प्रसवलेली अनुभवनिष्ठ कविता हे आधुनिक मराठी कवितेचं निर्णायक पाऊल ठरते. 

नारायण सुर्वे यांचे कवितासंग्रह. प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन,मुंबई. 


थोडे साहिलेले, पाहिलेले, जोखिलेले आहे 
जसा जगत आहे मी तसाच शब्दात आहे 

असा अत्यंत प्रामाणिक आणि अनुभवलक्ष्यी सूर सुर्वे यांच्या कवितेचा आहे. जीवन आणि कविता यात अधीकचे अंतर नाही. जे जगण्यात आहे अगदी तसेच कुठल्याही आडपडद्यांशिवायचे मोकळे जग या कवितेत आहे. सर्वसामान्य माणसांच्या रोजच्या जगण्यातले कितीतरी संदर्भ, घटना, भाषेचा खळाळता नाद या कवितेत अवतरतो. हर तऱ्हेची माणसं, त्यांच्या बहुविध मिती, बेवारस मुले, कणखर स्त्रियांच्या स्वभावखुणा, जातीधर्माच्या पल्याडचे करुणेने भरलेले जग आणि कामगार आणि कामगारवर्गाच्या अधःपतनाचे कैक संदर्भ नारायण सुर्वे यांच्या कवितेत यांत्रिकपणा टाळून अवतरतात. 

'मजूर हा शब्द मी कटाक्षाने टाळतो. असे शब्द टाळताना माझी राजकीय व सामाजिक भूमिकाही असते. त्याऐवजी मी माझ्याच लोकांच्या बोलीभाषेतले शब्द उचलतो. ते अधिक सामर्थ्यवान वाटतात. सामान्य लोकांची भाषा हीच खरी कवितेची भाषा.' 

जाहीरनामा या संग्रहासाठी लिहिलेल्या 'कविता आणि मी' या लेखातील वरील ओळी सुर्वे कविता या घटकावर किती बारकाईने आणि गांभीर्याने विचार करीत होते याची प्रचिती येते. केवळ लोकभाषेतले शब्दच नाहीत तर लोकभाषेत नांदणाऱ्या माणसांना कवितेचा विषय करणे हेही सुर्वे यांनी लिहिलेल्या चरित्रात्मक कविता पाहिल्यावर लक्षात येते. 

भूमिनिष्ठ लेखकाच्या जाणिवा तळागाळातील लोकव्यवहाराशी किती एकरूप आणि घनिष्ट असतात याचे निखळ उदाहरण सुर्वे यांच्या काव्यसंग्रहांत सापडते. या सहसंबंधांची घट्ट वीण आणि त्या जीवनव्यवहारांकडे डोळसपणे पाहण्याची वृत्ती यांची अजोड अशी बांधणी या कवितांमधून आविष्कृत होते. केवळ गिरणी कामगार वर्ग किंवा श्रमिकांच्या जगण्यातल्या व्याकुळतेचाच नव्हे तर सर्वहारा वर्गाच्या स्थित्यंतराचा चिंतनशील आढावाही ही कविता घेते. सुर्वे यांच्या जगण्या-लिहिण्यात असलेली साम्यवादी जाणीव कवितेच्या निर्मितीचे कारण आहे. कवी आणि मार्क्सवादी चळवळीचा कार्यकर्ता ही सुर्वे यांची ओळख त्या अनुषंगाने पूरक आणि तत्वनिष्ठ अशी आहे. सुखदुःखांची अनेक करूण आणि शाश्वत अशी रेखाचित्रे सुर्वे यांच्या कवितेत उमटतात. म्हणूनच या समूहचित्रांचे बहुपदरी कोलाज सुर्वे यांच्या कवितेत एखाद्या अढळपदासारखे उपस्थित असतात.

आफ्रिकी चाचा चिडे, थुंके, म्हणे; "काम नही करेगा."

चिलमीवर काडी पेटवीत मी विचारी, "चाचा, पेट कैसा भरेगा ?"

किंवा 

आलं आलं वरीस जमीन नांगरून 

उभं पीक नाचे फुलून 

पर एक मेला सावकार ठोला 

हिसकून घेतो बाई सोन्याचा गोळा 

असं उपाशी राहून ग आम्ही मरावं किती 

डोंगरी शेत माझं ग मी बेनू किती 

आलं वरीस राबून मी मरावं किती 

अशाप्रकारची संवादी आणि लोकव्यवहारातील भाषा सुर्वे यांच्या कवितेत मुक्तपणे बागडते. ती मुक्त आहेच, परंतु तुकारामाच्या अभंगांसारखी जनमाणसांत मुखोद्गतही आहे. कष्टकरी वर्गाचे शोषण, त्यामागची भांडवली मानसिकता, जगण्याचा अविरत चिवटपणा आणि त्यामागील साम्यवादी विचारदृष्टी सुर्वे यांच्या दर संग्रहागणिक चिकित्सेचे टप्पे गाठताना दिसते. मार्क्सवाद-लेनिनवाद ह्या विचारदृष्टीसोबतच सर्वहारा, कामगारवर्गाच्या जगण्याचे अनेक चिरंतन संदर्भ अधिक गडद होत गेलेले या कवितेत दिसतात. माणसांसोबतच त्याच्या भवंतालातल्या असंख्य दुर्लक्षित घटकांचा समावेश या कवितेत स्वाभाविकरीत्या असतो. शोषित-वंचित समूहातले अव्यक्त आवाज या कवितेत लक्षणीयरीत्या मुखर होतात. उदा. म्हणून 'शिगवाला' या कवितेतल्या खालील ओळी पाहता येतील. एका साध्या अनुभवाला कवितेचा रचनाबंध देऊन सुर्वे इथे विलक्षण संवादी लय जुळवून आणतात. अशीच संवादी लय 'मुंबई' आणि 'गिरणीची लावणी' या कवितांमध्ये आढळते. सुर्वे यांची लोककलाप्रकारावर असलेली नितांत श्रद्धा आणि आत्मीयता या रचनांमधून आविष्कृत झालेली दिसते. 

नारायण सुर्वे यांच्या समग्र कविता 
प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन

देख ये मेरा पाय 

साक्षीको तेरी आई काशीबाय 

'मी खाटीक आहे बेटा - मगर 

गाभणवाली गाय कभी नही काटते''

आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात सर्वसामान्य लोकांच्या जगण्यात इतक्या बेमालूमपणे मिसळलेली कविता इतरत्र क्वचित दिसते. सुर्वे यांच्या अत्यल्प कवितेने हे साधले आहे. 

सुर्वे याच्या कवितेचे मूल्यभान हे इथल्या कष्टकरी जनतेच्या जगण्याशी एकरूप झालेले दिसते. समूहभावना आणि तिच्याशी असलेली बांधिलकी या कवितेच्या रचनेशी दिसते. शहराचे, कामगारांचे आणि पर्यायाने कामगारवर्गाचे जे चित्र ही कविता रेखाटते त्याच्याशी सुर्वे यांची मानवतावादी दृष्टी एकरूप झालेली दिसते. 



कधी विचार असे येतात 

जसे थकून यावेत तिसऱ्या पाळीचे कामगार घरात 

अशाप्रकारचा करुणाभाव या निर्मितीशी असलेला जाणवतो. आणि 

स्वतःलाच शोधण्यात अर्धी उमर हरवून गेलो 

स्वतःकडून लाखदा वळलो; तरीही आढळलो नाही  

याप्रकारची एक अगम्य तटस्थताही दिसते. सुर्वे यांच्या कवितेत ही दोन्ही टोकं एकप्रकारे स्वतःची समजूत घालावी अशाप्रकारचा विचारवाद बाळगतात. कदाचित म्हणूनच 'एकटाच आलो नाही युगाचीही साथ आहे.' असा निर्मळ कबुलीजबाबही या कवितेत दिसतो. सुर्वे यांच्या बहुतांश कवितांमध्ये आढळणारा आत्मकथनात्मक आशय हा या कवितेत एकप्रकारची सर्वव्यापी जाणीव विस्तारत नेतो. एक व्यापक आत्मकथनात्मक अवकाश या निर्मितीने व्यापलेला आहे. 'पुढच्या युगांची सर्वच दुःखे मीही भोगीन म्हणतो' असा स्पष्ट जाहीरनामाच घेऊन ती उभी आहे. 

सुर्वे यांच्या कवितेत आढळणारी समन्वयवादी मानवी दृष्टी शोषणमुक्त समाजाचे पसायदान मागते. खंगलेल्या, पिचलेल्या आणि जगणं विसरलेल्या अनेक माणसांचा ती आवाज बनते. मात्र ती आवाजी बनत नाही. 

दोन दिवस वाट पाहण्यात गेले; दोन दुःखात गेले 

हिशोब करतो आहे किती राहिलेत डोईवर उन्हाळे 

असा संयम आणि समंजसपणा या कवितेत आहे. या संयमातून आणि समंजसपणातून एक निष्णात लढाऊपणाचा स्वर या कवितेत मिसळलेला आहे. 

कामगार आहे मी तळपती तलवार आहे 

सारस्वतांनो ! थोडासा गुन्हा घडणार आहे.

ही स्पष्टता या लढाऊपणाच्या स्वरात आहे. आणि हा स्वर श्रमिकांच्या लढ्याचे प्रतीक आहे. नारायण सुर्वे यांची कविता केवळ तो मार्ग चोखाळत नाही तर त्या मार्गाशी एकनिष्ठही राहते. कलात्मकता आणि कला व जीवन यांच्या गुंत्यातून सुटून आशय आणि भाषाभान जपत ती प्रवाही होते. हे अत्यंत महत्त्वाचं कार्य नारायण सुर्वे यांच्या अत्यल्प कवितेने केलेलं आहे. नारायण सुर्वे ह्या पृथ्वीच्या पाठीवर खरोखरंच एक खणखणीत नाव ठेवून गेलेले आहेत. 

***


Monday, March 17, 2025

सोलो प्रवासाविषयीच्या नोंदी

होस्टेलच्या खिडकीतून पहिल्यांदा बर्फ पडताना पाहिला ती जागा !











 

माझ्या इन्स्टा हॅण्डलवर ( @Khada_Khod ) आणि इनबॉक्स, वॉट्सऍपवर माझ्या सोलो प्रवासाविषयी काही मित्र मैत्रिणींचे प्रश्न असतात. त्या सगळ्यांना एकत्रित उत्तर देण्यासाठीची ही नोंद : 

भटकत फिरलो भणंग आणिक
मिळेल तेथे पाणी प्यालो;
जुळेल तेथे खूण जुळविली
तरि होतो हा तसाच उरलो !

मी एकल प्रवासी म्हणजेच सोलो ट्रॅव्हलर आहे. ठरवून एकट्यानं प्रवास करतो. अर्थात माझा प्रवास हा बजेट बॅगपॅक असतो. माझ्याकडे जास्त पैसे आहेत म्हणून मी प्रवास करत नाही. प्रवास करणं म्हणजे पैसेवाल्यांची थेरं वगैरे समज अनेकांचा असतो. आमच्या घरीही मी प्रवासात पैसे वगैरे उडवतो असा आक्षेप असतोच. प्रवासात पैसे लागत नाहीत का मग ? तर अर्थात लागतात. पण ते तुमच्या व्यवस्थित प्लॅनवर अवलंबून असतात. मी प्रवासाची पूर्वतयारी करताना दोन महिने आधी ट्रेनची जाण्यायेण्याची तिकिटं काढून ठेवतो. शक्यतो स्लीपर किंवा थ्री टायर. हल्ली हल्ली प्राधान्य थ्री टायरला. साईड लोअर ही माझी आवडती जागा आहे. ती मिळवण्याकरता दोन महिने आधी बुकिंग. कारण सांगतो. मला लांबचा प्रवास कटकटीचा नको असतो. जास्त बोलणं, मोट्ठ्यानं फोनवर गाणी लावणं एका मर्यादेबाहेर मला झेपत नाही. अर्थात वेड्यावाकड्या अनुभवांना मी मुकत नाही. मी त्यांच्या शोधात असतोच. बोलणाऱ्या माणसांच्या भाषेवर उच्चारावर माझं बारीक लक्ष असतं. मला निरीक्षण आवडतं. फिक्शन रचण्यात मला या गोष्टी कामी येतात. आयपॅडमध्ये किंवा डायरीत तिथल्यातिथं नोंदवून ठेवतो. तर हे झालं तिकीट बुकिंगचं.

ट्रेनमधील आवडती सीट. साईड लोअर !


ज्या प्रदेशात मी प्रवास करतो त्याविषयी आधी मॅपिंग करतो. हवामान, प्रवासाची लोकल साधनं, खानपान, भाषा, ऑफबीट स्थळं, टाळायचं काय आणि मुख्य म्हणजे गेल्यानंतर काय काय करायचं ते नोट्समध्ये नोंदवून ठेवतो. Vlog पाहून मी फिरायला जात नाही. हे जेवढं टाळाल तेवढा तिथं गेल्यानंतर भ्रमनिरास होत नाही. स्वतःला कोसत बसता येणार नाही. मग मला याची माहिती कशी मिळते ? तर प्रत्येक राज्याच्या टुरिझम खात्याकडून आणि काही अतरंगी भटक्या लोकांकडून जे फक्त फोटो आणि रिल्ससाठी फिरायला जात नाहीत. काही रेफरन्स पुस्तकं असतात, पॉडकास्ट आणि ब्लॉगही असतात. त्यावरून आपल्याला जे उपयोगी आहे आणि जे करायला आपल्याला झेपणार आहे तेवढंच मी माझ्यापुरतं स्वीकारतो. 

राहतोस कुठे ? 

झोस्टलची ( Zostel ) साखळी अक्ख्या भारतात प्रत्येक शहरात विखुरलेली आहे. कमाल क्राउड, वाईब आणि खाणंपिणं सगळं टापटीप. त्याचबरोबर होस्टेलर ( The hostellers ) मूसटॅच ( Moustache ) आणि गोस्टॉप ( goStops) यांच्या शाखाही बहुतांश शहरात आहेत. मी या सगळ्या साखळ्यांचा वापर केलेला आहे. काही जागांवर पुनःपुन्हा राहिलोय नव्या ट्रीपमध्ये. कोची बिएनालेला गेलेलो तेव्हा मध्येच वाट चुकवून अलेप्पीला गेलेलो तिथं goStops मध्ये राहिलेलो. काय कमाल जागा. माझ्या बालपणीच्या शाळेतल्या वर्गात घेऊन गेलेली ही जागा. या जागा प्रामुख्याने सोलो ट्रॅव्हलर्स साठी तयार झालेल्या आहेत. या व्यतिरिक्तही काही जागा मार्केटमध्ये आहेत जे यांच्यासारखी सेवा देतात. मी जयपूर लिट फेस्टला जातो तेव्हा 'No horn OK please' नावाच्या हॉस्टेलमध्ये राहतो. मला तिथली शांतता खुणावते. वाचणं, नुसतं पडून राहणं, नव्यानं ओळख झालेल्या भटक्यांशी बोलणं, कॉफी पिणं, गाणी ऐकणं. बस्स बाकी काही नाही.

गोस्टॉपच्या जागेबद्दल त्यावेळी एक नोंद केलेली. ती इथं देतोय :

शाळेतल्या वर्गासारखी जागा. goStops,केरळ. 

''अल्लेप्पी / आलपूळा / आलपुझाला जायचं एक कारण म्हणजे ते फोर्ट कोचीपासून एकदिड तासावर होतं. फोर्ट कोचीवरून एर्नाकुलम पर्यंत सहा रुपयात फेरी. नी तिथून पन्नास रुपयात अल्लेप्पी. तिथं राहण्याचा काही प्लॅन नव्हता. दुपारपर्यंत छोट्या कॅनलच्या कडेनं थोडं चालायचं नि लाईटहाऊस, थोडं समुद्रावर रेंगाळून पुन्हा संध्याकाळी कोचीला जायचं असं ठरलेलं. स्टेशनपासून समुद्रावर चालत जात थोडं पुढं गेलो तर कलन रोडला एक जुनी दुमजली इमारत दिसली. शाळेसारखी. ते गोस्टॉपचं झोस्टेल होतं. थोडं आत जाऊन पाहिलं तर आठवणी फार मागे शाळकरी वयात गेल्या. गावात फक्त चौथीपर्यंत शिक्षण झालेलं. गोस्टॉपचं झोस्टेल पाहिल्यावर पांढऱ्या निळ्या रंगातळी गावची शाळाच डोळ्यात उभी राह्यली. आठवणींना मागे टाकून पुढं सरकता येईना. लगेच एअरबीएनबी बुकिंग चेक केलं तर फक्त तीनशे रुपये रात्र दर होता. बुक करून टाकलं. माझा बेड वरच्या मजल्यावर होता. खूप मोकळी जागा असलेला. दार-खिडक्या निळ्या रंगातल्या. पांढऱ्या दगडी भिंतींवर उठून दिसणाऱ्या. सॅक टाकून पूर्ण खोल्या फिरलो. बाहेर व्हरांड्यातून समोर पाहिलं तर शाळेतल्या वर्गांच्या रचनेसारखी रचना. मधल्या सुट्टीतला टोल वाजल्यावर तुडुंब पोरं वर्गाबाहेर पडतानाची भराभ्भर हालचाल एकाएकी डोळ्यात तराळली. अशा वेळी फक्त उभं राहून जागेचं म्हणणं ऐकून घ्यावं. अनोळखी जागा खूप आपुलकीनं बोलतात. परिचित नसल्या नि स्वतःच्या अवकाशाबाहेर कुठंही त्या असल्या तरी स्वतःचा मूळ स्थायीभाव त्या विसरत नाहीत. त्यांचं नेचर कमालीचा जिव्हाळा रुजवतो आपल्यात. 

एका दिवसात परत कोचीला निघून जायचं असं ठरवून आलेलो मी. दोन दिवस या जागेत राहिलो. पहाटे लवकर उठून चाललो समुद्रावर जाऊन काप्पा खाल्ला. त्यासोबत सेल फिश. काप्पा आधी रताळ्यासारखा वाटला. पण नंतर जाणवलं यात रताळ्यासारखा गोडसरपणा नाहीय. याची चव कम्प्लिट वेगळीय. बटाटा आणि रताळं याहून निराळी. हाऊसबोट वगैरे प्रकार करायचा नव्हता. एकतर प्रचंड महाग आणि ती भरपूर पाणी पोल्यूट करते. छोट्या होड्या घेऊन खूप आत आत जायचा विचार केलेला पण नंतर पायीच फिरलो. मग या वास्तूच्या व्हरांड्यात भरपूर चाललो. शांत बसून राहिलो. दोनतीन पुस्तकं आणलीयत सोबत. कुठलंही पानं वाचलं जाईल तिथपर्यंत वाचत राहिलो. मुकुल ऐकला. सायंकाळी नऊला सगळं शांत पडतं. कुत्रे रस्त्यांमधोमध अंग टाकून झोपतात. तरी डेरिंग करून अकरा पर्यंत फिरत राहिलो. 

मुन्नारला निघताना उलट्या पावलांनी इमारतीकडं बघत स्टेशनपर्यंत आलो. जागा सुटली. आठवणी तेवढ्या बिलगल्या. 

आपण कधीही काही विसरायला नको च्यायला.''

***

अशीच एक आठवण फोर्ट कोचीत राहिलेल्या जागेची आहे. त्यावेळी नोंदवून ठेवली होती. ती अशी : 

'' या इतक्या गोड हसतायत ना त्या नितु आहेत. फोर्ट कोचीला त्यांचा नाद नावाचा कॅफे आहे एक्स हॉस्टेलमध्ये. दिल्लीत वाढल्या,शिकल्या. एमबीए केलंय. त्यानंतर रॉयल एन्फिल्डमध्ये काही महिने काम. डोकं बिझनेसचं असल्यानं फार टिकल्या नाहीत. म्हणतात, ‘मी इंटरव्ह्यू मध्ये खरं बोलायचे. कदाचित खरी उत्तरं मार्केटिंगमध्ये चालत नसावी. माणसांना फसवणं मला जमलं नाही.’

नितुचा कॅफे. हंस नाद. फोर्ट कोची. 
दिल्लीत कोचीतल्या अभिनय क्षेत्रात काहीबाही करणाऱ्या मुळाशी प्रेम जुळलं नि लग्न करून त्या कोचीत स्थायिक झाल्या. नवऱ्याचा  स्ट्रगल संपेना. मल्याळीत ऍडफिल्म्स नि अजून कायकाय तो करत होता. शेवटी जमेना म्हणून नितु लग्नानंतर बारा वर्षांनी वेगळी झाली. तो मुंबईला निघून गेला. जाताना नितुने त्याच्या मदतीने नाद कॅफे सुरु केला. त्याच्याशिवाय मी कॅफे उभा करू शकले नसते. आम्ही वेगळे झालो असलो तरी अजूनही आम्ही चांगले मित्र बनून आहोत. दोघेही एकमेकांच्या चांगल्या वाईट आठवणी जपून आहोत. असं नम्रपणे त्या सांगतात. 

नितुला एक मुलगी आहे. यंदा दहावीत आहे. तबला शिकते. नितु कबीराचे दोहे कंपोज करते. दर रविवारी मायलेकी गुरुद्वार किंवा मोकळ्या जागेत कबीर गातात. 

मी फोर्ट कोचीला उतरून पहिल्या दिवशी संध्याकाळी थोडं झोपून संध्याकाळी बाहेर आलो तर कॅफेत नितु गाणी गात होती. थोडावेळ बसून राहिलो. गाण्यातले शब्द उच्चारत तिची किचनमध्ये धावपळ सुरु होती. कॉफी घेतघेत भरपूर बोललो. 

आता मुन्नारहून परत आलोय फोर्ट कोचीला. दुपारी तिच्याकडे कॉफी टाकली. म्हणाली, शाम को आना, खाना बनाके रखूंगी. पुढ्यात तिने डाळभात वाढलाय. 

दीये जलते हैं फूल खिलते हैं
बड़ी मुश्क़िल से मगर
दुनिया में दोस्त मिलते हैं
दीये जलते हैं

मागे सुरूय नि तीही त्यात रमून गेलीय. किचनमधील तिची पळापळ अजूनही सुरूय.''

 ***

किती खर्च असतो या जागांचा ? 

होस्टेलरच्या खिडकीतून. मनाली.  

फक्त पाचशे- सहाशे. कोचीत तर मी चारशेच्या दराने राहिलोय. अर्थात विकेंडला किंमती वरखाली होतात. पण त्याचा फार लोड नसतो. एक टीप देतो. आयफोनवरून बुकिंग न केल्यास किंमत आणखी खाली जाते. 

ही डॉर्म्स नोंदणी मी कुठे करतो किंवा जागा शोधतो कशा ? 

Booking.com किंवा Airbnb हे दोन पर्याय मी वापरतो. आत्ता केवळ Booking.com वापरतो. कारण गेल्या चार वर्षांपासून सतत एकाच साईटवरून बुकिंग केल्यानं त्यांच्याकडून मला जिनिअस डिस्काउंट मिळतो. ( 15%) कधीकधी हॉस्टेलमध्ये त्या किंमतीत नाश्ताही समाविष्ट असतो. फक्त होमस्टे हवा असल्यास Airbnb वापरतो. या साईट्सवर आपण जिथं राहणार आहोत तिथल्या जागांचे फोटो असतात, तिथं राहिलेल्या लोकांचे रिव्ह्यू असतात. बुकिंग करण्याआधी ते थोडं पाहून-वाचून घ्यावं. 

प्रवासाची साधनं काय ? 

ज्या भागात आपण जातो शक्यतो तिथले लोकल पर्याय वापरावेत. रिक्षा, उबर, रॅपीडो. कोचीत मी MYBYK वरून सायकल वापरलेली. आठवड्यासाठी नोंद करून घेतली. फक्त 35/- दिवस या दराने. सगळं ऑनलाईन. सायकल लॉकअनलॉकही QR कोडद्वारे व्हायची. जिथे हे पर्याय नाहीत आणि कार वगैरे रेंट करायचीय अशा वेळी मी हॉस्टेलमधील पोरं शोधतो जी माझ्यासारखीच टूरिस्टीक स्पॉट टाळून वेगळं भटकतात. मग त्यांचा एक वॉट्सअप ग्रुप करायचा आणि प्रत्येकाने त्यात होईल तो खर्च नोंदवत राहायचा. संध्याकाळी कॅफेत लगेच खर्च समान भागामध्ये स्प्लिट करायचा. Splitwise नावाचं ऍपही आहे यासाठी. ( मला हे जयपूरमध्ये ओळख झालेल्या आणि माझ्याच तालुक्यातील असलेल्या मैत्रिणीमुळे समजलं )

प्रवासात असताना एक डायरी बाळगा. त्यात महत्त्वाच्या आणि जवळच्या लोकांचे नंबर असावेत. आपला पत्ता असावा. काही सूचना वगैरेही चालतील. माझ्या डायरीच्या पहिल्या पानावर अशी नोंद आहे : 

"ही डायरी हरवली नी कुणाला सापडली नी त्यातही परत करावी वाटली तर खालील नंबरवर संपर्क करावा.
आतला मजकूर वाचावा वाटला तर वाचावा. डायरी स्वतःशी ठेवावी वाटली तर ठेवायलाही हरकत नाही. 
माझ्या आठवणी कुणाकडेही कुठेही सुरक्षित राहिलेल्या मला चालतील."

बॅगपॅक कोणती वापरतोस ? 

केशुआ ( Quechua ) या कंपनीची 60 लिटरची बॅगपॅक वापरतो. कारण ती लाइटवेट आहे. किंचित पावसातही ( रेन कव्हर न वापरता ) फॅब्रिक कोटेड असल्यानं भिजत नाही. आणि मुख्य म्हणजे माझ्या 7 ते 15 दिवसांच्या प्रवासातलं सामान त्यात व्यवस्थित मावतं. आणि तिच्यावर 10 वर्षांची वॉरंटी आहे. किंमत मी घेतली तेव्हा साधारण 15 हजार होती. 

किती रुप्ये साधारण उडवतोस ? 

माझा खर्च तसा फार नाहीय. दारू सिगरेट आणि गर्लफ्रेंडच व्यसन नसल्यानं मला तसा फार खर्च नाही. काळी कॉफी काळी टीशर्ट महिन्यात दोनचार पुस्तकं बस्स. तरी प्रत्येक ट्रिप 12-15 हजार बजेट असतं. आत्ताची दिल्ली-आग्रा-मनाली-कसोल ट्रिप याच बजेटमध्ये बसली.

का फिरतोस ? 

मी मूळचा भटका आहे. आमचं बिऱ्हाड असंच कुठूनतरी निघून कुठंतरी उभं राहिलं कोकणात. पाण्याच्या आसऱ्याला त्यांनी आपला ठावठिकाणा थांबवला. नि मला नव्या जागांचा मोह आहे. शहरात सलग राहणं मला जमत नाही. दर तीनेक महिन्यांनी मी घराबाहेर पडतो. कधीकधी जिथं जायचंय ते ठिकाणही निश्चित नसतं. मला माणसांमध्ये सुरुवात करून देण्याएवढं बोलायला आवडतं. नंतर प्रदीर्घ ऐकायला आवडतं त्यांचं बोलणं कसंही आडवंतिडवं. माझ्या फिक्शनमध्ये यातलं काहीतरी येतं. मला ते जाणीवपूर्वक आणायला आवडतं त्यांच्याच भाषेत. मला ते सगळं माझं वाटतं. त्यांचे दुःखद हसरे चेहरे स्वप्नात येतात माझ्या. मी यासाठी तळमळत असतो. माझी माया आहे त्या सगळ्यावर.

तर मी असा भणंग उंडारतो. घरचे मला भैकू ( उनाड, घरादाराची काळजी नसलेला ) म्हणतात.

मला ते अगदीच मान्य आहे.

***

नारायण सुर्वे : लढाऊपणाचं संयमी स्वगत

आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात अढळ स्थान असणाऱ्या कवी नारायण गंगाराम सुर्वे ( १५ ऑक्टोबर १९२६ - १६ ऑगस्ट २०१०) यांचं जन्मशताब्दी वर्ष १५ ऑक...